सध्या जो उठतोय तो युद्ध कसं विनाशकारी असतं आणि त्यामुळे कशी जीवित आणि वित्तहानी होते, हे सांगायला लागलाय. युद्धनंतर नेते मोठे होतील आणि सैनिक, नागरिक हकनाक मारले जातील वगैरे भावूक पोस्ट फोटो-व्हिडिओसह शेअर होऊ लागल्या आहेत. या साऱ्याचा सैनिकांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनोबलावर किती विपरित परिणाम होत असेल याचाही विचार केला जात नाही.
मूळात भारताने कोणतीही युद्धखोरीची कृती केलेली नाही. आज वर्षानुवर्षे आतंकवादाच्या माध्यामातून भारताशी छुपे युद्ध (प्रॉक्सी वॉर) करणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात कोणतीच लष्करी कारवाई करू नये, असं या लोकांच म्हणणं आहे का? बरं, प्रत्युत्तर द्यायला केंद्राकडून विलंब होत होता, तेव्हा हीच मंडळी कारवाई होत नाही म्हणून गळा काढत होती. आता कारवाई झाल्यावर, त्यांना युद्ध नकोय. अरे, आपल्या कारवाईचा परिणाम म्हणून जर आपल्यावर युद्ध लादलं जात असेल, तर ते आपण लढायला नको का? आणि एकदा लढाईला उभे राहिल्यावर, अरेरे इतकं नको करायला, हे क्षेपणास्त्र नको डागायला, जास्त लोकांना नको त्रास व्हायला, हे म्हणण्याला काय अर्थ आहे. युद्ध म्हटलं की युद्ध, ते भीषणच असणार, त्यात दोन्ही बाजूंनी जीवितहानीही होणारच, शत्रूच्या डावपेचांना उत्तर म्हणून आपल्याही सैन्याला रुद्रावतार धारण करावाच लागणार, वेळप्रसंगी नागरिकांचीही ससेहोलपट होणार, अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार, हे सगळं अध्याहृत असतानाही प्रत्येक व्यक्तीला काय किंवा राष्ट्राला काय कधी ना कधी युद्धाला सामोरं जावंच लागतं.
केवळ आणि केवळ दुष्टांच्या सत्तेसमोर झुकायचं नाही, म्हणून आजन्म जीव धोक्यात घालणाऱ्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राने युद्धाची तमा बाळगावी, याचच आश्चर्य वाटतं. युद्ध नको, संहार नको, जीवाला धोका म्हणून आपले शिवराय जर मिर्झाराजे जयसिंगासारखे मुघलांचे मांडलिकत्व पत्करून सुरक्षित, चैनीच आयुष्य जगले असते, तर आज ते आपले आदर्श असते का? शिवरायांनी त्यांच्या उक्ती-कृतीतून आपल्याला काय शिकवलं. सृष्टांचा सांभाळ करण्यासाठी दृष्टांचा संहार, हेच त्यांच्या जीवनाचं सूत्र होतं ना? त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी किती सोसलं, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.
आज वेळ आपली आहे, शिवराय केवळ शिवजयंतीच्या कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता आपल्या जीवनात त्याचं अनुकरण करायला हवं. माणुसकीच्या शत्रूसमोर ताठ मानेनं उभं राहायला हवं. विशेष म्हणजे त्यासाठी आपल्याला काहीही विशेष करायचं नाहीये. सगळं काही आपली सेनादलं आणि शासनच करणार आहेत. आपल्याला फक्त त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनोबलावर परिणाम करेल, असं कोणतंही वर्तन करायचं नाहीये. सैन्य आणि शासनाकडून येणाऱ्या सूचनांचं काटेकोर पालन करायचं आहे. तितकंही जर आपण करू शकलो नाही, तर आपण उद्याच्या इतिहासातले अण्णोजी दत्तो असू.
ता.क.: थेट युद्धछायेत असणाऱ्या लोकांसाठी गळा काढणाऱ्यांसाठी सांगतो. मी सध्या माझ्या पत्नी आणि साडे-चार वर्षांच्या मुलासह ब्लॅकआउट सुरू असलेल्याच भागातच राहतोय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा