रविवार, २८ डिसेंबर, २०२५

आपलं संचित जपणाऱ्यांची खिल्ली कशाला?

काही आठवड्यांपूर्वी देवव्रत रेखे या तरुणाने वेदाचे दंडक्रम पारायण पूर्ण केले. समाज माध्यमांवर त्याचे कौतुक करणाऱ्या प्रतिक्रियांबरोबरच, नेहमीप्रमाणे हे थोतांड ठरवणाऱ्या प्रतिक्रियाही उमटल्याच. वेद, वैदिक, उपनिषदे, संस्कृत, श्लोक, सुभाषितं, इतकंच काय प्रमाण मराठी बोलणंही काही मंडळींना ब्राह्मणी किंवा बामणी वाटतं. राजकीय तळी राखण्यासाठी अशी भूमिका घेणाऱ्यांचे समजू शकतो. पण कोणत्याच पक्षीय राजकारणाशी बाद्रायणी संबंध नसलेली मंडळीही जेव्हा या अपसव्य वळचणीला जातात, तेव्हा मात्र ‘अरेरे’ वाटल्याविना राहात नाही.

मूळात वैदिक वाङ्मय-परंपरा आणि प्रवाह ही ब्राह्मणांइतकीच ब्राह्मणेतरांचीही वडिलोपार्जित मिळकत आहे. तिचा मक्ता कोण्या एकाच समाजाकडे देण्याचे काही कारणच नाही. कालपर्यंत वेदाभ्यास बहुजनांना करू दिला जात नव्हता म्हणून संघर्ष करण्यात आले. आज गायत्री मंत्रापासून ते ऋग्वेदातल्या महामृत्यूंजय मंत्रापर्यंत कोणतेही मंत्र कुठेही, कधीही म्हणण्याचे, ऐकण्याचे स्वातंत्र्य अखिल मानव जातीला मिळालेले आहे. वेद-पुराणं सहज उपलब्ध आहेत. कोणीही व्यक्ती इच्छेनुसार ती वाचू-अभ्यासू शकतो. ती शिकवणारे अभ्यासक्रम विद्यापीठांत जातीनिरपेक्ष उपलब्ध आहेत. आता प्रश्न फक्त इतकाच आहे की, हे सारे अभ्यासायचे तर कष्ट उपसावे लागतात, त्याची आपली तयारी आहे का? त्यापेक्षा जे हे कष्ट घेतात, त्यांची खिल्ली उडवणं साेपं नाही का!


वेद शिकून काय उपयोग? त्याने काय पोट भरतंय? की लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळतायंत? असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण माणसाच्या असंख्य गरजांपैकी एक आध्यात्मिक-धार्मिक गरजही आहे, याचं भान आपण सुटू देता कामा नये. हडप्पा संस्कृतीमध्येही त्यांच्या अशा देवता आणि उपासना पद्धती होत्या. म्हणजेच अध्यात्म ही माणसाची आदिम गरज आहे. म्हणूनच द्रष्टे महानायक बाबासाहेब आंबेडकरांनीही बौद्ध धर्म स्वीकारला, पण हिंदू धर्म सोडून नास्तिक किंवा निधर्मी होण्याचा उपदेश केला नाही. डावे-विचारवंत वगैरे म्हणवणाऱ्यांचा कार्यालयातही लेनिन-स्टॅलिनची छायाचित्र असतात आणि दास कॅपिलट-कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हे त्यांचे धर्मग्रंथच झालेले आहेत. त्यांच्या तत्वज्ञानावर ‘विश्वास(श्रद्धा)’ ठेवावी असा त्यांचाही आग्रह असतोच.


मग आध्यात्मिक गरज अमान्य करून त्यापासून पळण्यापेक्षा ती स्वीकारून आपल्या सांस्कृतिक संचिताचा अभ्यास करण्यात किंवा निदान जो कोणी तो करत असेल, त्याचे कौतुक करण्यात काय पाप आहे! संस्कृत वाङ्मयाच्या निर्मितीत ब्राह्मणेतरांचेही योगदान असल्याचे असंख्य पुरावे उपलब्ध आहेत. स्वत: वेदव्यासांचा जन्म मत्सकन्येच्या पोटी झाला. वाल्मिकी अब्राह्मण, गायत्री मंत्राचे कर्ते विश्वामित्र क्षत्रिय, कालिदासही ब्राह्मणच असल्याचा काही पुरावा नाही. हे जर आपण स्वीकारणार असू तर सारं वैदिक वाङ्मय आपल्याला आपलं वाटू लागेल. पण ते आपलंस करण्यासाठी कष्ट मात्र घ्यावे लागतील. कारण ही वडिलोपार्जित मिळकत खरी, पण ती काही फक्त सात-बाराने आपलीशी होणारी नाही.


यात आणखी एक बागुलबुवा दाखवण्यात येतो, की या सगळ्याच्या नादी लागाल तर ब्राह्मण तुम्हाला बौद्धिक दास बनवतील किंवा तुम्हाला जाती वर्चस्व मान्यच करावे लागेल. याची तर आता सूतराम शक्यता नाही. उलट आपली शास्त्र आपणच जाणल्यामुळे प्रत्येक जातीत पुरोहित निर्माण होतील आणि आज आपण जसे जात न पाहता घराच्या फर्निचरच काम उत्तम कारागिराला देतो किंवा चांगली सेवा मिळते त्या सलोनमध्ये जातो, तोच प्रकार भिक्षुकांच्या बाबतीतही होईल. निदान व्हायला पाहिजे असा आशावाद आपण बाळगू शकतो. माझ्या पाहण्यात असे काही ब्राह्मणेतर भिक्षुक-पुजारी आहेत. तसंच ज्यांना यातलं काही न करता स्वांत सुखाय आवश्यक तेव्हढं जाणून घ्यायचं असेल, त्यांना तीही मुभा आहेच की. हिंदू धर्मात कुठे कशावर सक्ती आहे!

शनिवार, १० मे, २०२५

लढले नसते तर शिवराय आपला आदर्श असते का?

सध्या जो उठतोय तो युद्ध कसं विनाशकारी असतं आणि त्यामुळे कशी जीवित आणि वित्तहानी होते, हे सांगायला लागलाय. युद्धनंतर नेते मोठे होतील आणि सैनिक, नागरिक हकनाक मारले जातील वगैरे भावूक पोस्ट फोटो-व्हिडिओसह शेअर होऊ लागल्या आहेत. या साऱ्याचा सैनिकांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनोबलावर किती विपरित परिणाम होत असेल याचाही विचार केला जात नाही.

मूळात भारताने कोणतीही युद्धखोरीची कृती केलेली नाही. आज वर्षानुवर्षे आतंकवादाच्या माध्यामातून भारताशी छुपे युद्ध (प्रॉक्सी वॉर) करणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात कोणतीच लष्करी कारवाई करू नये, असं या लोकांच म्हणणं आहे का? बरं, प्रत्युत्तर द्यायला केंद्राकडून विलंब होत होता, तेव्हा हीच मंडळी कारवाई होत नाही म्हणून गळा काढत होती. आता कारवाई झाल्यावर, त्यांना युद्ध नकोय. अरे, आपल्या कारवाईचा परिणाम म्हणून जर आपल्यावर युद्ध लादलं जात असेल, तर ते आपण लढायला नको का? आणि एकदा लढाईला उभे राहिल्यावर, अरेरे इतकं नको करायला, हे क्षेपणास्त्र नको डागायला, जास्त लोकांना नको त्रास व्हायला, हे म्हणण्याला काय अर्थ आहे. युद्ध म्हटलं की युद्ध, ते भीषणच असणार, त्यात दोन्ही बाजूंनी जीवितहानीही होणारच, शत्रूच्या डावपेचांना उत्तर म्हणून आपल्याही सैन्याला रुद्रावतार धारण करावाच लागणार, वेळप्रसंगी नागरिकांचीही ससेहोलपट होणार, अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार, हे सगळं अध्याहृत असतानाही प्रत्येक व्यक्तीला काय किंवा राष्ट्राला काय कधी ना कधी युद्धाला सामोरं जावंच लागतं.

केवळ आणि केवळ दुष्टांच्या सत्तेसमोर झुकायचं नाही, म्हणून आजन्म जीव धोक्यात घालणाऱ्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राने युद्धाची तमा बाळगावी, याचच आश्चर्य वाटतं. युद्ध नको, संहार नको, जीवाला धोका म्हणून आपले शिवराय जर मिर्झाराजे जयसिंगासारखे मुघलांचे मांडलिकत्व पत्करून सुरक्षित, चैनीच आयुष्य जगले असते, तर आज ते आपले आदर्श असते का? शिवरायांनी त्यांच्या उक्ती-कृतीतून आपल्याला काय शिकवलं. सृष्टांचा सांभाळ करण्यासाठी दृष्टांचा संहार, हेच त्यांच्या जीवनाचं सूत्र होतं ना? त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी किती सोसलं, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.

आज वेळ आपली आहे, शिवराय केवळ शिवजयंतीच्या कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता आपल्या जीवनात त्याचं अनुकरण करायला हवं. माणुसकीच्या शत्रूसमोर ताठ मानेनं उभं राहायला हवं. विशेष म्हणजे त्यासाठी आपल्याला काहीही विशेष करायचं नाहीये. सगळं काही आपली सेनादलं आणि शासनच करणार आहेत. आपल्याला फक्त त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनोबलावर परिणाम करेल, असं कोणतंही वर्तन करायचं नाहीये. सैन्य आणि शासनाकडून येणाऱ्या सूचनांचं काटेकोर पालन करायचं आहे. तितकंही जर आपण करू शकलो नाही, तर आपण उद्याच्या इतिहासातले अण्णोजी दत्तो असू.


ता.क.: थेट युद्धछायेत असणाऱ्या लोकांसाठी गळा काढणाऱ्यांसाठी सांगतो. मी सध्या माझ्या पत्नी आणि साडे-चार वर्षांच्या मुलासह ब्लॅकआउट सुरू असलेल्याच भागातच राहतोय.

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५

'छावा' डाव्यांचा की उजव्यांचा?

हल्ली कोणताही ऐतिहासिक चित्रपट आला की, तो उजव्यांचा की डाव्यांचा हे आधी ठरवलं जातं. एकदा तशी शिक्कामोर्तब झाली की मग लगेच त्याचे समर्थक आणि विरोधक सोशल मीडियावरून रान उठवायला सुरुवात करतात. ‘छावा’मधूनही बामणे, भटूकडे, मनुवादी, संघी, हिंदुत्ववादी, उजवे आणि ‘चळवळी’तले, डावे, समाजवादी, सेक्युलर, फेक्युलर, ब्रिगेडी, बहुजनवादी अशा बिरुदांनी ओळखल्या जाणाऱ्या दोन प्रमुख गटांना त्यांच्या संकल्पनेतले छत्रपती संभाजी महाराज मोठ्या पडद्यावर पाहायचे होते. बरं, या दोन्ही गटांच्या समर्थकांची संख्या इतकी लक्षणीय आहे की, यातल्या एकाही गटाच्या मनातील ‘शंभू-प्रतिमेला’ धक्का लावणारं काही चुकूनही दाखवणं निर्माता चमूला व्यावसायिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं. पण वरील दोनपैकी एका गटात मोडणारा असं या चित्रपटाचं वर्गीकरण चटकन प्रेक्षकांना करता न येणं, याचाही या चित्रपटाच्या यशाला हातभार आहे.

संपूर्ण चित्रपट छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई याभोवतीच फिरणारा आहे. एकट्या मुघलांशी पाण्यातून, जंगलात, किल्ल्यावर अशा तीन-चार लढाया दाखवण्याऐवजी, जंजिऱ्याचा सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज आणि म्हैसूरचा चिकदेव अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेच्या लढाया दाखवायला दिग्दर्शकाला आयते अॅक्शन प्लॉट उपलब्ध होते. त्यातही जंजिऱ्याची नाविक लढाई वेगळेपणानेही दाखवता आली असती. पण हे सर्व मोह टाळून त्याने फक्त औरंगजेब खलनायक आणि संभाजीराजे नायक हेच चित्रपटाचं सरळसोट सूत्र ठेवलं. यामुळे संभाजीराजांच्या युद्धनीतीबद्दल अधिकाधिक माहिती पोहोचवता येण्याची संधी हुकली असली, तरीही ज्यांना संभाजीराजांबद्दल फारसं माहिती नाही, त्यांना नायकविरुद्ध खलनायक हे थेट समीकरण समजून घ्यायला सोपं झालं.


चित्रपटाचे कथानक सोपं करणारा हाच दिग्दर्शक उपरोक्त दोन गटांमधील वर्गिकरणाच्या तडाख्यातून सहीसलामत बचावून नेणारे काही प्रसंग चित्रपटात किती खुबीने पेरतो पहा. संभाजीराजे बुऱ्हाणपूरच्या स्वारीवरून परततात, तेव्हा त्यांच्या हस्ते भेट-वस्तू स्वीकारणारी एक मुसलमानी पगडी आवर्जून दाखवली जाते - सेक्युलर खूश. अनाजी पंताला हत्तीच्या पायांखाली देण्याचा भव्य सीन - बामण्यांचे विरोधक खूश. आता राहिले उजवे. एरव्ही संपूर्ण चित्रपटातल्या कोणत्याही लढाईत मुघल सैनिकांच्या तोंडी चुकूनही ‘दीन-दीन, अल्लाहू अकबर’ अशी कोणतीही घोषणा नाही. बुऱ्हाणपूर लुटीच्या प्रसंगात तर मराठे आल्याचं कळल्याबरोबर गढीच्या दाराजवळ धावून आलेल्या सैनिकांना आवेशाने तोंडतून बाहेर पडेल अशी युद्धघोषणाच दिलेली नसल्याने ते बावचळून नुसते ‘एSSS’ ओरडताना दिसतात. पण हा चित्रपट उजव्यांसाठीही करायचा आहेच. त्यामुळे अगदी शेवटाकडच्या प्रसंगात औरंगजेब पुटपुटतो, ‘...सिर्फ तुम्हे अपना धर्म बदलना पडेगा’.


सध्या सोशल मीडियावर उपरोक्त दोन्ही गटातील मंडळींच्या ज्या पोस्ट फिरतायंत, त्या पाहिल्या की दिग्दर्शकाने ‘छावा’ची नौका बॉक्स ऑफिसवर ‘गटां’गळ्या खाऊ नये म्हणून केलेल्या तारेवरच्या कसरती सार्थकी लागल्याचं दिसेल. कुणी म्हणतंय, ‘गद्दार बामण्यांना कसं हत्तीच्या पायी दिलयं ते पाहायचं असेल, तर छावा पहा.’ कुणी म्हणतंय, ‘हिंदू धर्माच्या अस्मितेसाठी बलिदान कसं करावं याची प्रेरणा घ्यायची असेल, तर छावा पहा.’ गंमत म्हणजे, ‘ब्रिगेडींच्या अपप्रचाराला बळी पडू नका आणि बामणी काव्याला भूलू नका,’ अशा नांदीने सुरुवात होणाऱ्या या दोन्हीकडंच्या प्रचारनाट्यांचं भरतवाक्य मात्र, ‘तर छावा पहा’, हेच आहे.


भूतकाळात होऊन गेलेल्या महनीय व्यक्ती या त्यांच्या कालखंडात आणि प्राप्त परिस्थिती त्यांना जे सर्वाेत्तम करता येणं शक्य होतं, ते केल्यामुळेच आदरणीय-वंदनीय ठरत असतात. त्यांच्या जीवन चरित्राचा उपयोग सध्याच्या राजकीय किंवा सामाजिक परिस्थितीत आपापल्या विचारधारेला टेकू म्हणून करणारे लोकं, कोणत्याही महापुरुषाचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यात यशस्वी ठरणं कठीणच असतं. ‘आम्हीच खरा इतिहास सांगतो’, असा कंठशोष करणाऱ्या या मंडळींचं म्हणणं खरंतर, ‘आम्ही सांगतो तोच खरा इतिहास आहे,’ असंच असतं. इतिहास हा कितीही निष्पक्षपातीपणे लिहिण्याचा प्रयत्न केला तरीही तो सापेक्षच असतो. त्यामुळे त्याला खऱ्या-खोट्याच्या तगडीत तोलण्याचे प्रयत्न फोल ठरतात. दुर्दैवाने, सांप्रतचे अभिनेवेश बाजूला ठेवून इतिहासाकडे पाहू शकणारे जनमतच सध्या क्षीण होत चालले आहे. त्यामुळेच कोणत्याही ऐतिहासिक कथानकाला हात घालणाऱ्या दिग्दर्शक-निर्मात्यांना उतेकर यांच्यासारखी तारेवरची कसरत करण्याला प्रत्यवाय राहत नाही.


सुदैवाने जेव्हा, ‘श्रूती धन्य जाहल्या, श्रवून अपूलि वार्ता, रण सोडून सेना सागर अमूचे पळता’ अशा ऐतिहासिक तथ्याला अजिबात धरून नसलेल्या कवितेच्या ओळी असलेला ‘विशाखा’ प्रसिद्ध झाला, तेव्हा ‘सत्य इतिहास संशोधकां’चे गल्लोगल्ली पेव फुटायचे होते. नाहीतर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या तेजस्वी स्फूर्तीगीताची भ्रूणहत्याच झाली असती. ‘हाताशी थोडी-फार मुलं असती, तर कोणीही किल्ले घेतले असते, शिवाजीने किल्ले घेतले त्याचा आम्हाला का त्रास’, असले विनोद करणाऱ्या पुलंना अभिनिवेशी नवइतिहासकारांनी मनुवादी किंवा राष्ट्रद्रोही या गटात टाकलं असतं. एकंदरीतच, ऐतिहासिक आशय(कंटेंट) आणि ऐतिहासिक कथानकावर बेतलेला ललित आशय या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि दोन्हीच्या प्रसूतीचे हेतूही भिन्न आहेत, याची जाणीव त्या पिढीत शाबूत होती. आता अभिनिवेशाच्या वेष्टनात गुंडाळून इतर सर्वच जाणिवा गंजवून सोडण्याचा एककलमी कार्यक्रम सर्वच राज्यकर्त्या आणि समाजकर्त्या मंडळींनी हाती घेतला आहे आणि त्यासाठी त्यांच्या हाती लागलेले सर्वात घातक शस्त्र आहे, ते म्हणजे ‘सोशल मीडिया’!


- संकेत सातोपे

बुधवार, १२ जुलै, २०२३

गच्चीची माडी होते तेव्हा

तशी ती संस्कारी घरातली; घरी स्नान-संध्या, उदात्त विचारांची देवाण-घेवाण, विचारवंतांची उठबस, वगैरे, वगैरे नित्यक्रम. पण काहीशा ठेगण्या, कृश कमलला, आपल्याला कुणी वरेल याची खात्रीच नव्हती. हा न्यूनगंड घेऊन अनेक नकार पचवतं, ती रोज सायंकाळी घराच्या गच्चीत खालून जाणाऱ्या वाटसरूंकडे शून्य नजरेने पाहात बसायची.

पण! प्रत्येकाचा येतो तसा तिचाही एक दिवस आलाच. सहज म्हणून त्याने नजर वर केली, ती या हताश विवाहेच्छुकीशी भिडली. तरण्याबांड पण काहीशा उनाड आणि टर्रेबाज अशा या मुलालाही त्याची नित्य मुजोरी चालवून घेणारी एखादी अबला संसार रेटायला हवीच होती. दोघांचीही गोत्रे भिन्न पण जाती एक, म्हणून घराचांनीही बिनबोभाट पसंती दिली.


झाला दोन गरजूंचा संसार उभयतांची गरज होती, तोवर चांगला वीसएक वर्षं चालला. पण आता कमलही चांगली कमावती होऊन, तिचा न्यूनगंड पार चेपला गेला होता. ती मुजोरी चालवून घेईना. त्याच्यातही आता वयोमानपरत्वे रेटून नेण्याची पहिली उमेद उरली नव्हती. शेवटी प्रकरण विकोप्याला गेले. पण विभक्त होउनही एकेकट्याने दोघांचा पाड लागेना. म्हणून डोक टेकायला त्यांनी खांदे शोधलेच. अर्थातच समाजाने ही नाती अनैतिक ठरवली. 


पण माणसाला एकदा अनैतिक सुखाची गोडी लागली की, त्याचा पाय कुठवरं घसरेल याचा नेम नाही. ज्या गच्चीतून संध्येचे बोल कानी घेत ती खाली बघायची, तिथेच ती आता सुगंधी गजरे माळून वाटसरूंकडे प्रणयोत्कट कामेच्छेने पाहू लागली. अरे, तो एक नाही तर त्याच्यासारखे छप्पन, अशा अहंगंडाने कालच्या हताशेची जागा घेतली होती. त्याला धडा शिकवण्याच्या ईर्ष्येत आपण स्वत:च चारित्र्य पणाला लावत आहोत, याची पुसटशीही जाणीव तिला नव्हती. तिला फक्त डाव जिंकायचा होता. त्यासाठी कितीही आणि कोणत्याही पुरुषांना छाताडावर नाचवायची तिची तयारी होती.


अखेर व्हायचं तेच झालं. कालच्या या सुसंस्कृत गच्चीची, आज उपभोगलोलूप माडी झाली. आता या माडीचे जिने कोण-कोण चढतं असतील!? सुज्ञास सांगणे न लगे.


  • संकेत सातोपे


(तळटीप: ही एक सामाजिक क(व्य)था आहे; राजकीय नव्हे.)

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

कोकणी चष्म्यातून वैदर्भी बोली



माझे एक जेष्ठ सहकारी इरसाल नागपुरीत मला नेहमी म्हणायचे, 'जा बे, तुम्ही मुंबई-कोकणातले लोकं! तुमच्यासाठी महाराष्ट्र सिंधुदुर्गात सुरू होतो आणि रत्नागिरी- रायगडमार्गे मुंबईत येऊन संपतो. त्याच्यापुढे तुम्हाला थेट यूएस-यूके किंवा सिंगापूरच लागतं.' या गमतीमागच्या वास्तवाची सर्वाधिक जाणीव मला '१० नोव्हेंबर २०१९' या दिवशी विदर्भकन्येचं पाणिग्रहण केल्यापासून व्हायला लागली. विदर्भातल्या चालीरिती, बोली, समस्या तर सोडाच; पण विदर्भात नेमके किती आणि कोणते जिल्हे आहेत, याचीसुद्धा माहिती मुंबई-पुण्यात बसून अखंड महाराष्ट्रासाठी कंठशोष करणाऱ्या किती जणांना असेल याबाबत शंकाच आहे. हिंगोली, वाशिम, गोंदिया या नावाचे जिल्हे महाराष्ट्रात आहेत, याचा पत्ताही नसलेले महानगरी-महाराष्ट्रप्रेमी- महाभाग माझ्या पाहण्यात आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाबाबतचा अभिनिवेश व्यक्त करताना आचार्य अत्रे म्हणाले होते, अन्य राज्यांना फक्त भूगोल आहे, आमच्या महाराष्ट्राला इतिहास आहे. महाराष्ट्राचे एकंदर राजकारण- समाजकारण हे अशाच अभिनिवेशावर चालतं. त्यामुळेच इतिहासकार मेहेंदळे म्हणतात त्याप्रमाणे, 'आपल्याकडे इतिहास हा अभ्यासाचा नव्हे तर भावनेचा विषय आहे.' तीच गत भूगोलाचीही आहे.

पण गेल्या वर्षभरात 'करून राहिले, बोलून राहिले,'च्या पलीकडील वैदर्भीय भाषिक व्यवहारातील अनेक वैशिष्ट्यं मला हेरता आली, अनेक नवीन शब्द कळले, काही शब्दांच्या भिन्न अर्थछटांशी तोंडओळख झाली. वैदर्भीय बोलीवरील राष्ट्रभाषेचा अतिरिक्त प्रभाव तर सर्वपरिचित आहे. त्यातूनच दुहेरी क्रियापदं वापरण्याची पद्धत रूढ झालेली आहे. हिंदीतील 'क्या कर रहे हो'चेच शब्दशः मराठीकरणं म्हणजे 'काय करून राहिले आहेत'. तसंच 'आमच्याकडे हे असं असतं', 'माझ्या पिशवीत खाऊ असतो'; याऐवजी हिंदीतील 'रहता है' प्रमाणे 'आमच्याकडे हे असं राहातं', 'माझ्या पिशवीत खाऊ राहातो', असं बोललं जातं. हिंदीप्रमाणे दोन क्रियापदं वापरायची ही सवय या बोलीत इतकी भिनली आहे की, जेव्हा अशी दोन क्रियापद योजता येत नाहीत तेव्हा एकच क्रियापद दोन वेळा उच्चारला जात. उदाहरणार्थ, हे 'घेऊन घ्या' ना; ते 'देऊन द्या' ना. वस्तुतः मराठीत 'द्या, घ्या' इतकंच पुरेसं आहे. पण इतकं लहान क्रियापद वापरणं अस्सल वैदर्भी जिभेला सोसणारच नाही. हल्ली प्रमाण मराठीमध्येही 'खूप सारे' असा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. हासुद्धा अशाच प्रकारचा आहे. खरंतर मराठीत 'खूप' हा शब्द परिपूर्ण आहे. पण हिंदीत 'ढेर सारे' या दोन शब्दांचा मिळून अर्थ बनतो, त्याच्याच (चॅनलीय) प्रभावामुळे आता मराठीच्या माथीही 'खूप सारे' आला आहे. यातल्या 'सारे' चा अर्थ खूपच्या जवळपासही जाणारा नाही. असो!


विदर्भातल्या या दुहेरी क्रियापद पद्धतीचा एक लाभही आहे. तो म्हणजे प्रमाण मराठीत जी क्रियापद मुळातच दुहेरी आहेत आणि केवळ बोलीभाषेच्या सोयीसाठी ती जोडून किंवा एकत्र करून वापरली जातात, ती क्रियापदं ही मंडळी सवयीने सहजच प्रमाण मराठीत बोलतात. उदाहरणार्थ, 'काय करतोयस ऐवजी काय करत आहेस, मी येतोय ऐवजी मी येत आहे. तो जातोय ऐवजी जात आहे.' क्रियापदांच्या बाबतीतलं एक गणित मात्र मला अजून सुटलेलं नाही. ते म्हणजे, 'बोलल्या जात आहे, केल्या जात आहे, वापरल्या जात आहे.' यातले सगळे 'ले' वैदर्भीय मराठीत 'ल्या' का होतात? हा प्रभाव बंगालीचा असावा, असा माझा बाळबोध कयास आहे.


वाक्यरचनेबाबत आहे तसेच काही शब्दप्रयोगांच्या अर्थछटांबाबतही भेद (विशेषतः वऱ्हाडात) पाहायला मिळतात. म्हणजे फजिती होणे हा शब्दप्रयोग, मुंबई-पुण्यात जसा 'चारचौघात फजिती झाली, शाहिस्तेखानाची फजिती केली' अशा अर्थछटेसह वापरला जातो, तसा विदर्भात नाही. तिथे कोणत्याही प्रकारची अडचण होणे म्हणजे फजिती होणे. उदाहरणार्थ, लॉकडाऊनमध्ये बाहेरून काही मागवता येत नाही, फार फजिती झाली आहे; रेल्वेचं तिकीट मिळालं नाही, फजिती झाली. असाच काहीसा प्रकार 'तंतोतंत'च्या बाबतीत, 'तो अगदी तंतोतंत पोहोचला', म्हणजे वेळेत नव्हे तर वेळ संपता संपता. 'कीव येणे' हा शब्दप्रयोग थेट 'दया येणे' याच अर्थी वापरला जातो. आणि 'गाडी समोर घ्या, दुकान आणखी थोडं समोर आहे' याचा अर्थ 'पुढे आहे' असा असतो. असे अनेक शब्दप्रयोग आहेत, जे सध्याच्या मुंबई-पुण्यातल्या बोलीपेक्षा काहीशा वेगळ्या पद्धतीने-अर्थाने वापरले जातात.


वाक्यरचना, अर्थभिन्नतेबरोबरच काही शब्दही चटकन लक्षात न येणार असतात. कोथिंबीरला सांबार म्हणतात हे बहुतेकांना माहीत असेल, पण टोप-भांड्याला गंज म्हटलं जातं. धुण्याच्या कपड्यांना पारथे, कोळ्याला कातीण, आंधळ्याला भोकना, बेचकीला गुलेर म्हटलं जातं. भयाड म्हणजे बावळट, चटोरी म्हणजे हावरट आणि मधात भेटू म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी असा अर्थ घ्यायचा असतो. लुस्त हा हिंदीतल्या चुस्तचा विरुद्धार्थी शब्द आहे. बारीक होण्याला रोड होणे आणि चुका काढण्याला कुच्या काढणे म्हटलं जातं.


कोकणी आणि नागपुरी मराठीत सगळ्यात मोठा भेद आहे तो लहजाचा. कोकणात साधा 'हो'सुद्धा 'होsssय' असा हेल काढून बोलला जातो आणि नागपुरीत कोणताही शब्द न ताणता अगदी थेट! पण हे असे कितीही भेद दाखवता आले, तरीही ही दोन्ही एकाच मायमराठीची लेकरं आहेत. त्यामुळे त्यांच्यात गोडवा मात्र तोच आहे, अमृताशी पैजा जिंकणारा!


© - संकेत सातोपे

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

मराठमोळे कोकण 'महामुंबई'च्या वाटेवर!

कशेळी…! उण्या-पुऱ्या दोन-अडीच हजार लोकसंख्येचं एक अस्सल कोकणी खेडं! वर्ष-दोन वर्षांमागे गावात लग्नाच्या पंगती उठत होत्या आणि बाहेर सायकलवर एका कुल्फीवाल्याने धंदा थाटला होता. तोडक्या- मोडक्या मराठीच्या आधाराने तो गल्ला जमवत होता. काही वेळाने लक्षात आलं की तो 'भय्या' आहे. रोजगाराच्या संधीच्या शोधत जिथले गावकरी वर्षानुवर्षं चाकरमानी झाले आहेत; त्या गावात याने शेकडो मैलांवरून येऊन रोजगार मिळवलेला पाहून जरा आश्चर्यच वाटलं.

कोकणाचं कॅलिफोर्निया होईल की नाही ते माहीत नाही; पण (राजकारणात अडकलेले) जैतापूर-नाणारसारखे येऊ घातलेले प्रकल्प पाहिले, तर कोकणाची लवकर महामुंबई होणार हे नक्की. चिपळूण-दापोली भागात लोढाने बांधलेल्या घरांच्या जाहिराती वरचेवर पाहायला मिळत आहेत. रत्नागिरीसारख्या शहरातील व्यवसायावर तर केव्हाच मारवाड्यांनी पकड बसवायला सुरुवात केली आहे. बोरकरांच्या कवितेतलाही 'मत्स्यगंध वारा' सोसणार नाही, अशा जैन वसाहतीही कुठे-कुठे नाक वर काढताना दिसत आहेत. आंबे काढणीसाठी नेपाळ्यांचे जथ्थेच्या जथ्थे इथे मुक्कामाला असतातच. कोकण बदलतंय, खूप वेगाने! विविध प्रकल्प सुरू झाल्यानंतर तर स्थलांतर आणखी वेग घेणार आहे. आता कोकणी माणूस या वेगावर स्वार होतो की अन्य स्वारांच्या वेगाखाली भरडला जातो, ते येणारा काळच दाखवेल.


रोमपासून ते इंग्लंडपर्यंत व्यापार करणाऱ्या कोकणाने आजवर अनेक स्थित्यंतर पाहिली. मुळात किनारपट्टीचा भाग असल्यामुळे अन्य कोणत्याही भूवेष्टित प्रदेशापेक्षा सहस्रो मैलांवरून येणारे बदल येथे देशी सरमिसळ न होता थेट आले. हेच पहा, बुरख्याचं भारतीयकरण होताना उत्तरोत्तर घुंगट-पदर असे बदल झाले. म्हणजे खुश्कीच्या मार्गाने आलेल्या इस्लामचा सर्वांत जास्त प्रभाव उत्तरेकडच्या राज्यांवर पडला, त्यामुळे तिथे अगदी बुरख्याच्या जवळ जाणारी घुंगट पद्धत आलेली दिसेल. पण महाराष्ट्रात केवळ 'डोईवर' पदर घेण्याची प्रथा! तेच आणखी जसजसे खाली-खाली जालं, तसं डोक्यावर पदर घेणं कमी कमी होत, केरळमध्ये तर अशी पद्धतच मुळी नाही. कथ्थक आणि भरतनाट्यम् चे पेहराव डोळ्यांपुढे आणून पहा, त्यातही या 'प्रभावां'मधलं अधिक-उणेपण लक्षात येईल. कोकणात मात्र शेकडो मैलांवरून शेकडो वर्षांपू्र्वी आलेल्या चालीरिती- बोलीच काय जनजातीसुद्धा त्यांची शारीरिक वैशिष्ट्यं बहुतांश जशीच्या तशी वागवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. निळे डोळे, श्वेतच म्हणावा असा गोरा वर्ण, वांगाचे ठिपके ही आजही ठळकपणे दिसणारी वैशिष्ट्यं उष्णकटिबंधीय दमट वातावरणात नक्कीच निर्माण झालेली नसणार. अलिबागच्या किनाऱ्यावर सिनेगॉग उभारणारे आणि कोकणी 'करां'ती आडनावं घेऊन इस्रायलला परतलेले ज्यू किंवा अगदी मराठी भाषक झालेले गोव्याच्या किनाऱ्यावरील हबशी, हे सगळेच थेट कोकणात आले आणि त्यांच्यावर कोकणी मातीतच देशीकरणाचे षोडशोपचार झाले. त्यामुळे या लाल मातीला स्थलांतरं नवीन नाहीत.


बदल स्वीकारत गेलो, तर प्रवाहीपण राहतं; नाहीतर माणसाचं काय किंवा समाजाचं काय डबकं होऊन जातं. पण बदल आंब्यावर पायरी-हापूसऐवजी शेवग्याचं कलम करणारे असले, तर मात्र ते झाडाच्याच मुळाशी येऊ शकतात. हेच मुंबई-पुण्यासारख्या महानगरांमध्ये झालेलं आपण आज पाहात आहोत. या गल्लेभरूंच्या पाशवी स्थलांतरात सर्वांत पहिला बळी जातो तो स्थानिक संस्कृती आणि त्याचा अविभाज्य घटक असलेल्या भाषेचा. तो जाऊ द्यायचा नसेल, तर राजकीय नव्हे तर वैयक्तिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. कारण भाषेच्या काय किंवा धर्माच्या काय राजकारणाने मोठे होतात ते नेते आणि पक्ष; भाषा किंवा धर्म नव्हे. वर्षभर बंगळुरात राहिल्यानंतर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, दक्षिणेत त्यांच्या भाषा टिकवल्या त्या भाषकांनी नेत्यांनी नव्हे. तिथे प्रत्येक माणसाला आपल्या भाषेचा केवळ अभिमानच नाही, तर गरजही वाटते. आपल्या भाषेत आपल्याला अधिक चांगलं कळतं, व्यक्त होता येतं, याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळेच त्यांना एखादा दुकानदार आपली भाषा बोलत नाही म्हणून त्याला थोबडावून काढ, कधी २-५ टॅक्सी फोड, मातृभाषेच्या जतनासाठी परिसंवाद-संमेलनं घे, असल्या बोथट तलवारींनी लढावं लागत नाही. 'केवळ अभिनिवेश म्हणून नव्हे, तर स्वाभाविकरित्याच आम्ही आमच्या भाषेत चित्रपट पाहतो, तुमच्या भाषेतला तुम्ही डब करून आणलात तरच तो आम्हाला कळतो; तुम्ही आमच्या भाषेत विकायला आलात तरच आम्हाला तुमच्या वस्तू घेता येतील, नाहीतर आम्हाला व्यवहार करणंच कठीण आहे. हा अगदी कुठलाही गाजावाजा न करता बनून गेलेला घरोघरीचा स्वभावधर्मच आहे. त्यामुळे मी पत्रकारांशी हिंदीत बोलणार नाही, हा तिथला राजकीय स्टंट नसतो, तर सहजकर्म असतं आणि ते इथे येणाऱ्यांच्याही सहज अंगवळणी पडलेलं दिसतं. दोन-दोन पिढ्या मुंबईत राहूनही दुकानदार मराठीत ४ वाक्य बोलू शकत नाहीत. पण १०-१२ वर्षं दक्षिणेत राहिले की स्थानिक भाषेत सहज व्यवहार कसे करू शकतात, याचं उत्तरही या 'स्वभावधर्मातच' आहे.


एखाद्या मालिकेत कुणीतरी मुंबईची भाषा हिंदी आहे म्हटल्यावर आम्ही त्यांना धमकावतो, त्यांच्याकडून तोंडदेखली क्षमायाचना करवून घेतो आणि मराठीचं संवर्धन झाल्याच्या मस्तीत पुन्हा वावरायला लागतो. असले शेकडो तोंडपूजे माफीनामे सत्ताधाऱ्यांना पाठवून त्यांच्या नाकाखालून आपल्या स्वराज्याच्या ध्वज उभारणाऱ्या शिवछत्रपतींचा आदर्श नक्की घेतलाय तरी कुणी? बिनबोभाट कार्यसिद्धी महत्त्वाची की प्रसिद्धीचा भपका? तलवार की मखमली म्यान? करवंट्या की खोबरं? हे प्रश्न राजकारण्यांसाठी नव्हे, तर तुमच्या माझ्यासाठी आहेत. कारण राजकारण्यांना फक्त तलवार म्यानातून काढून व्यासपीठावर दाखवायची आहे. रोजची अटीतटीची लढाई लढायचीय ती, तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांना.


कोळ्यांच्या मुंबईत माशांचा वास सहन न होणाऱ्या वसाहती उभ्या राहिल्या आहेत आणि पर्युषण पर्वात मांसविक्री बंद ठेवण्याची सक्ती करण्यात येत आहे. दैनंदिन व्यवहारातील मराठीशी अन्य भाषकांची सोडाच, मराठी माणसाचीही नाळ केव्हाच तुटली आहे. एकंदरीतच आगरी-कोळ्यांच्या मुंबईचा तोंडवळा आपल्याला मराठमोळा राखता आलेला नाही, हे अपयशी वास्तव आता मान्य करून निदान अन्य ठिकाणी तरी वेळीच जागं होण्याची गरज आहे. नाहीतर मुंबईप्रमाणेच कोकणातही लवकरच 'पयल नमन'ऐवजी, 'हमार ललनवा' चे स्वर ऐकू येतील. शिमग्याऐवजी छटपूजेच्या वेळी कोकण गजबजेल आणि 'कोकणी माणसाचे मुख्य अन्न कोणते? या प्रश्नाचं उत्तर भात व मासे असं देता येईल, पण ते इतिहासाच्या पेपरात; भूगोल किंवा परिसर अभ्यासाच्या नव्हे!


© - संकेत सातोपे

शनिवार, १८ जुलै, २०२०

विकास दुबे आणि न्यायव्यवस्था



कानपूरचा गुंड विकास दुबे असो की हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपी, पोलिसांच्या गोळ्यांनी कुणी ठार झाले की समाजातील मोठ्या वर्गात समाधानाची आणि न्याय झाल्याची भावना निर्माण झालेली दिसते. त्यानंतर ‘न्यायव्यवस्थेला बगल देऊन केलेला हा ‘न्याय’ कसा घातक आहे’ ते ‘असाच झटपट न्याय झाला पाहिजे’ अशी नेहमीचीच परस्परविरोधी मतमतांतराची वावटळही उठताना दिसते. पण जनमत हे असे होण्याचे कारण काय? या मूलभूत गोष्टीबद्दल कुणी फारसे बोलताना दिसत नाही. न्यायालयात जाऊन न्याय मिळणार नाही, तो असा बाहेरच मिळवायला हवा, अशी जर समाजधारणा झाली असेल तर ती का झाली याचा शोध घेणे आणि ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणे हे संबंधित व्यवस्थेचे कामच नाही का? पोलिसांनी कायदा हातात घेतला तर उद्या अराजक माजेल, असे म्हणताना जनतेचा न्यायपालिकेवरील विश्वास उडाल्यानेही असेच अराजक माजते हेही लक्षात घेतले पाहिजे.

शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, यासारख्या उक्तींमधूनही न्यायव्यवस्थेबाबतचा अविश्वासच प्रतित होत असतो. आपल्यावर होणारा शारीरिक, मानसिक वा सामाजिक अन्याय कोर्टात जाऊन दूर करून घेता येईल, असा विश्वास अशिक्षित, दीन-दुबळ्यांना सोडाच, पण सजग सुशिक्षितांनाही वाटत नसेल, तर ही व्यवस्था कुणासाठी आहे? आजोबांनी घातलेल्या दिवाणी दाव्यांचा निकाल नातवाच्या काळात लागल्याचे किस्से आपण घरोघरी गमतीने ऐकतो. चुकून-माकून न्यायालयाशी संबंध आलाच तर वकिलांची मुजोरी, तारीख-पे-तारीखच्या भानगडीत वेळ-पैशांचा बेसुमार अपव्यय, आपल्या बाजूने सोडा पण जो काही निकाल लागायचा आहे तो लागावा, या प्रतीक्षेत सरणारी उमेद, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून हा अविश्वास निर्माण होत आला आहे. म्हणूनच शिवीगाळ-छेडछाड-हाणामारी असो की एखादे मालमत्तेचे प्रकरण सर्वसामान्य माणूस आधी कोर्टाचे नव्हे, तर एखाद्या प्रभावी व्यक्तीचे पाय धरतो. यातूनच गावगुंडांना महत्त्व येते आणि पुढे त्यातलेच काही राजकारणात शिरून कायदे मंडळात जाऊन बसतात. ज्याची न्यायालयाबाहेरच भानगडी करण्याची आणि सोडवण्याची क्षमता अधिक तो सामान्यांचा मसिहा ठरतो. त्यामुळेच गुंड ठरवून गोळ्या घालण्यात आलेल्याच्या नावे रुग्णवाहिका फिरताना, सार्वजनिक उत्सव होताना दिसतात. अशा लोकांवर कारवाईलाही काही वेळा स्थानिकांचा विरोध होतो. या सगळ्या गोष्टी न्यायलय आणि जनता यांच्यातील दरी अधोरेखित करणाऱ्याच आहेत.

दुसरीकडे न्यायव्यवस्थेतील या दिरंगाईचा लाभ उठवणारेही लोक दिसतात. मग अनाठायी जनहित याचिका दाखल करणे, ठिकठिकाणी गुन्हे दाखल करून केवळ तारखा-तारखांना न्यायालयाचे खेटे मारायला लावून एखाद्या पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यापासून ते राजकीय विरोधकापर्यंत कुणालाही जेरीस आणणे, असले प्रकार केले जातात.

अन्यायाविरुद्ध न्यायालयात जायला घाबरणारे आणि कुणाला तरी वेठीला धरण्यासाठी न्यायालयात जाणारे या दोन्हीच्याही बुडाशी असतो न्यायव्यवस्थेतील दिरंगाईवरचा विश्वास! तो न्यायपालिकेच्या कार्यक्षमतेवर बसावा यासाठी राज्यकर्त्यांपासून ते नोकरशाहीपर्यंत सर्वांनी वेळीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा सध्या जागोजाग राजकीय संस्थानिक तयार झालेच आहेत, तसेच कोर्टाबाहेर न्याय करण्याची ही सवय उद्या भारताचे लोकशाही संघराज्य पुन्हा संस्थानिक राज्य केल्याविना राहणार नाही.



  • संकेत सातोपे