रविवार, २८ डिसेंबर, २०२५

आपलं संचित जपणाऱ्यांची खिल्ली कशाला?

काही आठवड्यांपूर्वी देवव्रत रेखे या तरुणाने वेदाचे दंडक्रम पारायण पूर्ण केले. समाज माध्यमांवर त्याचे कौतुक करणाऱ्या प्रतिक्रियांबरोबरच, नेहमीप्रमाणे हे थोतांड ठरवणाऱ्या प्रतिक्रियाही उमटल्याच. वेद, वैदिक, उपनिषदे, संस्कृत, श्लोक, सुभाषितं, इतकंच काय प्रमाण मराठी बोलणंही काही मंडळींना ब्राह्मणी किंवा बामणी वाटतं. राजकीय तळी राखण्यासाठी अशी भूमिका घेणाऱ्यांचे समजू शकतो. पण कोणत्याच पक्षीय राजकारणाशी बाद्रायणी संबंध नसलेली मंडळीही जेव्हा या अपसव्य वळचणीला जातात, तेव्हा मात्र ‘अरेरे’ वाटल्याविना राहात नाही.

मूळात वैदिक वाङ्मय-परंपरा आणि प्रवाह ही ब्राह्मणांइतकीच ब्राह्मणेतरांचीही वडिलोपार्जित मिळकत आहे. तिचा मक्ता कोण्या एकाच समाजाकडे देण्याचे काही कारणच नाही. कालपर्यंत वेदाभ्यास बहुजनांना करू दिला जात नव्हता म्हणून संघर्ष करण्यात आले. आज गायत्री मंत्रापासून ते ऋग्वेदातल्या महामृत्यूंजय मंत्रापर्यंत कोणतेही मंत्र कुठेही, कधीही म्हणण्याचे, ऐकण्याचे स्वातंत्र्य अखिल मानव जातीला मिळालेले आहे. वेद-पुराणं सहज उपलब्ध आहेत. कोणीही व्यक्ती इच्छेनुसार ती वाचू-अभ्यासू शकतो. ती शिकवणारे अभ्यासक्रम विद्यापीठांत जातीनिरपेक्ष उपलब्ध आहेत. आता प्रश्न फक्त इतकाच आहे की, हे सारे अभ्यासायचे तर कष्ट उपसावे लागतात, त्याची आपली तयारी आहे का? त्यापेक्षा जे हे कष्ट घेतात, त्यांची खिल्ली उडवणं साेपं नाही का!


वेद शिकून काय उपयोग? त्याने काय पोट भरतंय? की लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळतायंत? असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण माणसाच्या असंख्य गरजांपैकी एक आध्यात्मिक-धार्मिक गरजही आहे, याचं भान आपण सुटू देता कामा नये. हडप्पा संस्कृतीमध्येही त्यांच्या अशा देवता आणि उपासना पद्धती होत्या. म्हणजेच अध्यात्म ही माणसाची आदिम गरज आहे. म्हणूनच द्रष्टे महानायक बाबासाहेब आंबेडकरांनीही बौद्ध धर्म स्वीकारला, पण हिंदू धर्म सोडून नास्तिक किंवा निधर्मी होण्याचा उपदेश केला नाही. डावे-विचारवंत वगैरे म्हणवणाऱ्यांचा कार्यालयातही लेनिन-स्टॅलिनची छायाचित्र असतात आणि दास कॅपिलट-कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हे त्यांचे धर्मग्रंथच झालेले आहेत. त्यांच्या तत्वज्ञानावर ‘विश्वास(श्रद्धा)’ ठेवावी असा त्यांचाही आग्रह असतोच.


मग आध्यात्मिक गरज अमान्य करून त्यापासून पळण्यापेक्षा ती स्वीकारून आपल्या सांस्कृतिक संचिताचा अभ्यास करण्यात किंवा निदान जो कोणी तो करत असेल, त्याचे कौतुक करण्यात काय पाप आहे! संस्कृत वाङ्मयाच्या निर्मितीत ब्राह्मणेतरांचेही योगदान असल्याचे असंख्य पुरावे उपलब्ध आहेत. स्वत: वेदव्यासांचा जन्म मत्सकन्येच्या पोटी झाला. वाल्मिकी अब्राह्मण, गायत्री मंत्राचे कर्ते विश्वामित्र क्षत्रिय, कालिदासही ब्राह्मणच असल्याचा काही पुरावा नाही. हे जर आपण स्वीकारणार असू तर सारं वैदिक वाङ्मय आपल्याला आपलं वाटू लागेल. पण ते आपलंस करण्यासाठी कष्ट मात्र घ्यावे लागतील. कारण ही वडिलोपार्जित मिळकत खरी, पण ती काही फक्त सात-बाराने आपलीशी होणारी नाही.


यात आणखी एक बागुलबुवा दाखवण्यात येतो, की या सगळ्याच्या नादी लागाल तर ब्राह्मण तुम्हाला बौद्धिक दास बनवतील किंवा तुम्हाला जाती वर्चस्व मान्यच करावे लागेल. याची तर आता सूतराम शक्यता नाही. उलट आपली शास्त्र आपणच जाणल्यामुळे प्रत्येक जातीत पुरोहित निर्माण होतील आणि आज आपण जसे जात न पाहता घराच्या फर्निचरच काम उत्तम कारागिराला देतो किंवा चांगली सेवा मिळते त्या सलोनमध्ये जातो, तोच प्रकार भिक्षुकांच्या बाबतीतही होईल. निदान व्हायला पाहिजे असा आशावाद आपण बाळगू शकतो. माझ्या पाहण्यात असे काही ब्राह्मणेतर भिक्षुक-पुजारी आहेत. तसंच ज्यांना यातलं काही न करता स्वांत सुखाय आवश्यक तेव्हढं जाणून घ्यायचं असेल, त्यांना तीही मुभा आहेच की. हिंदू धर्मात कुठे कशावर सक्ती आहे!

शनिवार, १० मे, २०२५

लढले नसते तर शिवराय आपला आदर्श असते का?

सध्या जो उठतोय तो युद्ध कसं विनाशकारी असतं आणि त्यामुळे कशी जीवित आणि वित्तहानी होते, हे सांगायला लागलाय. युद्धनंतर नेते मोठे होतील आणि सैनिक, नागरिक हकनाक मारले जातील वगैरे भावूक पोस्ट फोटो-व्हिडिओसह शेअर होऊ लागल्या आहेत. या साऱ्याचा सैनिकांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनोबलावर किती विपरित परिणाम होत असेल याचाही विचार केला जात नाही.

मूळात भारताने कोणतीही युद्धखोरीची कृती केलेली नाही. आज वर्षानुवर्षे आतंकवादाच्या माध्यामातून भारताशी छुपे युद्ध (प्रॉक्सी वॉर) करणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात कोणतीच लष्करी कारवाई करू नये, असं या लोकांच म्हणणं आहे का? बरं, प्रत्युत्तर द्यायला केंद्राकडून विलंब होत होता, तेव्हा हीच मंडळी कारवाई होत नाही म्हणून गळा काढत होती. आता कारवाई झाल्यावर, त्यांना युद्ध नकोय. अरे, आपल्या कारवाईचा परिणाम म्हणून जर आपल्यावर युद्ध लादलं जात असेल, तर ते आपण लढायला नको का? आणि एकदा लढाईला उभे राहिल्यावर, अरेरे इतकं नको करायला, हे क्षेपणास्त्र नको डागायला, जास्त लोकांना नको त्रास व्हायला, हे म्हणण्याला काय अर्थ आहे. युद्ध म्हटलं की युद्ध, ते भीषणच असणार, त्यात दोन्ही बाजूंनी जीवितहानीही होणारच, शत्रूच्या डावपेचांना उत्तर म्हणून आपल्याही सैन्याला रुद्रावतार धारण करावाच लागणार, वेळप्रसंगी नागरिकांचीही ससेहोलपट होणार, अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार, हे सगळं अध्याहृत असतानाही प्रत्येक व्यक्तीला काय किंवा राष्ट्राला काय कधी ना कधी युद्धाला सामोरं जावंच लागतं.

केवळ आणि केवळ दुष्टांच्या सत्तेसमोर झुकायचं नाही, म्हणून आजन्म जीव धोक्यात घालणाऱ्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राने युद्धाची तमा बाळगावी, याचच आश्चर्य वाटतं. युद्ध नको, संहार नको, जीवाला धोका म्हणून आपले शिवराय जर मिर्झाराजे जयसिंगासारखे मुघलांचे मांडलिकत्व पत्करून सुरक्षित, चैनीच आयुष्य जगले असते, तर आज ते आपले आदर्श असते का? शिवरायांनी त्यांच्या उक्ती-कृतीतून आपल्याला काय शिकवलं. सृष्टांचा सांभाळ करण्यासाठी दृष्टांचा संहार, हेच त्यांच्या जीवनाचं सूत्र होतं ना? त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी किती सोसलं, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.

आज वेळ आपली आहे, शिवराय केवळ शिवजयंतीच्या कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता आपल्या जीवनात त्याचं अनुकरण करायला हवं. माणुसकीच्या शत्रूसमोर ताठ मानेनं उभं राहायला हवं. विशेष म्हणजे त्यासाठी आपल्याला काहीही विशेष करायचं नाहीये. सगळं काही आपली सेनादलं आणि शासनच करणार आहेत. आपल्याला फक्त त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनोबलावर परिणाम करेल, असं कोणतंही वर्तन करायचं नाहीये. सैन्य आणि शासनाकडून येणाऱ्या सूचनांचं काटेकोर पालन करायचं आहे. तितकंही जर आपण करू शकलो नाही, तर आपण उद्याच्या इतिहासातले अण्णोजी दत्तो असू.


ता.क.: थेट युद्धछायेत असणाऱ्या लोकांसाठी गळा काढणाऱ्यांसाठी सांगतो. मी सध्या माझ्या पत्नी आणि साडे-चार वर्षांच्या मुलासह ब्लॅकआउट सुरू असलेल्याच भागातच राहतोय.

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५

'छावा' डाव्यांचा की उजव्यांचा?

हल्ली कोणताही ऐतिहासिक चित्रपट आला की, तो उजव्यांचा की डाव्यांचा हे आधी ठरवलं जातं. एकदा तशी शिक्कामोर्तब झाली की मग लगेच त्याचे समर्थक आणि विरोधक सोशल मीडियावरून रान उठवायला सुरुवात करतात. ‘छावा’मधूनही बामणे, भटूकडे, मनुवादी, संघी, हिंदुत्ववादी, उजवे आणि ‘चळवळी’तले, डावे, समाजवादी, सेक्युलर, फेक्युलर, ब्रिगेडी, बहुजनवादी अशा बिरुदांनी ओळखल्या जाणाऱ्या दोन प्रमुख गटांना त्यांच्या संकल्पनेतले छत्रपती संभाजी महाराज मोठ्या पडद्यावर पाहायचे होते. बरं, या दोन्ही गटांच्या समर्थकांची संख्या इतकी लक्षणीय आहे की, यातल्या एकाही गटाच्या मनातील ‘शंभू-प्रतिमेला’ धक्का लावणारं काही चुकूनही दाखवणं निर्माता चमूला व्यावसायिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं. पण वरील दोनपैकी एका गटात मोडणारा असं या चित्रपटाचं वर्गीकरण चटकन प्रेक्षकांना करता न येणं, याचाही या चित्रपटाच्या यशाला हातभार आहे.

संपूर्ण चित्रपट छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई याभोवतीच फिरणारा आहे. एकट्या मुघलांशी पाण्यातून, जंगलात, किल्ल्यावर अशा तीन-चार लढाया दाखवण्याऐवजी, जंजिऱ्याचा सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज आणि म्हैसूरचा चिकदेव अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेच्या लढाया दाखवायला दिग्दर्शकाला आयते अॅक्शन प्लॉट उपलब्ध होते. त्यातही जंजिऱ्याची नाविक लढाई वेगळेपणानेही दाखवता आली असती. पण हे सर्व मोह टाळून त्याने फक्त औरंगजेब खलनायक आणि संभाजीराजे नायक हेच चित्रपटाचं सरळसोट सूत्र ठेवलं. यामुळे संभाजीराजांच्या युद्धनीतीबद्दल अधिकाधिक माहिती पोहोचवता येण्याची संधी हुकली असली, तरीही ज्यांना संभाजीराजांबद्दल फारसं माहिती नाही, त्यांना नायकविरुद्ध खलनायक हे थेट समीकरण समजून घ्यायला सोपं झालं.


चित्रपटाचे कथानक सोपं करणारा हाच दिग्दर्शक उपरोक्त दोन गटांमधील वर्गिकरणाच्या तडाख्यातून सहीसलामत बचावून नेणारे काही प्रसंग चित्रपटात किती खुबीने पेरतो पहा. संभाजीराजे बुऱ्हाणपूरच्या स्वारीवरून परततात, तेव्हा त्यांच्या हस्ते भेट-वस्तू स्वीकारणारी एक मुसलमानी पगडी आवर्जून दाखवली जाते - सेक्युलर खूश. अनाजी पंताला हत्तीच्या पायांखाली देण्याचा भव्य सीन - बामण्यांचे विरोधक खूश. आता राहिले उजवे. एरव्ही संपूर्ण चित्रपटातल्या कोणत्याही लढाईत मुघल सैनिकांच्या तोंडी चुकूनही ‘दीन-दीन, अल्लाहू अकबर’ अशी कोणतीही घोषणा नाही. बुऱ्हाणपूर लुटीच्या प्रसंगात तर मराठे आल्याचं कळल्याबरोबर गढीच्या दाराजवळ धावून आलेल्या सैनिकांना आवेशाने तोंडतून बाहेर पडेल अशी युद्धघोषणाच दिलेली नसल्याने ते बावचळून नुसते ‘एSSS’ ओरडताना दिसतात. पण हा चित्रपट उजव्यांसाठीही करायचा आहेच. त्यामुळे अगदी शेवटाकडच्या प्रसंगात औरंगजेब पुटपुटतो, ‘...सिर्फ तुम्हे अपना धर्म बदलना पडेगा’.


सध्या सोशल मीडियावर उपरोक्त दोन्ही गटातील मंडळींच्या ज्या पोस्ट फिरतायंत, त्या पाहिल्या की दिग्दर्शकाने ‘छावा’ची नौका बॉक्स ऑफिसवर ‘गटां’गळ्या खाऊ नये म्हणून केलेल्या तारेवरच्या कसरती सार्थकी लागल्याचं दिसेल. कुणी म्हणतंय, ‘गद्दार बामण्यांना कसं हत्तीच्या पायी दिलयं ते पाहायचं असेल, तर छावा पहा.’ कुणी म्हणतंय, ‘हिंदू धर्माच्या अस्मितेसाठी बलिदान कसं करावं याची प्रेरणा घ्यायची असेल, तर छावा पहा.’ गंमत म्हणजे, ‘ब्रिगेडींच्या अपप्रचाराला बळी पडू नका आणि बामणी काव्याला भूलू नका,’ अशा नांदीने सुरुवात होणाऱ्या या दोन्हीकडंच्या प्रचारनाट्यांचं भरतवाक्य मात्र, ‘तर छावा पहा’, हेच आहे.


भूतकाळात होऊन गेलेल्या महनीय व्यक्ती या त्यांच्या कालखंडात आणि प्राप्त परिस्थिती त्यांना जे सर्वाेत्तम करता येणं शक्य होतं, ते केल्यामुळेच आदरणीय-वंदनीय ठरत असतात. त्यांच्या जीवन चरित्राचा उपयोग सध्याच्या राजकीय किंवा सामाजिक परिस्थितीत आपापल्या विचारधारेला टेकू म्हणून करणारे लोकं, कोणत्याही महापुरुषाचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यात यशस्वी ठरणं कठीणच असतं. ‘आम्हीच खरा इतिहास सांगतो’, असा कंठशोष करणाऱ्या या मंडळींचं म्हणणं खरंतर, ‘आम्ही सांगतो तोच खरा इतिहास आहे,’ असंच असतं. इतिहास हा कितीही निष्पक्षपातीपणे लिहिण्याचा प्रयत्न केला तरीही तो सापेक्षच असतो. त्यामुळे त्याला खऱ्या-खोट्याच्या तगडीत तोलण्याचे प्रयत्न फोल ठरतात. दुर्दैवाने, सांप्रतचे अभिनेवेश बाजूला ठेवून इतिहासाकडे पाहू शकणारे जनमतच सध्या क्षीण होत चालले आहे. त्यामुळेच कोणत्याही ऐतिहासिक कथानकाला हात घालणाऱ्या दिग्दर्शक-निर्मात्यांना उतेकर यांच्यासारखी तारेवरची कसरत करण्याला प्रत्यवाय राहत नाही.


सुदैवाने जेव्हा, ‘श्रूती धन्य जाहल्या, श्रवून अपूलि वार्ता, रण सोडून सेना सागर अमूचे पळता’ अशा ऐतिहासिक तथ्याला अजिबात धरून नसलेल्या कवितेच्या ओळी असलेला ‘विशाखा’ प्रसिद्ध झाला, तेव्हा ‘सत्य इतिहास संशोधकां’चे गल्लोगल्ली पेव फुटायचे होते. नाहीतर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या तेजस्वी स्फूर्तीगीताची भ्रूणहत्याच झाली असती. ‘हाताशी थोडी-फार मुलं असती, तर कोणीही किल्ले घेतले असते, शिवाजीने किल्ले घेतले त्याचा आम्हाला का त्रास’, असले विनोद करणाऱ्या पुलंना अभिनिवेशी नवइतिहासकारांनी मनुवादी किंवा राष्ट्रद्रोही या गटात टाकलं असतं. एकंदरीतच, ऐतिहासिक आशय(कंटेंट) आणि ऐतिहासिक कथानकावर बेतलेला ललित आशय या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि दोन्हीच्या प्रसूतीचे हेतूही भिन्न आहेत, याची जाणीव त्या पिढीत शाबूत होती. आता अभिनिवेशाच्या वेष्टनात गुंडाळून इतर सर्वच जाणिवा गंजवून सोडण्याचा एककलमी कार्यक्रम सर्वच राज्यकर्त्या आणि समाजकर्त्या मंडळींनी हाती घेतला आहे आणि त्यासाठी त्यांच्या हाती लागलेले सर्वात घातक शस्त्र आहे, ते म्हणजे ‘सोशल मीडिया’!


- संकेत सातोपे

बुधवार, १२ जुलै, २०२३

गच्चीची माडी होते तेव्हा

तशी ती संस्कारी घरातली; घरी स्नान-संध्या, उदात्त विचारांची देवाण-घेवाण, विचारवंतांची उठबस, वगैरे, वगैरे नित्यक्रम. पण काहीशा ठेगण्या, कृश कमलला, आपल्याला कुणी वरेल याची खात्रीच नव्हती. हा न्यूनगंड घेऊन अनेक नकार पचवतं, ती रोज सायंकाळी घराच्या गच्चीत खालून जाणाऱ्या वाटसरूंकडे शून्य नजरेने पाहात बसायची.

पण! प्रत्येकाचा येतो तसा तिचाही एक दिवस आलाच. सहज म्हणून त्याने नजर वर केली, ती या हताश विवाहेच्छुकीशी भिडली. तरण्याबांड पण काहीशा उनाड आणि टर्रेबाज अशा या मुलालाही त्याची नित्य मुजोरी चालवून घेणारी एखादी अबला संसार रेटायला हवीच होती. दोघांचीही गोत्रे भिन्न पण जाती एक, म्हणून घराचांनीही बिनबोभाट पसंती दिली.


झाला दोन गरजूंचा संसार उभयतांची गरज होती, तोवर चांगला वीसएक वर्षं चालला. पण आता कमलही चांगली कमावती होऊन, तिचा न्यूनगंड पार चेपला गेला होता. ती मुजोरी चालवून घेईना. त्याच्यातही आता वयोमानपरत्वे रेटून नेण्याची पहिली उमेद उरली नव्हती. शेवटी प्रकरण विकोप्याला गेले. पण विभक्त होउनही एकेकट्याने दोघांचा पाड लागेना. म्हणून डोक टेकायला त्यांनी खांदे शोधलेच. अर्थातच समाजाने ही नाती अनैतिक ठरवली. 


पण माणसाला एकदा अनैतिक सुखाची गोडी लागली की, त्याचा पाय कुठवरं घसरेल याचा नेम नाही. ज्या गच्चीतून संध्येचे बोल कानी घेत ती खाली बघायची, तिथेच ती आता सुगंधी गजरे माळून वाटसरूंकडे प्रणयोत्कट कामेच्छेने पाहू लागली. अरे, तो एक नाही तर त्याच्यासारखे छप्पन, अशा अहंगंडाने कालच्या हताशेची जागा घेतली होती. त्याला धडा शिकवण्याच्या ईर्ष्येत आपण स्वत:च चारित्र्य पणाला लावत आहोत, याची पुसटशीही जाणीव तिला नव्हती. तिला फक्त डाव जिंकायचा होता. त्यासाठी कितीही आणि कोणत्याही पुरुषांना छाताडावर नाचवायची तिची तयारी होती.


अखेर व्हायचं तेच झालं. कालच्या या सुसंस्कृत गच्चीची, आज उपभोगलोलूप माडी झाली. आता या माडीचे जिने कोण-कोण चढतं असतील!? सुज्ञास सांगणे न लगे.


  • संकेत सातोपे


(तळटीप: ही एक सामाजिक क(व्य)था आहे; राजकीय नव्हे.)

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

कोकणी चष्म्यातून वैदर्भी बोली



माझे एक जेष्ठ सहकारी इरसाल नागपुरीत मला नेहमी म्हणायचे, 'जा बे, तुम्ही मुंबई-कोकणातले लोकं! तुमच्यासाठी महाराष्ट्र सिंधुदुर्गात सुरू होतो आणि रत्नागिरी- रायगडमार्गे मुंबईत येऊन संपतो. त्याच्यापुढे तुम्हाला थेट यूएस-यूके किंवा सिंगापूरच लागतं.' या गमतीमागच्या वास्तवाची सर्वाधिक जाणीव मला '१० नोव्हेंबर २०१९' या दिवशी विदर्भकन्येचं पाणिग्रहण केल्यापासून व्हायला लागली. विदर्भातल्या चालीरिती, बोली, समस्या तर सोडाच; पण विदर्भात नेमके किती आणि कोणते जिल्हे आहेत, याचीसुद्धा माहिती मुंबई-पुण्यात बसून अखंड महाराष्ट्रासाठी कंठशोष करणाऱ्या किती जणांना असेल याबाबत शंकाच आहे. हिंगोली, वाशिम, गोंदिया या नावाचे जिल्हे महाराष्ट्रात आहेत, याचा पत्ताही नसलेले महानगरी-महाराष्ट्रप्रेमी- महाभाग माझ्या पाहण्यात आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाबाबतचा अभिनिवेश व्यक्त करताना आचार्य अत्रे म्हणाले होते, अन्य राज्यांना फक्त भूगोल आहे, आमच्या महाराष्ट्राला इतिहास आहे. महाराष्ट्राचे एकंदर राजकारण- समाजकारण हे अशाच अभिनिवेशावर चालतं. त्यामुळेच इतिहासकार मेहेंदळे म्हणतात त्याप्रमाणे, 'आपल्याकडे इतिहास हा अभ्यासाचा नव्हे तर भावनेचा विषय आहे.' तीच गत भूगोलाचीही आहे.

पण गेल्या वर्षभरात 'करून राहिले, बोलून राहिले,'च्या पलीकडील वैदर्भीय भाषिक व्यवहारातील अनेक वैशिष्ट्यं मला हेरता आली, अनेक नवीन शब्द कळले, काही शब्दांच्या भिन्न अर्थछटांशी तोंडओळख झाली. वैदर्भीय बोलीवरील राष्ट्रभाषेचा अतिरिक्त प्रभाव तर सर्वपरिचित आहे. त्यातूनच दुहेरी क्रियापदं वापरण्याची पद्धत रूढ झालेली आहे. हिंदीतील 'क्या कर रहे हो'चेच शब्दशः मराठीकरणं म्हणजे 'काय करून राहिले आहेत'. तसंच 'आमच्याकडे हे असं असतं', 'माझ्या पिशवीत खाऊ असतो'; याऐवजी हिंदीतील 'रहता है' प्रमाणे 'आमच्याकडे हे असं राहातं', 'माझ्या पिशवीत खाऊ राहातो', असं बोललं जातं. हिंदीप्रमाणे दोन क्रियापदं वापरायची ही सवय या बोलीत इतकी भिनली आहे की, जेव्हा अशी दोन क्रियापद योजता येत नाहीत तेव्हा एकच क्रियापद दोन वेळा उच्चारला जात. उदाहरणार्थ, हे 'घेऊन घ्या' ना; ते 'देऊन द्या' ना. वस्तुतः मराठीत 'द्या, घ्या' इतकंच पुरेसं आहे. पण इतकं लहान क्रियापद वापरणं अस्सल वैदर्भी जिभेला सोसणारच नाही. हल्ली प्रमाण मराठीमध्येही 'खूप सारे' असा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. हासुद्धा अशाच प्रकारचा आहे. खरंतर मराठीत 'खूप' हा शब्द परिपूर्ण आहे. पण हिंदीत 'ढेर सारे' या दोन शब्दांचा मिळून अर्थ बनतो, त्याच्याच (चॅनलीय) प्रभावामुळे आता मराठीच्या माथीही 'खूप सारे' आला आहे. यातल्या 'सारे' चा अर्थ खूपच्या जवळपासही जाणारा नाही. असो!


विदर्भातल्या या दुहेरी क्रियापद पद्धतीचा एक लाभही आहे. तो म्हणजे प्रमाण मराठीत जी क्रियापद मुळातच दुहेरी आहेत आणि केवळ बोलीभाषेच्या सोयीसाठी ती जोडून किंवा एकत्र करून वापरली जातात, ती क्रियापदं ही मंडळी सवयीने सहजच प्रमाण मराठीत बोलतात. उदाहरणार्थ, 'काय करतोयस ऐवजी काय करत आहेस, मी येतोय ऐवजी मी येत आहे. तो जातोय ऐवजी जात आहे.' क्रियापदांच्या बाबतीतलं एक गणित मात्र मला अजून सुटलेलं नाही. ते म्हणजे, 'बोलल्या जात आहे, केल्या जात आहे, वापरल्या जात आहे.' यातले सगळे 'ले' वैदर्भीय मराठीत 'ल्या' का होतात? हा प्रभाव बंगालीचा असावा, असा माझा बाळबोध कयास आहे.


वाक्यरचनेबाबत आहे तसेच काही शब्दप्रयोगांच्या अर्थछटांबाबतही भेद (विशेषतः वऱ्हाडात) पाहायला मिळतात. म्हणजे फजिती होणे हा शब्दप्रयोग, मुंबई-पुण्यात जसा 'चारचौघात फजिती झाली, शाहिस्तेखानाची फजिती केली' अशा अर्थछटेसह वापरला जातो, तसा विदर्भात नाही. तिथे कोणत्याही प्रकारची अडचण होणे म्हणजे फजिती होणे. उदाहरणार्थ, लॉकडाऊनमध्ये बाहेरून काही मागवता येत नाही, फार फजिती झाली आहे; रेल्वेचं तिकीट मिळालं नाही, फजिती झाली. असाच काहीसा प्रकार 'तंतोतंत'च्या बाबतीत, 'तो अगदी तंतोतंत पोहोचला', म्हणजे वेळेत नव्हे तर वेळ संपता संपता. 'कीव येणे' हा शब्दप्रयोग थेट 'दया येणे' याच अर्थी वापरला जातो. आणि 'गाडी समोर घ्या, दुकान आणखी थोडं समोर आहे' याचा अर्थ 'पुढे आहे' असा असतो. असे अनेक शब्दप्रयोग आहेत, जे सध्याच्या मुंबई-पुण्यातल्या बोलीपेक्षा काहीशा वेगळ्या पद्धतीने-अर्थाने वापरले जातात.


वाक्यरचना, अर्थभिन्नतेबरोबरच काही शब्दही चटकन लक्षात न येणार असतात. कोथिंबीरला सांबार म्हणतात हे बहुतेकांना माहीत असेल, पण टोप-भांड्याला गंज म्हटलं जातं. धुण्याच्या कपड्यांना पारथे, कोळ्याला कातीण, आंधळ्याला भोकना, बेचकीला गुलेर म्हटलं जातं. भयाड म्हणजे बावळट, चटोरी म्हणजे हावरट आणि मधात भेटू म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी असा अर्थ घ्यायचा असतो. लुस्त हा हिंदीतल्या चुस्तचा विरुद्धार्थी शब्द आहे. बारीक होण्याला रोड होणे आणि चुका काढण्याला कुच्या काढणे म्हटलं जातं.


कोकणी आणि नागपुरी मराठीत सगळ्यात मोठा भेद आहे तो लहजाचा. कोकणात साधा 'हो'सुद्धा 'होsssय' असा हेल काढून बोलला जातो आणि नागपुरीत कोणताही शब्द न ताणता अगदी थेट! पण हे असे कितीही भेद दाखवता आले, तरीही ही दोन्ही एकाच मायमराठीची लेकरं आहेत. त्यामुळे त्यांच्यात गोडवा मात्र तोच आहे, अमृताशी पैजा जिंकणारा!


© - संकेत सातोपे

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

मराठमोळे कोकण 'महामुंबई'च्या वाटेवर!

कशेळी…! उण्या-पुऱ्या दोन-अडीच हजार लोकसंख्येचं एक अस्सल कोकणी खेडं! वर्ष-दोन वर्षांमागे गावात लग्नाच्या पंगती उठत होत्या आणि बाहेर सायकलवर एका कुल्फीवाल्याने धंदा थाटला होता. तोडक्या- मोडक्या मराठीच्या आधाराने तो गल्ला जमवत होता. काही वेळाने लक्षात आलं की तो 'भय्या' आहे. रोजगाराच्या संधीच्या शोधत जिथले गावकरी वर्षानुवर्षं चाकरमानी झाले आहेत; त्या गावात याने शेकडो मैलांवरून येऊन रोजगार मिळवलेला पाहून जरा आश्चर्यच वाटलं.

कोकणाचं कॅलिफोर्निया होईल की नाही ते माहीत नाही; पण (राजकारणात अडकलेले) जैतापूर-नाणारसारखे येऊ घातलेले प्रकल्प पाहिले, तर कोकणाची लवकर महामुंबई होणार हे नक्की. चिपळूण-दापोली भागात लोढाने बांधलेल्या घरांच्या जाहिराती वरचेवर पाहायला मिळत आहेत. रत्नागिरीसारख्या शहरातील व्यवसायावर तर केव्हाच मारवाड्यांनी पकड बसवायला सुरुवात केली आहे. बोरकरांच्या कवितेतलाही 'मत्स्यगंध वारा' सोसणार नाही, अशा जैन वसाहतीही कुठे-कुठे नाक वर काढताना दिसत आहेत. आंबे काढणीसाठी नेपाळ्यांचे जथ्थेच्या जथ्थे इथे मुक्कामाला असतातच. कोकण बदलतंय, खूप वेगाने! विविध प्रकल्प सुरू झाल्यानंतर तर स्थलांतर आणखी वेग घेणार आहे. आता कोकणी माणूस या वेगावर स्वार होतो की अन्य स्वारांच्या वेगाखाली भरडला जातो, ते येणारा काळच दाखवेल.


रोमपासून ते इंग्लंडपर्यंत व्यापार करणाऱ्या कोकणाने आजवर अनेक स्थित्यंतर पाहिली. मुळात किनारपट्टीचा भाग असल्यामुळे अन्य कोणत्याही भूवेष्टित प्रदेशापेक्षा सहस्रो मैलांवरून येणारे बदल येथे देशी सरमिसळ न होता थेट आले. हेच पहा, बुरख्याचं भारतीयकरण होताना उत्तरोत्तर घुंगट-पदर असे बदल झाले. म्हणजे खुश्कीच्या मार्गाने आलेल्या इस्लामचा सर्वांत जास्त प्रभाव उत्तरेकडच्या राज्यांवर पडला, त्यामुळे तिथे अगदी बुरख्याच्या जवळ जाणारी घुंगट पद्धत आलेली दिसेल. पण महाराष्ट्रात केवळ 'डोईवर' पदर घेण्याची प्रथा! तेच आणखी जसजसे खाली-खाली जालं, तसं डोक्यावर पदर घेणं कमी कमी होत, केरळमध्ये तर अशी पद्धतच मुळी नाही. कथ्थक आणि भरतनाट्यम् चे पेहराव डोळ्यांपुढे आणून पहा, त्यातही या 'प्रभावां'मधलं अधिक-उणेपण लक्षात येईल. कोकणात मात्र शेकडो मैलांवरून शेकडो वर्षांपू्र्वी आलेल्या चालीरिती- बोलीच काय जनजातीसुद्धा त्यांची शारीरिक वैशिष्ट्यं बहुतांश जशीच्या तशी वागवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. निळे डोळे, श्वेतच म्हणावा असा गोरा वर्ण, वांगाचे ठिपके ही आजही ठळकपणे दिसणारी वैशिष्ट्यं उष्णकटिबंधीय दमट वातावरणात नक्कीच निर्माण झालेली नसणार. अलिबागच्या किनाऱ्यावर सिनेगॉग उभारणारे आणि कोकणी 'करां'ती आडनावं घेऊन इस्रायलला परतलेले ज्यू किंवा अगदी मराठी भाषक झालेले गोव्याच्या किनाऱ्यावरील हबशी, हे सगळेच थेट कोकणात आले आणि त्यांच्यावर कोकणी मातीतच देशीकरणाचे षोडशोपचार झाले. त्यामुळे या लाल मातीला स्थलांतरं नवीन नाहीत.


बदल स्वीकारत गेलो, तर प्रवाहीपण राहतं; नाहीतर माणसाचं काय किंवा समाजाचं काय डबकं होऊन जातं. पण बदल आंब्यावर पायरी-हापूसऐवजी शेवग्याचं कलम करणारे असले, तर मात्र ते झाडाच्याच मुळाशी येऊ शकतात. हेच मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये झालेलं आपण आज पाहात आहोत. या गल्लेभरूंच्या पाशवी स्थलांतरात सर्वांत पहिला बळी जातो तो स्थानिक संस्कृती आणि त्याचा अविभाज्य घटक असलेल्या भाषेचा. तो जाऊ द्यायचा नसेल, तर राजकीय नव्हे तर वैयक्तिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. कारण भाषेच्या काय किंवा धर्माच्या काय राजकारणाने मोठे होतात ते नेते आणि पक्ष; भाषा किंवा धर्म नव्हे. वर्षभर बंगळुरात राहिल्यानंतर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, दक्षिणेत त्यांच्या भाषा टिकवल्या त्या भाषकांनी नेत्यांनी नव्हे. तिथे प्रत्येक माणसाला आपल्या भाषेचा केवळ अभिमानच नाही, तर गरजही वाटते. आपल्या भाषेत आपल्याला अधिक चांगलं कळतं, व्यक्त होता येतं, याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळेच त्यांना एखादा दुकानदार आपली भाषा बोलत नाही म्हणून त्याला थोबडावून काढ, कधी २-५ टॅक्सी फोड, मातृभाषेच्या जतनासाठी परिसंवाद-संमेलनं घे, असल्या बोथट तलवारींनी लढावं लागत नाही. 'केवळ अभिनिवेश म्हणून नव्हे, तर स्वाभाविकरित्याच आम्ही आमच्या भाषेत चित्रपट पाहतो, तुमच्या भाषेतला तुम्ही डब करून आणलात तरच तो आम्हाला कळतो; तुम्ही आमच्या भाषेत विकायला आलात तरच आम्हाला तुमच्या वस्तू घेता येतील, नाहीतर आम्हाला व्यवहार करणंच कठीण आहे. हा अगदी कुठलाही गाजावाजा न करता बनून गेलेला घरोघरीचा स्वभावधर्मच आहे. त्यामुळे मी पत्रकारांशी हिंदीत बोलणार नाही, हा तिथला राजकीय स्टंट नसतो, तर सहजकर्म असतं आणि ते इथे येणाऱ्यांच्याही सहज अंगवळणी पडलेलं दिसतं. दोन-दोन पिढ्या मुंबईत राहूनही दुकानदार मराठीत ४ वाक्य बोलू शकत नाहीत. पण १०-१२ वर्षं दक्षिणेत राहिले की स्थानिक भाषेत सहज व्यवहार कसे करू शकतात, याचं उत्तरही या 'स्वभावधर्मातच' आहे.


एखाद्या मालिकेत कुणीतरी मुंबईची भाषा हिंदी आहे म्हटल्यावर आम्ही त्यांना धमकावतो, त्यांच्याकडून तोंडदेखली क्षमायाचना करवून घेतो आणि मराठीचं संवर्धन झाल्याच्या मस्तीत पुन्हा वावरायला लागतो. असले शेकडो तोंडपूजे माफीनामे सत्ताधाऱ्यांना पाठवून त्यांच्या नाकाखालून आपल्या स्वराज्याच्या ध्वज उभारणाऱ्या शिवछत्रपतींचा आदर्श नक्की घेतलाय तरी कुणी? बिनबोभाट कार्यसिद्धी महत्त्वाची की प्रसिद्धीचा भपका? तलवार की मखमली म्यान? करवंट्या की खोबरं? हे प्रश्न राजकारण्यांसाठी नव्हे, तर तुमच्या माझ्यासाठी आहेत. कारण राजकारण्यांना फक्त तलवार म्यानातून काढून व्यासपीठावर दाखवायची आहे. रोजची अटीतटीची लढाई लढायचीय ती, तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांना.


कोळ्यांच्या मुंबईत माशांचा वास सहन न होणाऱ्या वसाहती उभ्या राहिल्या आहेत आणि पर्युषण पर्वात मांसविक्री बंद ठेवण्याची सक्ती करण्यात येत आहे. दैनंदिन व्यवहारातील मराठीशी अन्य भाषकांची सोडाच, मराठी माणसाचीही नाळ केव्हाच तुटली आहे. एकंदरीतच आगरी-कोळ्यांच्या मुंबईचा तोंडवळा आपल्याला मराठमोळा राखता आलेला नाही, हे अपयशी वास्तव आता मान्य करून निदान अन्य ठिकाणी तरी वेळीच जागं होण्याची गरज आहे. नाहीतर मुंबईप्रमाणेच कोकणातही लवकरच 'पयल नमन'ऐवजी, 'हमार ललनवा' चे स्वर ऐकू येतील. शिमग्याऐवजी छटपूजेच्या वेळी कोकण गजबजेल आणि 'कोकणी माणसाचे मुख्य अन्न कोणते? या प्रश्नाचं उत्तर भात व मासे असं देता येईल, पण ते इतिहासाच्या पेपरात; भूगोल किंवा परिसर अभ्यासाच्या नव्हे!


© - संकेत सातोपे

शनिवार, १८ जुलै, २०२०

विकास दुबे आणि न्यायव्यवस्था



कानपूरचा गुंड विकास दुबे असो की हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपी, पोलिसांच्या गोळ्यांनी कुणी ठार झाले की समाजातील मोठ्या वर्गात समाधानाची आणि न्याय झाल्याची भावना निर्माण झालेली दिसते. त्यानंतर ‘न्यायव्यवस्थेला बगल देऊन केलेला हा ‘न्याय’ कसा घातक आहे’ ते ‘असाच झटपट न्याय झाला पाहिजे’ अशी नेहमीचीच परस्परविरोधी मतमतांतराची वावटळही उठताना दिसते. पण जनमत हे असे होण्याचे कारण काय? या मूलभूत गोष्टीबद्दल कुणी फारसे बोलताना दिसत नाही. न्यायालयात जाऊन न्याय मिळणार नाही, तो असा बाहेरच मिळवायला हवा, अशी जर समाजधारणा झाली असेल तर ती का झाली याचा शोध घेणे आणि ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणे हे संबंधित व्यवस्थेचे कामच नाही का? पोलिसांनी कायदा हातात घेतला तर उद्या अराजक माजेल, असे म्हणताना जनतेचा न्यायपालिकेवरील विश्वास उडाल्यानेही असेच अराजक माजते हेही लक्षात घेतले पाहिजे.

शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, यासारख्या उक्तींमधूनही न्यायव्यवस्थेबाबतचा अविश्वासच प्रतित होत असतो. आपल्यावर होणारा शारीरिक, मानसिक वा सामाजिक अन्याय कोर्टात जाऊन दूर करून घेता येईल, असा विश्वास अशिक्षित, दीन-दुबळ्यांना सोडाच, पण सजग सुशिक्षितांनाही वाटत नसेल, तर ही व्यवस्था कुणासाठी आहे? आजोबांनी घातलेल्या दिवाणी दाव्यांचा निकाल नातवाच्या काळात लागल्याचे किस्से आपण घरोघरी गमतीने ऐकतो. चुकून-माकून न्यायालयाशी संबंध आलाच तर वकिलांची मुजोरी, तारीख-पे-तारीखच्या भानगडीत वेळ-पैशांचा बेसुमार अपव्यय, आपल्या बाजूने सोडा पण जो काही निकाल लागायचा आहे तो लागावा, या प्रतीक्षेत सरणारी उमेद, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून हा अविश्वास निर्माण होत आला आहे. म्हणूनच शिवीगाळ-छेडछाड-हाणामारी असो की एखादे मालमत्तेचे प्रकरण सर्वसामान्य माणूस आधी कोर्टाचे नव्हे, तर एखाद्या प्रभावी व्यक्तीचे पाय धरतो. यातूनच गावगुंडांना महत्त्व येते आणि पुढे त्यातलेच काही राजकारणात शिरून कायदे मंडळात जाऊन बसतात. ज्याची न्यायालयाबाहेरच भानगडी करण्याची आणि सोडवण्याची क्षमता अधिक तो सामान्यांचा मसिहा ठरतो. त्यामुळेच गुंड ठरवून गोळ्या घालण्यात आलेल्याच्या नावे रुग्णवाहिका फिरताना, सार्वजनिक उत्सव होताना दिसतात. अशा लोकांवर कारवाईलाही काही वेळा स्थानिकांचा विरोध होतो. या सगळ्या गोष्टी न्यायलय आणि जनता यांच्यातील दरी अधोरेखित करणाऱ्याच आहेत.

दुसरीकडे न्यायव्यवस्थेतील या दिरंगाईचा लाभ उठवणारेही लोक दिसतात. मग अनाठायी जनहित याचिका दाखल करणे, ठिकठिकाणी गुन्हे दाखल करून केवळ तारखा-तारखांना न्यायालयाचे खेटे मारायला लावून एखाद्या पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यापासून ते राजकीय विरोधकापर्यंत कुणालाही जेरीस आणणे, असले प्रकार केले जातात.

अन्यायाविरुद्ध न्यायालयात जायला घाबरणारे आणि कुणाला तरी वेठीला धरण्यासाठी न्यायालयात जाणारे या दोन्हीच्याही बुडाशी असतो न्यायव्यवस्थेतील दिरंगाईवरचा विश्वास! तो न्यायपालिकेच्या कार्यक्षमतेवर बसावा यासाठी राज्यकर्त्यांपासून ते नोकरशाहीपर्यंत सर्वांनी वेळीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा सध्या जागोजाग राजकीय संस्थानिक तयार झालेच आहेत, तसेच कोर्टाबाहेर न्याय करण्याची ही सवय उद्या भारताचे लोकशाही संघराज्य पुन्हा संस्थानिक राज्य केल्याविना राहणार नाही.



  • संकेत सातोपे

रविवार, १ मार्च, २०२०

तुम्ही कोणत्या गटातले? पुरोगामी की हिंदुत्ववादी?

दिल्लीत उसळलेल्या धार्मिक दंगलीमुळे केवळ मुसलमानांवर अन्याय झालाय. ते यातले खरे नुकसानग्रस्त आहेत. बाकी हिंदू वस्त्यांवर आणि सुरक्षा दलांच्या जवानांवर पूर्वनियोजितपणे झालेले हल्ले, त्यांची हत्याकांडे, या गोष्टींचा तसा फारसा गाजावाजा करण्यासारखे नाही. मुळात मुसलमानांनी हल्ले केले असे म्हणणेच, प्रतिगामी-धर्मांध किंवा मोदीभक्त असल्याचे लक्षण आहे. पण मुसलमानांवर हल्ले झाले असे म्हणणे धर्मनिरपेक्षतेचे लक्षण आहे. 'दंगलीत किंवा सामूहिक हिंसाचारात दंगेखोर समाजकंटक आणि सर्वसामान्य पीडित हे दोनच गट असतात,' हे वाक्य तोपर्यंतच योग्य आहे जोपर्यंत दंगेखोर प्रामुख्याने मुसलमान आणि पीडित प्रामुख्याने हिंदू असतात. हीच स्थिती उलट झाली की ते 'हिंदू हल्लेखोर' आणि 'मुस्लिम पीडित' होतात. मुस्लिम धर्मीय दहशतवाद्यांकडून हल्ले होत असतात, तोपर्यंत 'दहशतवादाला धर्म नसतो,' बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये हिंदू नावे सापडायला लागली की मात्र तो 'भगवा दहशतवाद' होतो. 'मशिदीतून नमाज' पडून घरी जाताना आपल्याला कशी मारहाण झाली, हे सांगणाऱ्याच्या चित्रफिती आघाडीच्या 'धर्मनिरपेक्ष, पुरोगामी' माध्यमांकडून पद्धतशीर प्रसिद्ध केले जातात. पण देशाच्या एका गुप्तहेर जवानाला नियोजितपणे २००-२०० वेळा भोसकून मुस्लिम गुंडांकडून मारले जाते, तेव्हा तो मात्र दंगलीतला बळी असतो.

या भंपकपणामुळे धर्मनिरपेक्षपणा, सर्वधर्मसमभाव या शब्दांचेच हसे होऊन बसले आहे. एखाद्याने स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवले रे म्हणवले की लगेच तो मोदीविरोधी, ३७० कलम रद्द करण्याविरोधी, तिहेरी तलाक रद्द करण्याविरोधी आणि अंतिमतः स्वतःला हिंदू म्हणवण्याविरोधीही असलाच पाहिजे; इथपर्यंत सगळ्यागोष्टी अध्याहृत असतात. उलट एखाद्याने स्वतःला 'हिंदुत्ववादी-प्रेमी' म्हटले की, त्याची शेपटी थेट नरेंद्र मोदी-संघ इथपासून नथुराम गोडसेपर्यंत नेऊन भिडवली जाते. 'सामाजिक ओळखी'चे दोनच पर्याय सध्या शिल्लक ठेवण्यात आलेले आहेत आणि असल्या सामाजिक प्रश्नावर 'समाजभान' असलेल्या प्रत्येकाने या दोनपैकी कोणत्या तरी एक गटात असणे बंधनकारक असते. किंबहुना एकदा एका प्रश्नावर एका गटाच्या जवळ जाणारी भूमिका घेतली रे घेतली की पुढच्या प्रत्येक प्रश्नावर तुम्ही त्या गटाला अनुकूल अशीच भूमिका घेणार हे गृहीत धरले जाते किंवा तसा वैचारिक दबाव तुमच्यावर आणला जातो.

एखादी व्यक्ती किंवा विचारधारा यांचा प्रभाव वाढण्यास हे वातावरण अत्यंत पोषक आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच देता येईल. त्यांनी पाकिस्तानात घुसून लष्करी कारवाया केल्या, याचा कोणाही भारतीयाला अभिमानच वाटणार ना? पण तो वाटला आणि तो तुम्ही व्यक्त केला, तर तुम्ही थेट मोदीभक्त गटात मोडले जाता. त्याउलट तुम्ही येनकेन प्रकारे त्याची टर उडवली किंवा शाहजोगपणे त्याकडे दुर्लक्षच केले, तर मात्र तुम्हाला पुरोगामी होण्याची संधी आहे. पण यामुळे मोदींचे काम सोपे झाले. कारण सहज नाकारता न येणारे पाकिस्तानला धडा शिकवण्याचे काम त्यांनी केले आणि त्यासाठी एकदा एखाद्याच्या तोंडून 'वाह' निघाले की झालाच त्याचा 'मोदीभक्त' म्हणून बाप्तिस्मा आणि झाला तो पुरोगाम्यांच्या कोंडाळ्यातला बाटगा!

चांगल्या गोष्टीला चांगले आणि वाईटाला वाईट, मग ती गोष्ट कोणत्याही धर्म-जाती-समुदाय वा व्यक्तीची असो; असे म्हणण्याऐवजी उगाच काथ्याकूट करत बसायचे आणि वास्तवाकडे दुर्लक्ष करायचे ही कथित पुरोगाम्यांची वृत्तीच आज हिंदुत्ववादी मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या खूप पथ्यावर पडली आहे. कोणत्याही प्रकारच्या ध्रुवीकरणाला अत्यंत अनुकूल पार्श्वभूमी उपलब्ध करून देणारी ही वृत्ती आहे. दिल्लीत 'आप'ने हे वेळीच लक्षात घेऊन, स्वतःचा बचाव करून घेतला.

हिंदुत्ववाद्यांची कथा काही फार वेगळी नाही. हिंदुत्व हे सवर्णीय वर्चस्ववादी आहे, त्याला ब्राह्मण्याची किनार आहे, असा प्रचार करून बहुजनांना हिंदुत्वाच्या कक्षेबाहेर ठेवण्याचे प्रयत्न सतत सुरू असताना आणि ते खोडून काढण्याचे प्रयत्न तोकडे पडताना दिसतात. आंतरजातीय विवाहांना विरोधातून होणारी हत्याकांडे, दलितांवरील अत्याचाराच्या घटना, अंधश्रद्धांतून होणारे अनिष्ट प्रकार, अशी प्रकरणे बाहेर येतात तेव्हा त्यावर सर्वांत आधी सच्चा हिंदुत्ववाद्याने तुटून पडणे गरजेचे आहे. ती पोकळी त्यांनी भरून न काढल्यामुळे कथित पुरोगामींच्या प्रचाराला बळ मिळते.

मुळात देशभक्ती, मुस्लिम धर्मांधता, फुटीरतावाद अशा जरा आपल्याला अडचणीच्या ठरू शकणाऱ्या प्रश्नांवर सुस्पष्ट उत्तरे देण्यापेक्षा त्याबाबत मोघम, गुंतागुंतीचे राहणे किंवा प्रतिप्रश्न करून, दुसऱ्या गटाचेही तसेच दुर्गुण दाखवून त्या प्रश्नांना बगलच देणे, ही सध्याच्या पुरोगाम्यांची एक शैलीच झाली आहे. असल्या प्रश्नांच्या बाबतीत पुरोगाम्यांची जी तऱ्हा तीच जातीयवाद, आंतरजातीय विवाह, दलित-आदिवासी अत्याचार, अंधश्रद्धा आदी बाबतीत हिंदुत्ववाद्यांची आहे. या दुतर्फा मोघमतेवर अमोघ उत्तरे शोधणारे आणि सर्वसामान्य भारतीयांना नवी वैचारिक, राजकीय, सामाजिक दिशा देणारे खरेखुरे पुरोगामी विचारवंत-नेते निर्माण होत राहणे, हीच या देशाच्या प्रगतीची गुरुकिल्ली असेल.

@ संकेत सातोपे

रविवार, १२ जानेवारी, २०२०

माहितीपट नव्हे, चित्रपट म्हणून 'तान्हाजी' पाहायला हवा!



तान्हाजी मालुसरेंचा पडद्यावर दाखवलेला इतिहास किती वस्तुनिष्ठ, पुरावेजन्य आदी गोष्टी बाजूला ठेवून केवळ एक 3D पट म्हणून पाहिल्यास त्याची भव्यदिव्यता अनुभवता येते. कोणताही चित्रपट बनवताना दिग्दर्शकाने स्वातंत्र्य घेणं स्वाभाविकच आहे, अन्यथा तो माहितीपट होईल आणि माहितीपटातून बॉलिवूडची व्यावसायिक गणितं साधणं कर्मकठीण! त्यामुळे कोणत्याही बॉलिवूड निर्मात्याने असे पट बनवावेत, ही मागणीचं मुळात अवास्तव; त्यातूनही बनवलेच तर ते विशिष्ट बुद्धीजीवींपर्यंतच मर्यादित राहतील. तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहचू शकणार नाहीत. कथा-कादंबऱ्या-चित्रपट यातून इतिहास जितका सहज-सुलभ सर्वांपर्यंत पोहोचतो तितका इतिहास ग्रंथांतून नाही, हे आपण मान्य करायला हवं. ग्रंथ अभ्यासकांसाठी असतात, सामान्य वाचकांना त्यात रस असेलच असं नाही. म्हणूनच सेतू माधवराव यांच्यापेक्षा 'श्रीमान योगी' लिहिणारे रणजित देसाई अधिकांना माहीत असतात, ते वाचलेले असतात.

यात फक्त एक आग्रह कायमच धरायला हवा, तो म्हणजे सिनेस्वातंत्र्य घेताना संबंधित महापुरुषाचे अवमूल्यन होऊ नये. ते 'तान्हाजी'मध्ये कुठेही झालेलं नाही. 'तान्हाजीं'च्या पराक्रमाची पांढरी रेघ उठून दिसावी, यासाठी उदयभानची कुवत अधोरेखित करणारे तसेच कोंढण्याचे महत्त्व प्रेक्षकांच्या मनावर ठसवणारे अनेक काल्पनिक प्रसंग पटकर्त्यांना घालावे लागले. पण त्यांनी ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर अन्याय केला, असं काही म्हणता येणार नाही. उदाहरणच द्यायचं झालं, तर चंद्रजी पिसाळ या पूर्णतः काल्पनिक व्यक्तिरेखेचं देता येईल. कोंढण्यासंदर्भात ही व्यक्तिरेखा निव्वळ काल्पनिक असली, तरीही पुढे संभाजी महाराजांनंतरच्या काळात सूर्याजी पिसाळ ही व्यक्ती स्वराज्यद्रोह करून औरंगजेबाला मदत करण्यासाठीच कुप्रसिद्ध आहे. पटकर्त्यांनी हे भान राखलं आहे. चित्रपटात मसाला म्हणून व्यक्तीरेखा उभी करतानाही हा संदर्भ विचारात घेतला आहे. हे इतकं केलं तरीही पुरे नाही का?

असे चित्रपट म्हणजे इतिहासाविषयी लोकांची उत्सुकता चाळावण्याचं माध्यम आहे. यातून जिज्ञासा चाळावलेले लोक नक्की पुस्तकं, माहितीपट वगैरे शोधून काढून नेमकी माहिती मिळवतात. 'पानिपत' चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी माझ्याकडून संबंधित पुस्तकांची नावं विचारून घेतली, कुठे मिळतील याची विचारपूस केली. असं होऊ लागलं की अशा चित्रपटांचे उद्देश सफल झाले, नाही का!

शतकोत्तरी गाठलेला बॉलिवूडचा ढुढाचार्य आता कुठे भारतीय इतिहासातील या सोनेरी पानांकडे वळू लागलाय, देशभरातील प्रेक्षकही त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत. अशा वेळी खुसपटं काढत बसायचं की, असे प्रयत्न उचलून धरायचे हे आपलं आपणच ठरवायला हवं.

- संकेत सातोपे

रविवार, २० जानेवारी, २०१९

कालचे आज नाही, आजचे उद्याला

गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर आपले १० वर्षांपूर्वीचे आणि सध्याचे फोटो टाकण्याची गमतीशीर टूम आलीए. नजीकच्या भूतकाळात म्हणजे गेल्या १० -१५ वर्षांत आपल्यात झालेले देहीक बदल अशा दोन छायाचित्रांतून चटकन दृष्टीस पडतात. पण याच काळात आपल्या दैनंदिन वापरातील तंत्रज्ञानात आणि त्याअनुषंगाने सवयी, आचार-विचार आणि शिष्टाचारांमध्येही किती अलगद बदल होत गेले ना! अगदी लहान – सहान गोष्टींमध्येही हे बदल इतके मांजराच्या पावलांनी आले की, बदलणाऱ्यांनाही त्याची जाणीव झाली नाही. आज जुनी छायाचित्रं पाहाताना होतं, तसंच काहीस या विनासायास झालेल्या बदलांकडे पाहूनही चकीत व्हायला होतं.
          आता हेच पाहा ना, मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या घराखाली उभं राहून, जोरदार बोंब मारून त्याला खाली बोलावणं किंवा आपण आल्याची वर्दी देणं, हे प्रत्येकाच्या हाती मोबाइल आल्यापासून किंवा कॉल स्वस्त झाल्यापासून, अचानक अशिष्टपणाचं होऊन बसलयं. आता घराखाली उभं राहून फोन लावला जातो आणि खिडकीतून हात दाखवत फोनवरून निरोपानिरोपी होते.
            अहो, कालपर्यंत मध्यमवर्गीय वस्तीमध्ये पुरुषांची हजामत करणाऱ्या दुकानांबाहेर बायामाणसं सहसा उभी राहात नसतं. इतकंच काय घरातल्या लहान मुलाला भादरायलासुद्धा बाबा घेऊन जात असतं. बायकांनी तिथे जाणं निषिद्ध वगैरे नव्हतं, पण सहसा तिथे बाईमाणूस फिरकत नसे. कॉलेजात असताना माझ्या एका मैत्रिणीला मी सलूनमध्ये दाढी करवून घेतो, दोन मिनिटं बाहेर बस म्हणालेलो तर ती किती वैतागली होती. आता अगदी झाकपाक सोडा, पण अनेक छोटेखानी ‘केशकर्तनालयां’मध्येही महिला-पुरुषांची परस्परांकडून सामाईक हमाजत किंवा चंपी चाललेली पाहायला मिळते. म्हटलं तर केव्हढा बदल आहे नाई हा!
            यावरूनच आणखी एक आठवलं,१०-१२ वर्षांपूर्वी खांद्यांवर मैत्रिणीच्या 'ब्रा'चे पट्टे दिसतायंत हे खुणेने सांगणं, हे एका चांगल्या मित्राचं लक्षण असे. ही अत्यंत खासगी गोष्ट मानली जायची, त्यामुळे ‘जवळ’चे हा विशेष दर्जा असणाऱ्या मित्रांनाच हे सांगण्याची परवानगी असायची. उर्वरित मंडळीसाठी असं काही दिसणं हीसुद्धा भारीच सेक्सी वगैरे गोष्ट असायची. काळ झरकन बदलला, फॅशनही बदलली; आज असे पट्टे गळ्यात घालण्याची किंवा पारदर्शक पट्टे हेतुपुरस्सर दाखविण्याची टूम आहे आणि ती इतक्या बेमालुमपणे स्वीकारलीही गेली की, पाहणाऱ्यांनाही हल्ली त्यात काही विशेष वाटत नाही.
           असाच एक वाहतुकीचा शिष्टाचार हल्ली हल्लीपर्यंत होता, काही प्रमाणात आहेही; तो म्हणजे दिवसा कुणाच्या दुचाकीचे दिवे सुरू दिसले की, चित्रविचित्र खाणाखुणा करून भरप्रवासात ते बंद करायला सुचविणे. आपण कुणाचे तरी अनावश्यक सुरू असलेले दिवे मालवायला लावल्यामुळे झालेल्या ऊर्जाबचतीचं केव्हढ अप्रुप असायचं सांगणाऱ्याच्या चेहऱ्यावर. पण आता केंद्राने नवा नियम आणला, त्यामुळे सर्व नव्या दुचाकींचे दिवे दिवस-रात्र सुरूच राहतात. किंबहुना या होतकरू समाजसेवकांची कळकळ लक्षात न घेता दिवे बंद करण्याची कळच कंपनीने दुचाकीवरून काढून टाकलेली आहे. त्यामुळे बिचाऱ्यांचा अगदीच हिरमोड झालाय.
            महिन्याकाठी नगदी मिळणारे वेतन धनादेशाच्या स्वरूपात मिळू लागले. इथवर ठीक होतं ओ! पण ते थेट बँक खात्यात जमा होऊन त्याचा संदेशच काय तो मोबाइलवर येऊ लागल्यामुळे मातृभक्त, कुटुंबवत्सलांची मोठी पंचाईत होऊन बसलीए! म्हणजे आधी कसं आई किंवा घरातल्या कर्त्या बाईच्या हातात पगाराचा धनादेश दिला आणि त्यांनी तो देवापुढे ठेवला की महिनाभराच्या श्रमाच सार्थक झाल्यासारखं वाटायचं. आज ती सोय राहिलेली नाही. हल्ली पगार झाल्याचं आपल्या आधी त्या ‘ईएमआय’वाल्यांना कळतं. पगार झाल्याचे आणि तो कापून गेल्याचे संदेश एकाच वेळी वाजतात. त्यामुळे पूर्वी महिनाअखेरीला टाके पडायचे; आता तर मासारंभापासूनच शिवायला सुरुवात करावी लागते.
            मित्र किंवा विशेषत: लाडक्या मैत्रिणीच्या आधी चित्रपटगृहाजवळ पोहोचून तिकीट काढून ठेवणं, शो हाऊसफुल होणार असेल, तर आदल्या दिवशीच तिथे खेप घालून तिकीट मिळवणं. रेल्वे तिकिटांच्या रांगेत एखाद्या देखण्या प्रवाशांच्या तिकिटाची जबाबदारी घेणं, दूरगावची तिकीट मिळवण्यासाठी रात्र खिडकीबाहेर बारदणावर झोपून काढणं, अशा अनेक गोष्टी नव्या तंत्रज्ञानामुळे हल्लीच्या हल्ली कालबाह्य झाल्या. ऑर्कुटवर आपली खरी छायाचित्र आणि याहू चॅट रुमवर आपलं खरं नाव लपविण्याचेही दिवस गेले. आपण नकळत सोशल मीडियाला इतके सोकावलो की, छायाचित्रच काय आपल्या आयुष्यातली प्रत्येक बारीक सारीक गोष्ट आपण इथे शेअर करू लागलो. हे चांगलं की वाईट, चूक की बरोबर हे माहीत नाही. पण झटपट बदल होतायंत, ते हे असे.
            हेच पाहा ना, फोनच होते तोवर आपण दूरच्या मित्रांना कोणत्याही शुभेच्छा फोनवरून द्यायचो. मात्र विशेष असणाऱ्या व्यक्तीला हाती लिहिलेलं पत्र पाठवणं भावनिक ओलाव्याच असायचं, आज आपण ‘एक मित्र’ गटात असणाऱ्यांना व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरून शुभेच्छा देतो आणि खास असणाऱ्यांना फोन करून. म्हणजे फोनवरून शुभेच्छा हा पूर्वीचा ‘दिवाणे आम’साठीचा प्रकार ‘दिवाणे खास’साठी उरलाय.
          एकंदरीत काय आपली इच्छा असो वा नसो, आपण कालपेक्षा आज वेगळे असतो आणि आजपेक्षा उद्या. हे बदल दिसण्याबाबत जितके खरे, तितकेच जगण्या- वागण्याच्या, नीती-अनीतीच्या, समाज - व्यवस्थेच्या प्रत्येकच पैलूंचाबाबतीतही!

© - संकेत सातोपे

रविवार, ३० डिसेंबर, २०१८

बदलांची भाषा आणि भाषेतील बदल

(यंदा दिवाळी अंकात प्रकाशित झालेला माझा एक लेख)
----------------------------------------------------------------------------------




भाषा हे माणसाचे व्यक्त होण्याचे आदिम साधन आहे. अगदी अश्मयुगातला माणूसही त्याच्या दैनंदिन व्यवहारांसाठी कोणती ना कोणती भाषा वापरतच असला पाहिजे. मग ती भाषा शब्दांची असेल, हावभावांची किंवा ठराविक स्वरांची; पण भाषा असणार नक्की. अंदमानसारख्या बेटांवर आजही आदिम अवस्थेत जगणाऱ्या जरावासारख्या वनवासी जमातींचीही स्वत:ची भाषा आहे, संवादाची तऱ्हा आहे. भाषा हे प्रामुख्याने बोलण्याचे आणि ऐकण्याचेच साधन आहे. लिहिणे- वाचणे हा उपचार त्यात फार उशिरा आला. लिखित स्वरूप प्राप्त होताच, त्याचे प्रमाणिकरण होऊ लागले. काय योग्य, काय अयोग्य, याचे शास्त्र तयार झाले आणि बोललेले अधिक काळ स्मरणात ठेवण्यासाठी लिहून ठेवणे, हा लिखाणाचा मूळ उद्देश बाजूला पडून; लिहिल्याप्रमाणे बोलणे, असा उलट प्रवास सुरू झाला. हा प्रवास प्रवाहीपणास खीळ घालणारा आणि म्हणूनच कोणत्याही भाषेच्या जिवंतपणास मारक ठरणारा आहे. कारण प्रवाहीपणा हेच जिवंतपणाचे लक्षण आहे. प्रत्येक जिवंत गोष्ट ही प्रवाही असतेच. मग भाषा त्याला अपवाद कशी ठरेल. सध्या मराठीत आणि सर्वच भारतीय भाषांमध्ये होणाऱ्या स्थित्यंतरांबाबत आरडाओरड करताना, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
   ‘आमच्या वेळी अशी भाषा नव्हती, शी काय आजची भाषा,’ अशा तुकड्यानेच बोलणे सुरू करणारी मंडळी ते आदर्श म्हणून सांगत असलेल्या कालखंडातही भाषेबाबत असाच ओरडा होत होता, नव्हे तो प्रत्येकच काळात होत राहिला आहे, हे विसरतात. कालच्यापेक्षा आजची आणि आजच्यापेक्षा उद्याची भाषा वेगळी असणारच, कुणीही कितीही आटापीटा केला, तरीही हे बदल अटळ आहेत आणि ते नाकारणारी भाषा मृतप्राय होते किंवा बाजूला पडते. त्यामुळे सध्या सर्वच क्षेत्रांत झपाट्याने होणारे बदल जी भाषा अंगिकारेल किंवा ते बदल सामावून घेण्यासाठी सक्षम होईल, तीच भाषा टिकेल, तगेल आणि वृद्धिंगत होईल, हे वास्तव आहे.
   इथे एक गोष्ट मात्र कायम ध्यानात ठेवली पाहिजे की, बदल समावून घेणे, स्वीकारणे आणि बदलांत वाहून जाणे, या दोन अतिशय भिन्न गोष्टी आहेत. देशी भाषांच्या संवर्धनासाठी झटणारे कार्यकर्ते, भाषाप्रेमी आणि नको तितके आधुनिक झालेले भाषिक स्वैराचारी यांच्यात खटका उडतो, तो याच गोष्टीवरून. भाषाप्रेमी बदल स्वीकारणे आणि स्वैराचारी त्यात वाहून जाणारे. ‘एक तुतारी द्या मज आणूनि’ म्हणणारे आधुनिक मराठी काव्याचे जनक केशवसूत यांनी बदल स्वीकारले म्हणूनच ते सुनीते मराठीत आणू शकले, शिरवाडकरांनी बदल स्वीकारले म्हणून नटसम्राट मराठीत आले, विंदांनी बदल स्वीकारले म्हणून ते तुकोबांच्या भेटीला शेक्सपिअरला आणू शकले. गझलकार सुरेश भट, हायकुकार शिरीष पै, यातल्या कुणावरही मराठीची वाट लावल्याचा आरोप करता येईल का? उलट मराठी संपन्न केल्याबद्दल त्यांचे आजवर कौतुकच होत आले. याचे कारण त्यांनी परभाषेतील साहित्य मराठीत आणले, नवे बदल स्वीकारले, नवे साहित्य प्रकारही स्वीकारले, पण हे सर्व करतानाच मराठीचा लहेजाही सांभाळला. आज मात्र बदल स्वीकारणे याचा अर्थ परभाषेतील संज्ञा, शब्द, विचार, तत्त्व स्वभाषेत जसेच्या घुसडणे असा झाला आहे. सरमिसळ ही दुधात साखरेसारखी हवी, त्याने दुधाचा गोडवाही वाढावा आणि त्यांनी दुधाशी समरसून जावे. सध्या दुधात लिंबू पिळण्याचे प्रकार सुरू असलेले बऱ्याचदा दिसते. त्याने दुधाचे गुणवर्धन न होता ते नासण्याचेच काय ते काम होऊ शकते. सध्याची मराठी चित्रपट, नाटकांची नाव पाहिली, तरीही या प्रकाराचे गांभीर्य लक्षात येईल. ‘दिल अभी भरा नही’, ‘जादू तेरी नजर’, ‘चॅलेंज’ या नाटकांच्या शीर्षकांनाही हिंदी- इंग्रजीच्या आधार का घ्यावासा वाटावा? असे काय वेगळेपण आहे, या शीर्षकांमध्ये जे मराठी नावांतून दाखविता आले नसते. ‘दिसून येते, आढळून आले, माहिती पुढे आली’ ही थेट इंग्रजी शैलीची क्रियापदे वापरण्याची पद्धत सर्वच मराठी वृत्तपत्रांमध्ये रुढ झालेली दिसते. त्याऐवजी ‘दिसते, आढळते, कळते, निष्पन्न होते’ अशी थेट मराठमोळी रचना का करण्यात येत नाही, हे अनाकलनीय आहे. ‘अमके  - तमके असे म्हणाले की,’ अशी वाक्याची सुरुवात करण्याची हिंदी पद्धत मराठीला किती शोभते? त्याऐवजी वक्त्याचे म्हणणे सांगून शेवटी ‘अमके-अमके म्हणाले’ असे लिहिणे अधिक उत्तम वाटत नाही का? वाहिन्यांवर तर मराठीच्या चिंध्या उडताना दिसतात. ‘जसं की आपण पाहू शकता, तसं’, ‘जसं की ते म्हणाले तसं’ या हिंदीभ्रंशीत गोलगोल फिरणाऱ्या वाक्यरचनेऐवजी ‘आपल्याला दिसतयं ते’, ‘आपण म्हणतायं त्यानुसार’ ही थेट मराठी शैली किती सोपी आणि सुटसुटीत आहे.
        आता या बदलांना भाषा प्रवाही असते, तिच्यात स्थित्यंतर येणारच या नावाखाली सूट देता, येऊ शकते का? आणि तशी ती दिली गेली, तर नव्या पिढीपर्यंत जाणारी भाषा ही मराठीच असेल, याची काही खात्री देता येईल का? की हिंदीवरील अरबी – फारसीच्या प्रभावामुळे तयार झालेल्या उत्तरेतील हिंदुस्थानी अथवा उर्दू या ढेडगुजऱ्या भाषेसारखे मराठीचे स्वरूप होईल? याचा विचार प्रत्येकानेच करायला हवा. आपण आपला सर्वाधिक वेळ ‘ल आणि ळ’ किंवा ‘न आणि ण’चे उच्चार योग्य – अयोग्य करणाऱ्यांना गोंजारण्यात वा फटकारण्यात घालवतो. वस्तुत: या वर्णांचे दोन्ही उच्चार मराठमोळेच आहे. त्यामुळे ते बरोबर- चूक आल्याने फार काही आभाळ कोसळत नाही. ‘ण’चा उच्चार न करू शकणाऱ्या किंवा तो (‘णमण’ वगैरे) चुकीच्या ठिकाणी उच्चारणाऱ्यांना हसणारी मंडळी ‘प्रश्ण’ हा उच्चार मात्र सहज करून जातात आणि आपण चुकलोय हे त्यांच्या गावीच नसते. ‘ळ’चीसुद्धा तीच कथा ‘ळ’ हे वर्ण मुळात बोली मराठीतले किंवा प्राकृतातले संस्कृतात ते नाही. त्यामुळे हे वर्ण वापरून ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ असे म्हणताना; ‘खल’, हा संस्कृत शब्द सर्वसामान्यांच्या भाषेप्रमाणे ‘खळ’ असा वापरणाऱ्या ज्ञानदेवांना तत्कालीन कथित पंडितांनी बहिष्कृत ठरवले होते. आज मात्र याच ‘ळ’चा उच्चार करता येणाऱ्यांना भाषिक प्रतिष्ठा मिळते आणि ‘ल’ म्हणणारे गावरान ठरतात. असो, पण हे वाद चालतच राहणार. ‘वादवादे जायते तत्वबोध’ हे आपल्या संस्कृतीचे सूत्रच असल्यामुळे असे वाद हवेतच. त्याविना भाषेचा विकास व्हायचा नाही. मुद्दा हा आहे की, या वादात पटापट आणि निकराने उड्या घेणाऱ्या मंडळींच्या नाकाखालून मराठीला विक्षिप्त आणि विकृत वळण लागत आहे. तरीही ते प्रमाणभाषा की बोलीभाषा याच वादात अडकून पडले आहेत.
         आज जागतिकीकरणाच्या रेट्यात या भाषेतील शब्द त्या भाषेत उचलला जाणे, हे खूपच स्वाभाविक झाले आहे. पण त्यामुळे देशीभाषा केवळ क्रियापदांपुरतीच उरेल की काय, अशी भीती निर्माण होणे घातक आहे. नवे तंत्रज्ञान, नवनव्या संज्ञा, जगभरातून इतक्या झपाट्याने आपल्यापर्यंत पोहोचत आहेत की, त्यांना समर्पक देशी प्रतिशब्द पाडणे आणि ते तितक्याच वेगाचे प्रचारणे, हे मोठे आव्हानच होऊन बसले आहे. ते वृत्तपत्र, साहित्यिक, वक्ते यांनी पार पेलले नाही, तर येणाऱ्या पिढीला त्यासाठी दोषी मानता येणार नाही. मराठीतील एक-दोन निवडक वृत्तपत्रे सोडली, तर या आव्हानाची फार कुणाला जाणीवही असल्याचे जाणवत नाही. एखादी संज्ञा जागतिक पटलावर येते, तेव्हा तिला जोडून अनेक सांस्कृतिकसंदर्भही येत असतात. त्यामुळे वेळीच त्याचे देशीकरण करून घेणे आवश्यकच ठरते. तसे झाले तरच त्या संकल्पना देशात योग्यरित्या रुजतात आणि अनावश्यक सांस्कृतिक सरमिसळही थांबते. चायनीज, पिझ्झा हे पदार्थ भारतात विकले जाताना त्यात भारतीय चवींचा विचार केला जातोच, अन्यथा मूळ चवीमध्ये त्यांना भारतात टिकाव धरणेही अवघड झाले असते. तोच प्रकार भाषांच्या बाबतीतही लागू होतो.
          आजच्या भाषेला लागलेले आणखी एक वाईट वळण म्हणजे, मराठीतले सुंदर – सुंदर शब्द अत्यंत चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या अर्थाने वापरण्याचा जणू प्रघातच सध्या पडत चालला आहे. यामुळे उत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीनेही सखोल असलेले आपल्या मराठीतील अनेक शब्द भविष्यात पांगळे होणार आहेत. घोडचूक हा सर्रास वापरला जाणारा शब्द खरंतर घोरचूक आहे, हे आपण विसरतो. ‘अठराविश्व दारिद्र्य’ ही संज्ञा तर आता इतकी रुजली आहे की, ते ‘अठराविशे दारिद्र्य’ असे आहे हे सांगूनही कुणाला पटणार नाही. हे झाले शाब्दिक बदल, आता अर्थदृष्ट्या झालेले काही विकृत बदल पाहूया. प्रभृती या शब्दाचा अर्थ आदी, इत्यादी असा आहे; परंतु आज तो चक्क महान, महनीय व्यक्ती या अर्थाने वापरला जातो. त्यामुळे ‘या वेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री, राज्यपाल, सचिव, आदी प्रभृती उपस्थित होती.’ अशी वाक्य आपण आघाडीच्या वर्तमानपत्रांतून नियमित वाचतो. ‘रुजुवात’ हा शब्द हल्लीचे अनेक नवीकवी सुरुवात या अर्थाने खुशाल वापरायला लागले आहेत, अरे पण रुजुवात म्हणजे पडताळून पाहाणे, खातरजमा करणे, हे त्यांना सांगूनही पटत नाही. एखादा संस्कृताळलेला शब्द असावा, या थाटात ते हा मूळचा अरबीसंकरिक शब्द वापरून ‘माझ्या प्रेमाला रुजुवात झाली’, अशी वाक्य बेधडक लिहितात. ‘दिठी’ हा शब्दही बरेच लोक दिवा या अर्थी वापरू लागले आहेत. त्याचा अर्थ दृष्टी आहे, ते जाणूनही घेतले जात नाही. असे शब्द शेकड्याने निघतील. चुकीच्या अर्थाने किंवा भलत्याच अर्थाने शब्द लिहिले जाण्याचे प्रकार पूर्वीही होत होतेच. फरक फक्त इतकाच होता की, अशा लोकांना पूर्वी प्रतिष्ठा मिळत नव्हती. आज चोखंदळ वाचकांची संख्या घटत असल्याने ती मिळू लागली आहे. हे कोणत्याही भाषेच्या भवितव्यासाठी चांगले लक्षण नाही.
         आजच्या ‘ऑनलाइन’ काळात चिन्हांची एक नवी भाषा मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. बरं, ठीक आहे, यांसारखे उद्गार तर एक ठेंगा दाखवून, व्यक्त केले जातात. शब्दांपलिकडे जाऊन, जगभरात कुठेही कळणारी ही चित्रांची आणि चिन्हांची भाषा नक्कीच स्वागतार्ह आहे. पण त्याला मर्यादा आहेत, हेही तितकेच खरे. सध्या आपण समाजमाध्यमांवर संवादासाठी वापरतो ती चिन्हे, काही अपवाद वगळता आपल्या भाषेला पूरक म्हणून वापरतो. म्हणजे, ‘मी छान आहे’ असे म्हटल्यानंतर एखादी हास्यमुद्रा किंवा शुभेच्छा दिल्यानंतर ठेंगा. या चिन्हांच्या पूरक भाषेने दूरस्थ संवादांमध्ये मसालेदारपणा आणि प्रभावीपणा वाढवला आहे, हे मानायला प्रत्यवाय नाही. नवप्रेमीयुगुले या म्हणण्याशी विशेष सहमत होतील.
      समाज माध्यमे या प्रकारामुळे रुढ माध्यमांवरील प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढून, प्रत्येकालाच स्वत:चे मत मांडण्याची, व्यक्त होण्याची संधी मिळू लागली आहे. भाषिकदृष्ट्या या संधीचा विचार करता, त्याचे फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत. कालपर्यंत कोणत्याही साहित्यावर प्रकाशनपूर्व संपादनाचा संस्कार होत असे. त्यामुळे भाषेतील आणि एकंदरच साहित्यातील त्रुटी प्रकाशनापूर्वीच दूर होत असत. पण आज विचार काय किंवा साहित्य काय थेट वाचकांपर्यंत पोहोचते. परिणामी ते बऱ्याचदा अपरिपक्व किंवा कच्च्या स्वरूपाचे असते. भाषाही बाळबोध असते. अशा वेळी नीर-क्षीर विवेक बाळगणारा चोखंदळ वाचक अधिक महत्त्वाचा ठरतो. तो आपल्या जवळपास नसला, तर गल्लीबोळात साहित्यिक आणि विचारवंताची पिके निघायला लागतात. अशा सुमारांची सद्दी आपण फेसबुक आणि ब्लॉगवर झालेली पाहातोच.
          दरम्यान, गेल्या काही वर्षांत समाज माध्यमांतसुद्धा अनेक स्थित्यंतरे येताना आपण पाहत आहोत. सुरुवातीला ऑर्कूटसारख्या संकेतस्थळांवर किंवा नव्याने आलेल्या ब्लॉगरवर भारंभार लिखाण करण्यावर लोकांचा भर होता. मोठी जागा आहे, त्यामुळे वाट्टेल ते आणि वाट्टेल तितके लिहा, अशी सुरुवातीची धारणा होती. अगदी वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवरही कितीही मोठा लेख येऊ द्या, असे लेखकांना सांगितले जात होते. मात्र आता तेथील भाषेलाही हळूहळू वळण लागत आहे. नियमित ब्लॉग लेखक, त्यांची शैली, त्यांची भाषा आणि त्यांचे चाहते तयार होत आहेत. त्यामुळे जागा कितीही असली, तरीही अमुक एका मर्यादेपलिकडे नेटवर वाचले जात नाही, हे लक्षात घेऊन लिखाण केले जात आहे. भाऊ तोरसेकरांसारखे पत्रकारांनीही ब्लॉगच्या माध्यमातून तब्बल एक कोटी वाचकांपर्यंत पोहोचण्याची किमया साधली आहे. ‘द वायर’सारखी ऑनलाइन पोर्टल तुफान गाजत आहेत. साहजिकच ऑनलाइन माध्यमांची एक नवी भाषा आकार घेत आहे. इथे लिहिण्यासोबतच तुमच्या म्हणण्याच्या पृष्ठर्थ तुम्हाला ऑनलाइन मजकूर, चित्रफिती, छायाचित्र आदींचे दुवे देता येत असल्यामुळे वाचकांनाही विविध संदर्भ जिथल्या तिथे पडताळून पाहाता येत आहेत. त्यातच ट्विटरसारख्या माध्यमांतून तर १४० शब्दांच्या मर्यादेत आणि हॅशटॅगकरून लिहिण्याची एक नवी पद्धत विकसित झाली आहे. त्यामुळे कमीत कमी शब्दांत आपले म्हणणे मांडण्याची आणि ते समजून घेण्याची सवयच या मंडळींना लागली आहे. अर्थात ट्विटरसारखे माध्यम हे काही भाषा- साहित्य प्रसाराचे साधन नाही. ते फक्त आपले मत किंवा बातमी दुसऱ्यापर्यंत पोहोविणारे माध्यम आहे. त्यामुळे येथील लिखाणाच्या भाषिक वैशिष्ट्यांची चिकित्सा करण्याचे काही प्रयोजनच नाही. मात्र येथे एक अवश्य नमूद करता येईल, या १४० शब्दांच्या मर्यादेतसुद्धा उत्कृष्ट भाषिक नमूने ठरू शकतील, असे ट्विट करणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासारखी किंवा पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यासारखी मंडळी आहेत.
        तांत्रिक कारणांमुळे काही वर्षांपूर्वी मोजक्या शब्दांत पाठवावे लागणारे तार संदेश, त्यानंतर पेजर, भ्रमणध्वनीच्या काळातील लघुसंदेशांतील शब्दमर्यादा असे सगळे टप्पे ओलांडून ईमेल आणि ब्लॉग या अमर्याद शब्दसंख्येसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या माध्यमापर्यंत आल्यानंतर; आता माणसाला पुन्हा मर्यादित शब्द संख्येची ट्विटरची चौकट हवीहवीशी वाटू लागली, हे आश्चर्य आहे. आज आम्हाला कोणतेही बंध नकोत, स्वैराचारी जिणे हवे, मनमौजीपणा हवा, असा कांगावा करत पुढे- पुढे चाललेल्या आपल्या समाजालाही काही दशकांनी असेच पुन्हा आपणहून मर्यादांच्या चौकटी यावेसे, वाटेल का! कारण व्यवस्थेच्या मर्यादा उलंघू पाहणाऱ्या याच समाजाने कधीकाळी त्या मर्यादा निर्माणही केल्या आहेत. ही वर्तुळाकार स्थितंतरे पिढ्यानपिढ्या अशीच सुरू आहेत, सुरू राहतील; कारण काळ अमर्याद आहे, कदाचित मानवी आकांक्षांपेक्षाही..!

-        संकेत सातोपे
(सौजन्य : विश्व संवाद केंद्र, मुंबई)

गुरुवार, २७ डिसेंबर, २०१८

इच्छा मरण, समाधी, देहत्याग, वगैरे.. वगैरे...

मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने काही अटींवर इच्छामरणालापरवानगी दिल्यानंतर, याबाबत नव्याने चर्चेची वादळे उठली आहेत. इच्छा मरणाची गरज खरंच आहे का, ते न्याय्य आहे का, त्याला वैधानिक संमती मिळाल्यानंतर त्याचा गैरवापर होणार नाही का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत; पण या प्रश्नांची उत्तरे अन्य कोणत्याही सामाजिक निर्बंधांप्रमाणेच सापेक्ष आहेत. त्यामुळेच अन्य सामाजिक प्रश्नाप्रमाणेच यासंदर्भातही मागे वळून पूर्वसुरींनी घालून दिलेल्या पायंड्याचे मासले तपासणे अधिक उद्बोधक ठरते. जसे की, लिव्ह इन रेलेशनशीपच्या वैधानिक मान्यतेबाबत निकाल देताना, न्यायालयाने राधाकृष्णाचा दाखला दिला होता. इच्छा मरणाच्या या ताज्या निकालाबद्दलही भारतीय सांस्कृतिक- ऐतिहासिक संदर्भ तपासून पाहता असे दिसते की, मरण अडवून धरणाऱ्या भीष्माचार्यांपासून ते ओढावून आणणाऱ्या कुमारील भट्ट, आद्य शंकराचार्य, ते अगदी ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत अनेक महात्म्यांनी इच्छामरण या संकल्पनेचा यथायोग्य उपयोग केला. आत्महत्या कोणत्याही संस्कृतीने त्याज्य आणि निषेधार्हच मानली आहे, पण नैसर्गिक मृत्यू येण्याआधी स्वेच्छेने जीवन संपविण्याच्या प्रत्येक क्रियेला आत्महत्या मानण्यात आलेले नाही. आपले इप्सित साध्य होण्यात अपयश आले, गोष्टी मनाविरुद्ध घडत आहेत, म्हणून निराश होऊन जीव देण्याला आत्महत्या मानण्यात येते. पण आपण योजिलेल्या जीवितकार्याची पूर्तता झाली, म्हणून समाधानाने स्वेच्छेने जीवन थांबविणे, याला समाधी किंवा आत्मार्पणच मानले गेले आहे.
भावार्थ दीपिका, अमृतानुभवासारखे ग्रंथ लिहून, समाज प्रबोधनाचे मोठे कार्य उभे केल्यानंतर जीवनाची इतिकर्तव्यता झाल्याचे जाणवताच ज्ञानेश्वर माउलींनी ऐन तारुण्यात समाधी घेतली. अशीच कथा आद्य शंकराचार्यांचीही, अद्वैत मताचा भारतभर पुरस्कार करून, देशात चार दिशांना चार पीठांची स्थापना केल्यानंतर शंकराचार्यांनी थेट गृहप्रवेश करून, आपला ऐहिक प्रवास थांबविला. पश्चिम बंगालमधील वैष्णव मताचे कट्टर पुरस्कर्ते चैतन्य महाप्रभूंची आत्मर्पणाची कथा तर फारच रोचक आहे. श्रीकृष्ण भक्तीभावात तल्लीन होऊन भजन गात गात भक्तांसमवेत वाटेने चालत असतानाच अचानक महाप्रभूंनी समुद्रात उडी घेतली आणि ते समाधिस्थ झाले. संत एकनाथ महाराजांनीही अशाच प्रकारे नदीत समाधी घेतली होती. कार्यपूर्तीनंतर देहत्याग केल्याची जशी संतांची अनेक उदाहरणे आहेत, तशीच उदाहरणे देशभक्तांचीही पाहाता येतील. यातील चटकन आठवणीत येणारे नाव म्हणजे चंद्रशेखर आझाद. ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात जखमी होऊन, घेरले गेलो आहोत आणि आता निसटणे अशक्य आहे, हे लक्षात येताच आझाद यांनी स्वतःच्याच डोक्याला पिस्तुल लावले. गोऱ्यांच्या हाती लागून बंदिवासात मरण्यापेक्षा स्वतःच स्वतःचा देह विसर्जित करणे त्यांना श्रेयस्कर वाटले. दिल्लीचे अखेरचे हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान आणि त्यांचा सेवक-मित्र चंदबरदायीबाबतही अशीच कथा सांगितली जाते. मोहम्मद घोरीसारख्या क्रूरकर्म्याच्या हातून मृत्यू स्वीकारण्यापेक्षा या दोन घनिष्ठ मित्रांनी अखेर कारागृहात एकमेकांची मान उडवली. शत्रूच्या हातात पडण्यापूर्वी राजपूत स्त्रियाही जोहर करून नैसर्गिक मृत्यू येण्यापूर्वी जीवन संपवीत असत. मनुष्य जीवन संपविण्यासाठी नैसर्गिक मृत्यू हा एकमेव न्याय, नैतिक मार्ग असून अन्य सर्व प्रकार हत्या- आत्महत्या या अपराधात मोडतात. अशी धारण न होण्यासाठी वरील दाखले पुरेसे बोलके आहे. शेवटी कोणतीही क्रिया योग्य की अयोग्य हे त्यामागील हेतुवरूनच ठरवता येते. त्यामुळे मानवी मृत्यू अर्थात देहान्त, हा कोणत्या क्रियेने झाला याऐवजी कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या उद्देशाने झाला यावरूनच त्याचे योग्य- अयोग्यत्व ठरविता येते. यापुढे माझ्याकडून देशकार्य होणार नाही, माझा देह केवळ भारभूत होऊनच राहील, या धारणेतून स्वा. सावरकरांनी प्रायोपवेशन(अन्नत्याग) क्रियेद्वारे पत्करलेला मृत्यू, म्हणूनच आत्महत्या ठरत नाही. त्याचप्रमाणे रुग्णालयात कितपत पडून आप्तस्वकीयांना त्रास देत केवळ श्वासोच्छ्वासापूरते जिवंत असण्यापेक्षा सुखाने मृत्यूला कवटाळले हे अयोग्य ठरत नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने यावरच मोहर उमटवली आहे. 
-संकेत सातोपे
--------------
http://m.lokmat.com/national/topic-euthanasia/

डॉक्टर होणाऱ्या नि प्रत्यक्ष डॉक्टरी करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला!

मुंबई : आधुनिकता आणि उदारमतवादाच्या रेट्यामुळे भारतीय स्त्रियांच्या पायांतील बेड्या किंचित मोकळ्या व्हायला सुरुवात झाली असतानाच्या काळात गरुड भरारी घेणाऱ्या दोघींची नावं कायम लक्षात राहतात. त्यातील एक नाव डॉ. आनंदीबाई जोशी आणि दुसरे डॉ. रखमाबाई राऊत! एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात दोघींनी तत्कालीन समाजव्यवस्थेच्या स्त्रीविषयक गैरसमजुतींना छेद देत, आपापले कर्तृत्व सिद्ध केले. या दोघीही साधारण एकाच काळात एकाच क्षेत्रातील कर्तबगार महिला म्हणून नावारूपाला आल्या. त्यासाठी दोघींना समाजाच्या धारणांशी संघर्ष करावा लागला. या साम्यस्थळांबरोबरच दोघींच्या संघर्षात सूक्ष्मभेदही आहेत. आनंदीबाई यांना थेट तत्कालीन रुढींशी संघर्ष करावा लागला आणि त्यात त्यांच्यासोबत त्यांचे पती गोपाळराव पाठीशी उभे होते. पण रखमाबाईंचा संघर्ष रुढीबद्ध तत्कालीन कायद्याशीही झाला आणि त्यात त्यांचा सर्वांत मोठा झगडा थेट पतीशीच होता.
ठाण्याजवळच्या कल्याण येथील डॉ. आनंदीबाई यांचा विवाह तत्कालीन रितीप्रमाणे नवव्या वर्षी त्यांच्यापेक्षा तब्बल २० वर्षांनी मोठ्या असलेल्या गोपाळराव जोशींशी लावून देण्यात आला. वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांच्यावर अकाली मातृत्व लादले गेले. त्यातून जन्माला आलेले मुलं काही दिवसांतच दगावले आणि वैद्यकीय शिक्षण घेण्याचे त्यांच्या मनाने घेतले. त्यामुळे अमेरिकेत एमडीच्या प्रबंधाचा त्यांचा विषयही भारतीय आर्य स्त्रीचे प्रसूतीशास्त्र हाच होता. या प्रवासासाठी लोकहितवादींसारख्या सुधारकांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या गोपालरावांनी त्यांना प्रोत्साहित केले. मात्र या प्रवासात जाचक रुढींच्या बंधनाने आनंदीबाईंचा अवघ्या एकविशीत बळी घेतला. प्रकृतीने खचलेल्या आनंदीबाईंना अमेरिकेसारख्या देशाच्या हवामानाला मानवेल असा आहारबदल याच रुढीबद्धतेमुळे करता आला नाही. त्यामुळे क्षयाची बाधा होऊन त्या दगावल्या. भारतात आल्यावरही समुद्रलंघन करून आलेली महिला म्हणून अनेकांनी नाके मुरडली. यातून त्यांच्या उपचारांकडेही दुर्लक्ष झाले. आणि डॉक्टर म्हणून प्रत्यक्ष काम करू शकण्याआधीच त्या संपून गेल्या.
दुसरीकडे, रखमाबाई राऊत यांचा डॉक्टर असलेला सुधारणावादी सावत्र पिता त्यांना प्रोत्साहित करीत होता. त्यामुळे त्यांना संकुचित- सनातनी पतिकडे न जाण्याचा निर्णयही ठामपणे घेता आला. मात्र या निर्णयाविरोधात त्यांना केवळ सामाजिकच नव्हे, तर न्यायालयीन लढही द्यावा लागला. नांदण्यास तयार नसलेल्या रखमाबाईंवर त्यांचा पती दादाजी भिकाजी याने थेट न्यायालयात खटला भरला. हे प्रकरण प्रचंड सामाजिक उलथापालथ घडविणारे ठरले. विशेष म्हणजे यात लोकमान्य टिळकांसारख्या थोर नेत्यानेही रखमाबाईला टिच्चून विरोध केला. तरीही रखमाबाईंनी न डगमगता हा खंबीरपणे हा लढा दिला. नांदायला जाणे किंवा ६ महिन्यांचा कारावास असा निकाल न्यायालयाने देताच रखमाबाईंनी कारावासाची सिद्धता दाखवली, पण नवऱ्याकडे जाण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर दोन हजार रुपयांची भरपाई पतीला दिल्यानंतर त्यांना या जाचक विवाहातून स्वतः सुटका करून घेता आली. आणि डॉक्टरीच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. इंग्लंडमध्ये डॉक्टरीची पदवी घेऊन, भारताच्या ओढीने त्या परतल्या आणि ९० वर्षांच्या दीर्घ आयुष्यात अखेरपर्यंत त्या मुंबईत वैद्यकीय व्यवसाय करीत राहिल्या. त्यांच्या लढ्यामुळे भारतात १८९१ साली पहिल्यांदाच लग्नासाठी किमान वय बंधनकारक करणारा कायदा अस्तित्वात आला. इथे विशेषतः नमूद करायला हवे की, पतीपासून विभक्त झाल्यानंतरही त्यांनी दुसरे लग्न केले नाही आणि पतीच्या निधनानंतर त्या विधवेच्या पोषखातच राहिल्या.
आज महिला दिनानिमित्त या दोन्ही दिग्गज महिलांना अभिवादन करतानाच, प्रत्येक महिलेतील स्त्रीत्वाचा आदर करण्यास प्रेरित होणे गरजेचे आहे. कारण शौर्य, धैर्य, पराक्रम, कर्तृत्व... अशा सगळ्या स्पृहणीय गोष्टी आपण नकळत 'पुरुषत्वा'शी आणि रडवेपणा, हळवेपणा, भित्रेपणा, अशा गोष्टी 'स्त्रित्वा'शी जोडतो. म्हणूनच 'खूब लढी 'मर्दानी' वो तो झाशिवाली रानी थी।, डॅशिंग आहे हा ती एकदम, एखाद्या पुरुषासारखी किंवा रडतोस काय पोरींसारखा; तुझ्यापेक्षा पोरी बऱ्या गाडी चालवतात', अशी वाक्य आपण सहज बोलून जातो. आज स्त्रीचा सन्मान होत असेल कदाचित, पण स्त्रित्वाचा अजून तितकासा नाही. कर्तृत्ववान स्त्रीला तिच्याही नकळत 'पुरुषी' गोटात ओढलं जातं आणि मग 'पुरुषत्वा'विना उद्धार नाही.. पुरुषत्वचं श्रेष्ठ हे बिंबवलं जातं. म्हणूनच बायकी वागणाऱ्या पुरुषांनाही हेटाळणी सहन करावी लागते आणि पुरुषी वागली की स्त्रीला विशेष किंमत दिली जाते. स्त्रित्व आणि पुरुषत्व यांच्यात  सामाजिक समता येत नाही, तोवर खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समता साधली जाणार नाही. ही 'त्व' समता लवकरच साधली जावो, याच महिला दिनी शुभेच्छा!!
- संकेत सातोपे
--------------
http://m.lokmat.com/sakhi/womens-day-2018-story-anandibai-joshi-and-rakhmabai-raut/

सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

शाकाहाराचा माज कशाला?

शाकाहारी असणं हे आपल्याकडे विनाकारणच आध्यात्मिकता, प्रासादिकता, शुद्धता, सात्विकता, वगैरेशी जोडलं गेलं आहे. वास्तविक वांग्याचं भरीत आवडतं म्हणून एखादा ते खातो आणि एखाद्याला आवडत नाही म्हणून तो खात नाही; इतकाच शाकाहारी - मांसाहारी हा विषय सोपा आणि सुटसुटीत असायला हवा. पण त्याभोवती अवघ्या अध्यात्माची गुंफण केली गेल्यामुळे अनेक शाकाहारींना आपण जरा विशेष सात्विक असल्याचा भास होत असतो आणि त्यांच्यासाठी मांसाहार हा ‘शीsss’ असतो. या ‘शीsss’ची शिटावळ त्यांच्या डोक्यातून धुऊन काढण्यासाठीच इथे चार गोष्टी लिहाव्याशा वाटतात.
           मुळात निव्वळ मांसाहारी असा माणूस या जगाच्या पाठीवर अस्तित्वाच नाही. माणूस एकतर शाकाहारी असतो किंवा ‘मिश्र आहारी’. मांसाहारींच्या जेवणातही कोंबडीच्या रश्श्यासोबत पोळी, भातच असतो. मात्र माणूस हा मूलत: शाकाहारी प्राणी आहे आणि त्याने मांसाहार करणे, हे अनैसर्गिक आहे, असा गैरसमज हेतुपुरस्सर शाकाहाराच्या भोक्त्यांकडून पसरविला जातो. त्यांना हे ठासून सांगावस वाटतं, बाबांनो! आदिम काळापासून माणूस हा प्राणी मिश्र आहारीच होता. भटक्या अवस्थेत जगताना, शिकारीतून मिळणारं मांस आणि कंदमुळं हेच त्याचं प्रमुख खाद्य होतं. आजही माणसाचा पूर्वज मानला गेलेला वानर हा प्राणी किडेही खातो आणि झाडपालाही. माणसाबरोबर सहस्रावधी वर्षांपासून राहणारे कुत्रा, मांजर आदी प्राणीसुद्धा असेच मिश्रआहारी आहेत. आज उत्क्रांत होऊन सहस्रावधी वर्षं लोटल्यानंतरही माणसाचे पुढचे काही दात हे दाढेच्या दातांपेक्षा वेगळे आणि मोठे- टोकदार असतात, गाई-म्हशींसारखे एकसारखे नसतात. हाही माणसाच्या नैसर्गदत्त मिश्र आहारी असण्याचा पुरावाच आहे. याच मंडळींकडून असंही पसरविलं जातं की, आयुर्वेदामध्ये मांसाहार निषिद्ध मानला गेला आहे. हाही धादंता खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार आहे. उलट आयुर्वेदाने अनेक आजारांमध्ये मांसाहारामुळे होणारे लाभ अधोरेखित केले आहेत, हे मला आयुर्वेदात एमडी करणाऱ्या माझ्या एक मैत्रिणीने सांगितलं. प्राचीन हिंदू संस्कृतीमध्येही मांसाहार निषिद्ध मानला गेलेला नाही. उलट देवासमोर विविध पशुपक्ष्यांचे बळी देऊन त्यांचे मांस प्रसाद स्वरूप वाटण्याचे प्रकार आजही आपण अनेक मंदिरांमध्ये पाहातो.
           मला एका गोष्टीचं कायमच आश्चर्य वाटत आलं आहे की, राम नवमीला मांसाहार नको, कृष्णाच्या देवळात मांसाहार करून जाऊ नका, असं सोवळं पांघरणारे किंवा मांसाहार करणाऱ्यांबाबत मनात किंतु बाळगणारे लोकं मुळात प्रभू श्रीरामच शाकाहारी नव्हते, हे का लक्षात घेत नाहीत. वाल्मिकी रामायणात वालीवधाच्या वेळी प्रत्यक्ष श्रीरामांनी शिकारीचं समर्थन केलं आहे, वालीची शाखामृग अशी संभावना केली आहे. राम हरीण मारायला गेले असतानाच सीतेचं अपहरण झालं, याकडेही सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं.
           शाकाहारामुळे बुद्धी शांत राहते, बौद्धिक क्षमता वाढते, सात्विकता येते, हा आणखी एक अपसमज. अहो ज्यांनी जीवावर बेतले असतानाही शांतीचीच शिकवण दिली आणि त्यानुसार आचरण केलं, ते जगभरात शांतीदूत मानले गेलेले येशु ख्रिस्त आणि भगवान गौतम बुद्ध हे दोन्ही महापुरुष शाकाहारी नव्हते. बुद्धांचे महापरिनिर्वाण तर डुकराच्या शिळ्या मांसातून विषबाधेने झाल्याचं मानलं जातं. त्याउलट लाखो लोकांचा नृशंस संहार करणारा क्रूरकर्मा हिटलर हा शाकाहारी होता. त्याचं प्राणीप्रेम इतकं पराकोटीचं होतं की, पशुअत्याचार प्रतिबंधक कायदा जगाच्या इतिहासात पहिल्यांदा हिटलरने केला. जगभरात हिंदू तत्त्वज्ञानाचा प्रचार करणारे आधुनिक तपस्वी आणि ज्यांच्या अजोड बौद्धिक क्षमतेचं कायम उदाहरण दिलं जातं ते स्वामी विवेकानंदही अजिबात शाकाहारी नव्हते. तारुण्याच्या काळात तर ते नाश्त्याला दोन-दोन, चार-चार बोकडांच्या मुंड्या फस्त करीत असत.
           मेलेल्या प्राण्यांचे मांस खाऊन पोटाची दफनभूमी करू नका, अशा पाट्या वाचण्यात येतात, तेव्हा विचारावस वाटतं की, तुम्ही शाकाहार करता म्हणजे काय पोटाची कचराकुंडी करता की काय? कारण मेलेले प्राणी पुरून किंवा जाळून टाकतात, तसा छाटलेला झाडपाला कचरापेटीत किंवा उकीरड्यावर टाकण्यात येतो. कोणतीही गोष्ट ही सापेक्ष असते आणि आपण त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहातो, यावरच त्याचं मूल्यमापन होतं. आता हेच बघा ना, ताटात वाढलेलं अन्न हे पूर्णब्रह्म, म्हणून आपण त्याला वंदन करत असतो. पण तेच ताटाबाहेर सांडताक्षणी खरकटं ठरवून त्याज्य मानतो. हा साधा साक्षेप, या अतिरेकी शाकाहारवाद्यांकडे नसतो, याचंच आश्चर्य वाटतं.
           मध्यंतरी एक पोस्ट समाजमाध्यमांवर फिरत होती. म्हणे, मांस-मच्छीला स्वत:ची चव अशी नसतेच; त्यात पडणाऱ्या मसाल्यांमुळे काय ती त्यांना चव येते, बाकी सर्व प्रकारचे मांस काय, मासे काय सारखेच. साहाजिकच या पोस्टचा कर्ता अतिरेकी शाकाहारवादीच असला पाहिजे. कारण ज्याला मांसाहाराची चव माहिती आहे, तो असली बालिश विधानं कधीच करणार नाही. या महाभागांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की, सगळ्या मांस-मासळीची चव जर सारखीच असते, तर त्यांच्या किमतीत इतका फरक का? मांदेली-बोंबलाचा वाटा १०० रुपये आणि पापलेटची जोडी हजार रुपये असे का? बॉयलर कोंबडी १५०-२०० रुपये किलो आणि बोकडाचे मांस ५०० रुपये हा भेद का? हे मांस विकणारे चापलूस आहेत की विकत घेणारे खवय्ये मूर्ख आहेत. तव्यावर परतण्यात येणाऱ्या माशांच्या वासावरून जिथे अस्सल खवय्याला ते सुके बोंबील आहेत, बांगडा आहे की रावस –पापलेट हे ओळखता येतं किंवा मटणाच्या रश्श्यावर सुटणाऱ्या तेलाच्या तवंगावरून ते कोवळ्या बोकडाचं आहे, बॉयलर कोंबडीच आहे की गावठीचं हे कळतं; तिथे सगळ्या मांसाहाराची चव सारखीच असते हे मांसाहार न करताच ठोकून देणाऱ्या या महाभागांच काय करायचं! मांस आणि विशेषत: माशांना दुर्गंध येतो, म्हणून ते ‘शीsss’ आहेत. असं म्हणणाऱ्यांना सांगवस वाटतो, ताज्या माशांना दुर्गंध येत नाही, तर उग्र वास येतो. पण शेपूच्या भाजीचा वास काय कमी उग्र असतो? जेवणात वापरता तो हिंग काय उग्र नसतो? आणि मासे खराब झाल्यावर दुर्गंध येतो म्हणाल, तर तो टवटवीत असताना सुगंधी असणाऱ्या फुलांनाही येतो. पटत नसेल, तर बाजार उठल्यावर दादरच्या फुल मार्केटमधून फेरफटका मारून बघा. कोणता दुर्गंध सुसह्य, कोणता असह्य हे आपल्या सवयी किंवा सोयीवरून ठरत असतं.
           मांसाहारामुळे हिंसा होते, असा ओरडा करणारे झाडपाल्यालाही जीव असतो हे विसतात की काय? आणि शेतात अनेक प्रकारचे जीवजंतू, प्राणी हे कीटकनाशकं आणि कृमीनाशकं फवारून मारण्यात येतात. त्यानंतरच आपल्याला हवा असणारा भाजीपाला उपलब्ध होत असतो. अनेक झाडांच्या मुळात खराब झालेले मांस-मासे खत म्हणून पुरले जातात. शिवाय आपण घेत असलेल्या विविध प्रकारच्या औषधांवर ती शाकाहारी असल्याचे (खाद्यपदार्थांच्या पाकिटांप्रमाणे) नमूद करण्यात येत नाही. आताआता कुठे सौंर्द्यप्रसाधनांवर ते नमूद करण्यात येऊ लागलं आहे. यकृतासंबंधी बहुतांश औषधांमध्ये माशाचं तेल हटकून वापरण्यात येतं. अन्य कोणत्याही जिवाची कोणतीही हानी न करता, आजवर कुणालाही जगता आलेलं नाही. त्यामुळे आपल्याला खाद्य मिळविण्यासाठी अन्य कुणाचा तरी बळी घेणं हा माणसाचाच नव्हे, तर सर्वच सजीवांचा स्वभाव आहे. असे बळी न घेता आपण कसं जगलो, हे भासवून सात्विकता मिरवणारे बऱ्याचदा दांभिक असतात.
           हा सगळा लेखन प्रपंच शाकाहारी असणाऱ्यांच्या मनात मांसाहाराबाबत आकर्षण निर्माण करण्यासाठी किंवा मांसाहाराचा प्रचार- प्रसार करण्यासाठी मुळीच नाही. मुळात शाकाहाराचा प्रचार करणाऱ्या संस्था-संघटना आहेत, पंथोपंथ आहेत. तशा मांसाहाराच्या प्रचारासाठी असल्याचे माझ्या ऐकीवात नाही. तशा संस्था नाहीत, यातच मांसाहाराचे स्वाभाविकपण किंवा निसर्गसंमतता आहे. ज्या गोष्टी नैसर्गिक नसतातच, त्याच अशा प्रयत्नपूर्वक आणि पुन्हा पुन्हा कराव्या लागतात. जसे की संस्कार; निसर्गत: प्राणी म्हणून जन्मणाऱ्या भय-भूक-निद्रा-मैथुन यांना बांधलेला असलेल्या माणसाला समाज धारणेच्या गरजेसाठी संस्कारी केलं जातं. आणि मग मला कसं वागायचयं यापेक्षा कसं वागलं पाहिजे याचा विचार करूनच तो आयुष्याच्या अखेरपर्यंत जगतो. हे ज्याला जितकं जास्त जमतं, तितका तो अधिक ‘चांगला माणूस’ ठरतो आणि ज्याला जमत नाही, तो दुराचारी! समाजधारणेसाठी अत्यावश्यक त्या ठिकाणी उपजत प्रेरणांना मुरड घालायलाच हवी, कारण त्याबदल्यात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मूलभूत गरजा भागविल्या जाण्याची हमी समाजव्यवस्थेकडून मिळते किंवा मिळाली पाहिजे. मात्र आधीच शेकडो प्रकारच्या भेदाभेदांनी ग्रासलेल्या भारतीय समाजात आणखी एका भेदाला कारणीभूत ठरणाऱ्या शाकाहारविरुद्ध मांसाहार या वादाला आपल्या नव्या पिढीने तरी मूठमाती दिली पाहिजे.
         धावत लोकल पकडल्यामुळे दम लागलेल्या एका मुलीला, माझ्या आईने पाणी दिलं, तर त्याही स्थितीत तिने, तुमच्या घरी नॉनव्हेज बनतं का, विचारलं आणि बनतं म्हटल्यावर पाणी घेणं नाकारलं. हा प्रसंग वरपांगी आम्हालाही हास्यास्पद वाटला, पण ही शुद्धाशुद्धतेची भावना जाऊन, मला मांसाहार आवडत नाही, म्हणून मला नको, असे म्हणणारी सामाजिक मानसिकता तयार व्हायला हवीच. त्यासाठीच मांसाहार हा ‘शीsss’ आहे, ही भावना आधी मांसाहारींनी सोडायला हवी. नेहमी मांसाहार करणारे देवाच्या नावे शाकाहार का करतात, हेच मला कळत नाही. मांसाहार पचायला जड असतो, म्हणून उपवासाला तो करत नाहीत, असा युक्तिवाद करणाऱ्यांना मला सांगावंसं वाटतं की, बासुंदी-पुरी या शुद्ध शाकाहारापेक्षाही बोंबलाचं सार आणि भात पचायला हलकं असतं रे. आणि पचायला जड असणारं अन्नच तामसी मानायला हवं. त्यात शाकाहारी किंवा मांसाहारी असा भेद कशाला!
           शाकाहार किंवा एकंदरीतच आहाराबाबतच्या अनाठायी दुराग्रहामुळे आपण आजवर अनेक महनीय व्यक्ती गमावून बसलो आहोत. पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी, प्रत्यक्ष डॉक्टरी करायला सुरुवात करण्यापूर्वीच ऐन तारुण्यात गेल्या. त्यामागे प्रमुख कारण होतं, ते अमेरिकेच्या वातावरणात आवश्यक तो आहार बदल न करण्याचा दुराग्रह. तीच कथा रामानुज यांच्यासारख्या थोर गणितज्ज्ञाची. अहो, निम्मी पेशवाई केवळ क्षयाने खोकून खोकून गारद झाली. शरीराला आवश्यक तितक्या प्रमाणात आहार न मिळणे किंवा खाल्लेले अंगाला न लागणे, ही क्षयाची कारणे आहेत, हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे ना. माझ्या एका मित्राचा मुलगा खेळून आल्यावर अचानक बेशुद्ध झाल्यासारखा पडला, त्याला गदागदा हलवून उठवावं लागलं. डॉक्टरने सांगितले की, याला किमान अंडी तरी खाऊ घालत जा. शरीराला आवश्यक तितकं त्याला शाकाहारी आहारातून मिळताच नाहीये. शेवटी शाकाहाराचा दुराग्रह बाजूला ठेवून त्याला अंड्याचा खुराक सुरू करण्यात आला.
       शाकाहार हे पूर्णांन नाहीये, असं माझं मुळीच म्हणणं नाही. पण शरीराला आवश्यक उष्मांक, प्रथिनं आणि अन्य घटक मिळण्यासाठी योग्य ते आणि योग्य त्या प्रमाणात शाकाहारी पदार्थ आपण खातो किंवा खाऊ शकतो का, हा प्रश्न आहे. मोठ्यांना तुम्ही आग्रह करू शकाल, लहान मुलं पेलाभर दूधही तुमच्या सांगण्यावरून नियमित पितीलच असं नाही. त्याऐवजी अंड्याच ऑम्लेट ते आवडीने खाणार असतील, तर केवळ शाकाहाराच्या दुराग्रहापायी त्याला या अन्नापासून दूर ठेवायचं का, हाही विचार केला पाहिजे.
           शाकाहारी सगळेच पदार्थ चांगले आणि मांसाहारी वाईट, ही अंधश्रद्धा आहे. अफू, गांजा, तंबाखू, भांग हे काय मांसाहारी पदार्थ आहेत का? म्हटलं तर झाडपालाच ना हा सगळा? पण तो शरीरासाठी घातक म्हणून आपण त्याज्यच ठरवतो ना. एकंदरच खाद्य काय, अखाद्य काय, हे आपल्याला काय पचतं किंवा आपल्या जीवनशैलीनुसार आपल्या शरीराला काय आवश्यक, काय चवीचं, त्यानुसार ठरवलं पाहिजे. केवळ सोवळ्या – ओवळ्याच्या श्रद्धांपायी उत्तम चवी आणि दर्जेदार खाद्य दूर लोटण्यात काय हशील? किमान आपण अखाद्य ठरवलेल्या गोष्टी इतरांसाठी खाद्य असल्या, तर त्याबाबत घृणा बाळगण्याचं तरी काही कारण नाही.

© - संकेत सातोपे

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

ब्राह्मण आणि ब्राह्मण्य


कोकणातलं दोन - अडीच हजार लोकसंख्येच माझं इटुकलं गाव. गावात ब्राह्मणांची तशी बरीच घरं आहेत. पण शेजार- शेजारच्या दोन ब्राह्मण कुटुंबांच्या मानसिकतेतील भेद प्रातिनिधिक स्वरूपात मला इथे मांडायचा आहे. यातल्या कुणालाही झुकतं माप द्यायचं नाही किंवा कुणालाही योग्य- अयोग्यही ठरवायचं नाही. केवळ वस्तुस्थिती मांडायची आहे.


यातील एका कुटुंबात अद्यापही रीतसर सोवळं- ओवळ पाळलं जातं. कुठल्या जातीच्या लोकांनी घराच्या आवारात यावं, कुठल्या जातीच्या मंडळींनी ओसरीपर्यंत आलेलं चालेल. त्यापलीकडे आणि स्वयंपाक घरात तर ब्राह्मणेतरांनी आलेलंच चालणार नाही, असे कटाक्ष आहेत. घरी आलेल्या ब्राह्मणेतरांसाठी वेगळी भांडी आहेत किंवा त्यांना दिलेली भांडी गोमूत्र शिंपडून घेतली जातात. त्यांच्या मुलांना फार कुणात मिसळू दिले जात नाही. त्यांच्या त्यांच्यातच खेळायचं, बोलायचं असा अघोषित बहिष्कार त्यांनी स्वतःच स्वतःवर लादून घेतला आहे. अन्य कुणाकडे जाऊन बसणं, खाणं- पिणं यावरही त्यांनी स्वतःच बंधन लादून घेतली आहेत. घरातल्या कार्यक्रमांतही फक्त ‘त्यांची’ माणसं असतात.
या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून, हल्ली त्यांना कामासाठी माणसं मिळत नाहीत. बागेतली कामही कायम खोळंबलेली असतात. अडल्या गरजेला पटकन धावून येणारं कुणीच नाही, अशी धास्ती तेच त्यांच्या नातलगांना बोलून दाखवतात. त्यातही घरात एखाद्या वृद्धाला ठेवून कुठे जायचं तर त्यांना जोखिम वाटते.

दुसऱ्या कुटुंबाची स्थिती याच्या परस्परविरुद्ध आहे. त्यांची मुलं अखंड गावासोबत खेळत, टिवल्या- बावल्या, धम्माल-मस्ती, कधी मारामाऱ्या - कुटकुट्या करत मोठी झाली. त्यांच्या घरात- माजघरातच काय, स्वयंपाक घरातही वाट्टेल तो माणूस पातेल ढवळताना सापडेल. अंगणात म्हणजे कायम गप्पांचे फड रंगलेले. घरातले सगळे गावातल्या प्रत्येकाचे दादा- भाऊ- आत्या- ताई. गावात कुणाचं दुखणं- खूपणं असू दे की अन्य कोणताही कार्यक्रम घरातली सगळी मंडळी हिरीरीने पुढे. जात कशाशी खातात ते घरात माहीत नाही. याचा अर्थ घरात व्रतवैकल्य, देवा- धर्माच होतं नाही, असं मात्र नाही. पण सोवळं नेसून फिरणं नाही की जपमाळ- भस्म- गंधाचे सोपस्कार नाहीत. माणसं सोडा गुरांढोरांवर, कुत्र्या- मांजरावरही तितकंच प्रेम. परिस्थिती बेताचीच पण म्हणून पाळलेल्या जनावरांचे काय आबाळ होतील…
या घरच कुठलंही काम अडत नाही. त्यांनी सांगायच्या आत स्वतःहून राबायला तयार असणारे ५-५० हात कायम पुढे असतात. कित्येकदा तर मजुरीसुद्धा न घेता त्यांचं प्रत्येक काम केलं जातं. रात्री घरात कुणी फार खोकल तरी शेजारची चार माणसं स्वतःहून उठून चौकशीला जातात. कुणी आजारी असेल, तर रात्र-रात्र थांबतात.
‘यांची बरी सगळी कामं होतात. यांना बरे कामाला लोकं मिळतात,’ असे खोचक टोमणे या कुटुंबाला गावातल्या त्यांच्याच नातलगांकडून ऐकावे लागतात.

तळटीप :

या पोस्टचा उद्देश केवळ वस्तुस्थिती मांडणे हा आहे. यावर मला कोणतेही मत व्यक्त करायचे नाही. संदर्भ मूल्य असलेला हा प्रकार जसाच्या तसा लोकांपुढे ठेवायचा आहे. यातून प्रत्येक जण ज्याच्या- त्याच्या मानसिकता, पूर्वसंस्कार आणि विचारधारेनुसार लावायचा तो अर्थ लावेल. ब्राह्मणद्वेष्ट्यांना कदाचित हे ब्राह्मणांना झोडपण्यासाठी आयते कोलीत वाटेल. ब्राह्मण्यवाद्यांना ही कदाचित खुसपट वाटेल. आणखी कुणाला काय, तर कुणाला काय… ज्याला जे वाटायचे आहे, त्याला ते वाटण्याची पूर्ण मोकळीक राहावी, यासाठीच या वस्तुस्थितीच्या आधारे मला मतप्रदर्शन करायचे नाही किंवा कोणताही निष्कर्षही मांडायचा नाही.

  • संकेत सातोपे