सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

ब्राह्मण आणि ब्राह्मण्य


कोकणातलं दोन - अडीच हजार लोकसंख्येच माझं इटुकलं गाव. गावात ब्राह्मणांची तशी बरीच घरं आहेत. पण शेजार- शेजारच्या दोन ब्राह्मण कुटुंबांच्या मानसिकतेतील भेद प्रातिनिधिक स्वरूपात मला इथे मांडायचा आहे. यातल्या कुणालाही झुकतं माप द्यायचं नाही किंवा कुणालाही योग्य- अयोग्यही ठरवायचं नाही. केवळ वस्तुस्थिती मांडायची आहे.


यातील एका कुटुंबात अद्यापही रीतसर सोवळं- ओवळ पाळलं जातं. कुठल्या जातीच्या लोकांनी घराच्या आवारात यावं, कुठल्या जातीच्या मंडळींनी ओसरीपर्यंत आलेलं चालेल. त्यापलीकडे आणि स्वयंपाक घरात तर ब्राह्मणेतरांनी आलेलंच चालणार नाही, असे कटाक्ष आहेत. घरी आलेल्या ब्राह्मणेतरांसाठी वेगळी भांडी आहेत किंवा त्यांना दिलेली भांडी गोमूत्र शिंपडून घेतली जातात. त्यांच्या मुलांना फार कुणात मिसळू दिले जात नाही. त्यांच्या त्यांच्यातच खेळायचं, बोलायचं असा अघोषित बहिष्कार त्यांनी स्वतःच स्वतःवर लादून घेतला आहे. अन्य कुणाकडे जाऊन बसणं, खाणं- पिणं यावरही त्यांनी स्वतःच बंधन लादून घेतली आहेत. घरातल्या कार्यक्रमांतही फक्त ‘त्यांची’ माणसं असतात.
या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून, हल्ली त्यांना कामासाठी माणसं मिळत नाहीत. बागेतली कामही कायम खोळंबलेली असतात. अडल्या गरजेला पटकन धावून येणारं कुणीच नाही, अशी धास्ती तेच त्यांच्या नातलगांना बोलून दाखवतात. त्यातही घरात एखाद्या वृद्धाला ठेवून कुठे जायचं तर त्यांना जोखिम वाटते.

दुसऱ्या कुटुंबाची स्थिती याच्या परस्परविरुद्ध आहे. त्यांची मुलं अखंड गावासोबत खेळत, टिवल्या- बावल्या, धम्माल-मस्ती, कधी मारामाऱ्या - कुटकुट्या करत मोठी झाली. त्यांच्या घरात- माजघरातच काय, स्वयंपाक घरातही वाट्टेल तो माणूस पातेल ढवळताना सापडेल. अंगणात म्हणजे कायम गप्पांचे फड रंगलेले. घरातले सगळे गावातल्या प्रत्येकाचे दादा- भाऊ- आत्या- ताई. गावात कुणाचं दुखणं- खूपणं असू दे की अन्य कोणताही कार्यक्रम घरातली सगळी मंडळी हिरीरीने पुढे. जात कशाशी खातात ते घरात माहीत नाही. याचा अर्थ घरात व्रतवैकल्य, देवा- धर्माच होतं नाही, असं मात्र नाही. पण सोवळं नेसून फिरणं नाही की जपमाळ- भस्म- गंधाचे सोपस्कार नाहीत. माणसं सोडा गुरांढोरांवर, कुत्र्या- मांजरावरही तितकंच प्रेम. परिस्थिती बेताचीच पण म्हणून पाळलेल्या जनावरांचे काय आबाळ होतील…
या घरच कुठलंही काम अडत नाही. त्यांनी सांगायच्या आत स्वतःहून राबायला तयार असणारे ५-५० हात कायम पुढे असतात. कित्येकदा तर मजुरीसुद्धा न घेता त्यांचं प्रत्येक काम केलं जातं. रात्री घरात कुणी फार खोकल तरी शेजारची चार माणसं स्वतःहून उठून चौकशीला जातात. कुणी आजारी असेल, तर रात्र-रात्र थांबतात.
‘यांची बरी सगळी कामं होतात. यांना बरे कामाला लोकं मिळतात,’ असे खोचक टोमणे या कुटुंबाला गावातल्या त्यांच्याच नातलगांकडून ऐकावे लागतात.

तळटीप :

या पोस्टचा उद्देश केवळ वस्तुस्थिती मांडणे हा आहे. यावर मला कोणतेही मत व्यक्त करायचे नाही. संदर्भ मूल्य असलेला हा प्रकार जसाच्या तसा लोकांपुढे ठेवायचा आहे. यातून प्रत्येक जण ज्याच्या- त्याच्या मानसिकता, पूर्वसंस्कार आणि विचारधारेनुसार लावायचा तो अर्थ लावेल. ब्राह्मणद्वेष्ट्यांना कदाचित हे ब्राह्मणांना झोडपण्यासाठी आयते कोलीत वाटेल. ब्राह्मण्यवाद्यांना ही कदाचित खुसपट वाटेल. आणखी कुणाला काय, तर कुणाला काय… ज्याला जे वाटायचे आहे, त्याला ते वाटण्याची पूर्ण मोकळीक राहावी, यासाठीच या वस्तुस्थितीच्या आधारे मला मतप्रदर्शन करायचे नाही किंवा कोणताही निष्कर्षही मांडायचा नाही.

  • संकेत सातोपे

1 टिप्पणी:

  1. खूपच मस्त आणि वास्तववादी.....कदाचीत प्रगती खुंटण्याची हीच कारण असावीत

    उत्तर द्याहटवा