दिल्लीत उसळलेल्या धार्मिक दंगलीमुळे केवळ मुसलमानांवर अन्याय झालाय. ते यातले खरे नुकसानग्रस्त आहेत. बाकी हिंदू वस्त्यांवर आणि सुरक्षा दलांच्या जवानांवर पूर्वनियोजितपणे झालेले हल्ले, त्यांची हत्याकांडे, या गोष्टींचा तसा फारसा गाजावाजा करण्यासारखे नाही. मुळात मुसलमानांनी हल्ले केले असे म्हणणेच, प्रतिगामी-धर्मांध किंवा मोदीभक्त असल्याचे लक्षण आहे. पण मुसलमानांवर हल्ले झाले असे म्हणणे धर्मनिरपेक्षतेचे लक्षण आहे. 'दंगलीत किंवा सामूहिक हिंसाचारात दंगेखोर समाजकंटक आणि सर्वसामान्य पीडित हे दोनच गट असतात,' हे वाक्य तोपर्यंतच योग्य आहे जोपर्यंत दंगेखोर प्रामुख्याने मुसलमान आणि पीडित प्रामुख्याने हिंदू असतात. हीच स्थिती उलट झाली की ते 'हिंदू हल्लेखोर' आणि 'मुस्लिम पीडित' होतात. मुस्लिम धर्मीय दहशतवाद्यांकडून हल्ले होत असतात, तोपर्यंत 'दहशतवादाला धर्म नसतो,' बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये हिंदू नावे सापडायला लागली की मात्र तो 'भगवा दहशतवाद' होतो. 'मशिदीतून नमाज' पडून घरी जाताना आपल्याला कशी मारहाण झाली, हे सांगणाऱ्याच्या चित्रफिती आघाडीच्या 'धर्मनिरपेक्ष, पुरोगामी' माध्यमांकडून पद्धतशीर प्रसिद्ध केले जातात. पण देशाच्या एका गुप्तहेर जवानाला नियोजितपणे २००-२०० वेळा भोसकून मुस्लिम गुंडांकडून मारले जाते, तेव्हा तो मात्र दंगलीतला बळी असतो.
या भंपकपणामुळे धर्मनिरपेक्षपणा, सर्वधर्मसमभाव या शब्दांचेच हसे होऊन बसले आहे. एखाद्याने स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवले रे म्हणवले की लगेच तो मोदीविरोधी, ३७० कलम रद्द करण्याविरोधी, तिहेरी तलाक रद्द करण्याविरोधी आणि अंतिमतः स्वतःला हिंदू म्हणवण्याविरोधीही असलाच पाहिजे; इथपर्यंत सगळ्यागोष्टी अध्याहृत असतात. उलट एखाद्याने स्वतःला 'हिंदुत्ववादी-प्रेमी' म्हटले की, त्याची शेपटी थेट नरेंद्र मोदी-संघ इथपासून नथुराम गोडसेपर्यंत नेऊन भिडवली जाते. 'सामाजिक ओळखी'चे दोनच पर्याय सध्या शिल्लक ठेवण्यात आलेले आहेत आणि असल्या सामाजिक प्रश्नावर 'समाजभान' असलेल्या प्रत्येकाने या दोनपैकी कोणत्या तरी एक गटात असणे बंधनकारक असते. किंबहुना एकदा एका प्रश्नावर एका गटाच्या जवळ जाणारी भूमिका घेतली रे घेतली की पुढच्या प्रत्येक प्रश्नावर तुम्ही त्या गटाला अनुकूल अशीच भूमिका घेणार हे गृहीत धरले जाते किंवा तसा वैचारिक दबाव तुमच्यावर आणला जातो.
एखादी व्यक्ती किंवा विचारधारा यांचा प्रभाव वाढण्यास हे वातावरण अत्यंत पोषक आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच देता येईल. त्यांनी पाकिस्तानात घुसून लष्करी कारवाया केल्या, याचा कोणाही भारतीयाला अभिमानच वाटणार ना? पण तो वाटला आणि तो तुम्ही व्यक्त केला, तर तुम्ही थेट मोदीभक्त गटात मोडले जाता. त्याउलट तुम्ही येनकेन प्रकारे त्याची टर उडवली किंवा शाहजोगपणे त्याकडे दुर्लक्षच केले, तर मात्र तुम्हाला पुरोगामी होण्याची संधी आहे. पण यामुळे मोदींचे काम सोपे झाले. कारण सहज नाकारता न येणारे पाकिस्तानला धडा शिकवण्याचे काम त्यांनी केले आणि त्यासाठी एकदा एखाद्याच्या तोंडून 'वाह' निघाले की झालाच त्याचा 'मोदीभक्त' म्हणून बाप्तिस्मा आणि झाला तो पुरोगाम्यांच्या कोंडाळ्यातला बाटगा!
चांगल्या गोष्टीला चांगले आणि वाईटाला वाईट, मग ती गोष्ट कोणत्याही धर्म-जाती-समुदाय वा व्यक्तीची असो; असे म्हणण्याऐवजी उगाच काथ्याकूट करत बसायचे आणि वास्तवाकडे दुर्लक्ष करायचे ही कथित पुरोगाम्यांची वृत्तीच आज हिंदुत्ववादी मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या खूप पथ्यावर पडली आहे. कोणत्याही प्रकारच्या ध्रुवीकरणाला अत्यंत अनुकूल पार्श्वभूमी उपलब्ध करून देणारी ही वृत्ती आहे. दिल्लीत 'आप'ने हे वेळीच लक्षात घेऊन, स्वतःचा बचाव करून घेतला.
हिंदुत्ववाद्यांची कथा काही फार वेगळी नाही. हिंदुत्व हे सवर्णीय वर्चस्ववादी आहे, त्याला ब्राह्मण्याची किनार आहे, असा प्रचार करून बहुजनांना हिंदुत्वाच्या कक्षेबाहेर ठेवण्याचे प्रयत्न सतत सुरू असताना आणि ते खोडून काढण्याचे प्रयत्न तोकडे पडताना दिसतात. आंतरजातीय विवाहांना विरोधातून होणारी हत्याकांडे, दलितांवरील अत्याचाराच्या घटना, अंधश्रद्धांतून होणारे अनिष्ट प्रकार, अशी प्रकरणे बाहेर येतात तेव्हा त्यावर सर्वांत आधी सच्चा हिंदुत्ववाद्याने तुटून पडणे गरजेचे आहे. ती पोकळी त्यांनी भरून न काढल्यामुळे कथित पुरोगामींच्या प्रचाराला बळ मिळते.
मुळात देशभक्ती, मुस्लिम धर्मांधता, फुटीरतावाद अशा जरा आपल्याला अडचणीच्या ठरू शकणाऱ्या प्रश्नांवर सुस्पष्ट उत्तरे देण्यापेक्षा त्याबाबत मोघम, गुंतागुंतीचे राहणे किंवा प्रतिप्रश्न करून, दुसऱ्या गटाचेही तसेच दुर्गुण दाखवून त्या प्रश्नांना बगलच देणे, ही सध्याच्या पुरोगाम्यांची एक शैलीच झाली आहे. असल्या प्रश्नांच्या बाबतीत पुरोगाम्यांची जी तऱ्हा तीच जातीयवाद, आंतरजातीय विवाह, दलित-आदिवासी अत्याचार, अंधश्रद्धा आदी बाबतीत हिंदुत्ववाद्यांची आहे. या दुतर्फा मोघमतेवर अमोघ उत्तरे शोधणारे आणि सर्वसामान्य भारतीयांना नवी वैचारिक, राजकीय, सामाजिक दिशा देणारे खरेखुरे पुरोगामी विचारवंत-नेते निर्माण होत राहणे, हीच या देशाच्या प्रगतीची गुरुकिल्ली असेल.
@ संकेत सातोपे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा