काही आठवड्यांपूर्वी देवव्रत रेखे या तरुणाने वेदाचे दंडक्रम पारायण पूर्ण केले. समाज माध्यमांवर त्याचे कौतुक करणाऱ्या प्रतिक्रियांबरोबरच, नेहमीप्रमाणे हे थोतांड ठरवणाऱ्या प्रतिक्रियाही उमटल्याच. वेद, वैदिक, उपनिषदे, संस्कृत, श्लोक, सुभाषितं, इतकंच काय प्रमाण मराठी बोलणंही काही मंडळींना ब्राह्मणी किंवा बामणी वाटतं. राजकीय तळी राखण्यासाठी अशी भूमिका घेणाऱ्यांचे समजू शकतो. पण कोणत्याच पक्षीय राजकारणाशी बाद्रायणी संबंध नसलेली मंडळीही जेव्हा या अपसव्य वळचणीला जातात, तेव्हा मात्र ‘अरेरे’ वाटल्याविना राहात नाही.
मूळात वैदिक वाङ्मय-परंपरा आणि प्रवाह ही ब्राह्मणांइतकीच ब्राह्मणेतरांचीही वडिलोपार्जित मिळकत आहे. तिचा मक्ता कोण्या एकाच समाजाकडे देण्याचे काही कारणच नाही. कालपर्यंत वेदाभ्यास बहुजनांना करू दिला जात नव्हता म्हणून संघर्ष करण्यात आले. आज गायत्री मंत्रापासून ते ऋग्वेदातल्या महामृत्यूंजय मंत्रापर्यंत कोणतेही मंत्र कुठेही, कधीही म्हणण्याचे, ऐकण्याचे स्वातंत्र्य अखिल मानव जातीला मिळालेले आहे. वेद-पुराणं सहज उपलब्ध आहेत. कोणीही व्यक्ती इच्छेनुसार ती वाचू-अभ्यासू शकतो. ती शिकवणारे अभ्यासक्रम विद्यापीठांत जातीनिरपेक्ष उपलब्ध आहेत. आता प्रश्न फक्त इतकाच आहे की, हे सारे अभ्यासायचे तर कष्ट उपसावे लागतात, त्याची आपली तयारी आहे का? त्यापेक्षा जे हे कष्ट घेतात, त्यांची खिल्ली उडवणं साेपं नाही का!
वेद शिकून काय उपयोग? त्याने काय पोट भरतंय? की लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळतायंत? असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण माणसाच्या असंख्य गरजांपैकी एक आध्यात्मिक-धार्मिक गरजही आहे, याचं भान आपण सुटू देता कामा नये. हडप्पा संस्कृतीमध्येही त्यांच्या अशा देवता आणि उपासना पद्धती होत्या. म्हणजेच अध्यात्म ही माणसाची आदिम गरज आहे. म्हणूनच द्रष्टे महानायक बाबासाहेब आंबेडकरांनीही बौद्ध धर्म स्वीकारला, पण हिंदू धर्म सोडून नास्तिक किंवा निधर्मी होण्याचा उपदेश केला नाही. डावे-विचारवंत वगैरे म्हणवणाऱ्यांचा कार्यालयातही लेनिन-स्टॅलिनची छायाचित्र असतात आणि दास कॅपिलट-कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हे त्यांचे धर्मग्रंथच झालेले आहेत. त्यांच्या तत्वज्ञानावर ‘विश्वास(श्रद्धा)’ ठेवावी असा त्यांचाही आग्रह असतोच.
मग आध्यात्मिक गरज अमान्य करून त्यापासून पळण्यापेक्षा ती स्वीकारून आपल्या सांस्कृतिक संचिताचा अभ्यास करण्यात किंवा निदान जो कोणी तो करत असेल, त्याचे कौतुक करण्यात काय पाप आहे! संस्कृत वाङ्मयाच्या निर्मितीत ब्राह्मणेतरांचेही योगदान असल्याचे असंख्य पुरावे उपलब्ध आहेत. स्वत: वेदव्यासांचा जन्म मत्सकन्येच्या पोटी झाला. वाल्मिकी अब्राह्मण, गायत्री मंत्राचे कर्ते विश्वामित्र क्षत्रिय, कालिदासही ब्राह्मणच असल्याचा काही पुरावा नाही. हे जर आपण स्वीकारणार असू तर सारं वैदिक वाङ्मय आपल्याला आपलं वाटू लागेल. पण ते आपलंस करण्यासाठी कष्ट मात्र घ्यावे लागतील. कारण ही वडिलोपार्जित मिळकत खरी, पण ती काही फक्त सात-बाराने आपलीशी होणारी नाही.
यात आणखी एक बागुलबुवा दाखवण्यात येतो, की या सगळ्याच्या नादी लागाल तर ब्राह्मण तुम्हाला बौद्धिक दास बनवतील किंवा तुम्हाला जाती वर्चस्व मान्यच करावे लागेल. याची तर आता सूतराम शक्यता नाही. उलट आपली शास्त्र आपणच जाणल्यामुळे प्रत्येक जातीत पुरोहित निर्माण होतील आणि आज आपण जसे जात न पाहता घराच्या फर्निचरच काम उत्तम कारागिराला देतो किंवा चांगली सेवा मिळते त्या सलोनमध्ये जातो, तोच प्रकार भिक्षुकांच्या बाबतीतही होईल. निदान व्हायला पाहिजे असा आशावाद आपण बाळगू शकतो. माझ्या पाहण्यात असे काही ब्राह्मणेतर भिक्षुक-पुजारी आहेत. तसंच ज्यांना यातलं काही न करता स्वांत सुखाय आवश्यक तेव्हढं जाणून घ्यायचं असेल, त्यांना तीही मुभा आहेच की. हिंदू धर्मात कुठे कशावर सक्ती आहे!


