तान्हाजी मालुसरेंचा पडद्यावर दाखवलेला इतिहास किती वस्तुनिष्ठ, पुरावेजन्य आदी गोष्टी बाजूला ठेवून केवळ एक 3D पट म्हणून पाहिल्यास त्याची भव्यदिव्यता अनुभवता येते. कोणताही चित्रपट बनवताना दिग्दर्शकाने स्वातंत्र्य घेणं स्वाभाविकच आहे, अन्यथा तो माहितीपट होईल आणि माहितीपटातून बॉलिवूडची व्यावसायिक गणितं साधणं कर्मकठीण! त्यामुळे कोणत्याही बॉलिवूड निर्मात्याने असे पट बनवावेत, ही मागणीचं मुळात अवास्तव; त्यातूनही बनवलेच तर ते विशिष्ट बुद्धीजीवींपर्यंतच मर्यादित राहतील. तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहचू शकणार नाहीत. कथा-कादंबऱ्या-चित्रपट यातून इतिहास जितका सहज-सुलभ सर्वांपर्यंत पोहोचतो तितका इतिहास ग्रंथांतून नाही, हे आपण मान्य करायला हवं. ग्रंथ अभ्यासकांसाठी असतात, सामान्य वाचकांना त्यात रस असेलच असं नाही. म्हणूनच सेतू माधवराव यांच्यापेक्षा 'श्रीमान योगी' लिहिणारे रणजित देसाई अधिकांना माहीत असतात, ते वाचलेले असतात.
यात फक्त एक आग्रह कायमच धरायला हवा, तो म्हणजे सिनेस्वातंत्र्य घेताना संबंधित महापुरुषाचे अवमूल्यन होऊ नये. ते 'तान्हाजी'मध्ये कुठेही झालेलं नाही. 'तान्हाजीं'च्या पराक्रमाची पांढरी रेघ उठून दिसावी, यासाठी उदयभानची कुवत अधोरेखित करणारे तसेच कोंढण्याचे महत्त्व प्रेक्षकांच्या मनावर ठसवणारे अनेक काल्पनिक प्रसंग पटकर्त्यांना घालावे लागले. पण त्यांनी ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर अन्याय केला, असं काही म्हणता येणार नाही. उदाहरणच द्यायचं झालं, तर चंद्रजी पिसाळ या पूर्णतः काल्पनिक व्यक्तिरेखेचं देता येईल. कोंढण्यासंदर्भात ही व्यक्तिरेखा निव्वळ काल्पनिक असली, तरीही पुढे संभाजी महाराजांनंतरच्या काळात सूर्याजी पिसाळ ही व्यक्ती स्वराज्यद्रोह करून औरंगजेबाला मदत करण्यासाठीच कुप्रसिद्ध आहे. पटकर्त्यांनी हे भान राखलं आहे. चित्रपटात मसाला म्हणून व्यक्तीरेखा उभी करतानाही हा संदर्भ विचारात घेतला आहे. हे इतकं केलं तरीही पुरे नाही का?
असे चित्रपट म्हणजे इतिहासाविषयी लोकांची उत्सुकता चाळावण्याचं माध्यम आहे. यातून जिज्ञासा चाळावलेले लोक नक्की पुस्तकं, माहितीपट वगैरे शोधून काढून नेमकी माहिती मिळवतात. 'पानिपत' चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी माझ्याकडून संबंधित पुस्तकांची नावं विचारून घेतली, कुठे मिळतील याची विचारपूस केली. असं होऊ लागलं की अशा चित्रपटांचे उद्देश सफल झाले, नाही का!
शतकोत्तरी गाठलेला बॉलिवूडचा ढुढाचार्य आता कुठे भारतीय इतिहासातील या सोनेरी पानांकडे वळू लागलाय, देशभरातील प्रेक्षकही त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत. अशा वेळी खुसपटं काढत बसायचं की, असे प्रयत्न उचलून धरायचे हे आपलं आपणच ठरवायला हवं.
- संकेत सातोपे

Very true
उत्तर द्याहटवाखरं आहे
उत्तर द्याहटवाखूप सुंदर व संतुलित विश्लेषण
उत्तर द्याहटवाखूप सुंदर
उत्तर द्याहटवा