शनिवार, ३१ मार्च, २०१८

विस्मृतीच्या गर्तेतील आद्य महिला नाटककार!
प्रसिद्धी पटलावर येणाऱ्या कलाकारांची आपल्याला ओळख असते. त्यांच्या कलाकृती, त्यांची नावं आपण चिरकाल लक्षात ठेवत असतो. पण असे अनेक अज्ञात प्रतिभावंत आपल्या आजूबाजूलाच होऊन गेले आहेत, ज्यांची आपल्याला तोंडओळखही नाही. नियतीने त्यांचे काम आपल्यापर्यंत पोहोचू दिलेले नाही, याची जाणीव शिल्पा सुर्वे Shilpa Surve लिखित आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांचे चरित्र वाचताना होते.
लेखिकेने संदर्भ- पुराव्यांसह केलेली मांडणी पाहता, हे पुस्तक phd चा शोधनिबंध म्हणूनही सादर होऊ शकले असते, असे वाटते. पण केवळ इतिहास लेखनापेक्षा ललित शैलीतून विषय पोहोचवल्यामुळे तो अधिक भावतो. लक्षात राहतो.
चरित्र लेखन आणि त्यातही कलावंतिणीचे चरित्र लेखन करताना तिचे चारित्र्य सांभाळणे हे लेखकापुढे मोठे आव्हान असते. सत्यकथन करताना, चरित्र नायिकेच्या आयुष्यातील समाजमान्य नसणाऱ्या गोष्टींमुळेही तिचे चारित्र्य डागाळू नये, याची खबरदारी घ्यावी लागते; अन्यथा वाचकाच्या मनात नकारात्मक प्रतिमा उभी राहू शकते. हे टाळण्यासाठी समाजमान्य नसणाऱ्या गोष्टीही एखाद्याकडून का केल्या जातात, याची कारणमीमांसा करण्याची जबाबदारी चरित्र लेखकाची असते. ती शिल्पा सुर्वेंनी समर्थपणे पेलली आहे.
ओघवत्या, नाट्यमय लेखन शैलीमुळे संगीत नाटकांचा सुवर्णकाळ, तत्कालीन मुंबईतील चाळी, शाळा, सामाजिक मानसिकता, आदी गोष्टी चित्रमयरित्या वाचकापुढे उभ्या राहतात. हिराच्या आयुष्यात आलेल्या माणसांचे लेखिकेने केलेले चित्रण माणसा- माणसातील विरोधाभासांचे यथार्थ दर्शन घडवते.
एकंदरीत, सर्वसामान्य माणसातील प्रतिभावंत आणि प्रतिभावंतांतील सुमार माणसं या दोन्हीचे ओळख हिराचे हे नाट्यमय चरित्र वाचताना होते. एका अज्ञात प्रतिभावंताची ओळख करून दिल्याबद्दल लेखिकेचे आभार!
- संकेत सातोपे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा