शनिवार, ३१ मार्च, २०१८

विस्मृतीच्या गर्तेतील आद्य महिला नाटककार!
प्रसिद्धी पटलावर येणाऱ्या कलाकारांची आपल्याला ओळख असते. त्यांच्या कलाकृती, त्यांची नावं आपण चिरकाल लक्षात ठेवत असतो. पण असे अनेक अज्ञात प्रतिभावंत आपल्या आजूबाजूलाच होऊन गेले आहेत, ज्यांची आपल्याला तोंडओळखही नाही. नियतीने त्यांचे काम आपल्यापर्यंत पोहोचू दिलेले नाही, याची जाणीव शिल्पा सुर्वे Shilpa Surve लिखित आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांचे चरित्र वाचताना होते.
लेखिकेने संदर्भ- पुराव्यांसह केलेली मांडणी पाहता, हे पुस्तक phd चा शोधनिबंध म्हणूनही सादर होऊ शकले असते, असे वाटते. पण केवळ इतिहास लेखनापेक्षा ललित शैलीतून विषय पोहोचवल्यामुळे तो अधिक भावतो. लक्षात राहतो.
चरित्र लेखन आणि त्यातही कलावंतिणीचे चरित्र लेखन करताना तिचे चारित्र्य सांभाळणे हे लेखकापुढे मोठे आव्हान असते. सत्यकथन करताना, चरित्र नायिकेच्या आयुष्यातील समाजमान्य नसणाऱ्या गोष्टींमुळेही तिचे चारित्र्य डागाळू नये, याची खबरदारी घ्यावी लागते; अन्यथा वाचकाच्या मनात नकारात्मक प्रतिमा उभी राहू शकते. हे टाळण्यासाठी समाजमान्य नसणाऱ्या गोष्टीही एखाद्याकडून का केल्या जातात, याची कारणमीमांसा करण्याची जबाबदारी चरित्र लेखकाची असते. ती शिल्पा सुर्वेंनी समर्थपणे पेलली आहे.
ओघवत्या, नाट्यमय लेखन शैलीमुळे संगीत नाटकांचा सुवर्णकाळ, तत्कालीन मुंबईतील चाळी, शाळा, सामाजिक मानसिकता, आदी गोष्टी चित्रमयरित्या वाचकापुढे उभ्या राहतात. हिराच्या आयुष्यात आलेल्या माणसांचे लेखिकेने केलेले चित्रण माणसा- माणसातील विरोधाभासांचे यथार्थ दर्शन घडवते.
एकंदरीत, सर्वसामान्य माणसातील प्रतिभावंत आणि प्रतिभावंतांतील सुमार माणसं या दोन्हीचे ओळख हिराचे हे नाट्यमय चरित्र वाचताना होते. एका अज्ञात प्रतिभावंताची ओळख करून दिल्याबद्दल लेखिकेचे आभार!
- संकेत सातोपे
'चॅलेंज' यथातथाच!
स्वा. सावरकरांच्या जीवनावरील नाटक पाहायला जाताना; काळजाला भिडणारे पल्लेदार संवाद, तेजस्वी व्यक्तिरेखा, देशप्रेमाने भारावलेला काळ, यांचे एक जाज्वल्य रसायन रंगमंचावर मूर्तीवंत साकार होणार आहे, अशा अपेक्षा घेऊनच प्रेक्षक जमलेले असतात. मात्र या अपेक्षा निम्म्यानेही पूर्ण करण्यात मुक्ता बर्वे आणि दिनेश पेडणेकर यांची संयुक्त निर्मिती असलेले 'चॅलेंज' हे नवे नाटक यशस्वी ठरले आहे, असे म्हणता येणार नाही. स्वतः नाटककार आणि शब्दप्रभू असलेल्या तात्यारावांना लेखणीतून साकारण्याचे शिवधनुष्य या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक, वेशभूषकार आणि अभिनेताही असलेल्या दिग्पाल लांजेकर यांना तितकेसे पेललेले नाही.
नाटकात उभा करण्यात आलेला काळ हा सावरकरांच्या लंडन येथील विद्यार्थी दशेतला आहे. मूळात हा सावरकरांच्या आयुष्यातील सर्वांत झंझावाती काळ होता. रसरसत्या तारुण्यातील सावरकर लंडनमध्ये एकाच वेळी लेखणीचे शस्त्र आणि शस्त्राची लेखणी करून भारतीय सशस्त्रक्रांतीचा लढा नेटाने पुढे रेटत होते. महाविद्यालयीन अभ्यास, क्रांतीची सिद्धता, जनसंपर्क, १८५७चे स्वातंत्र्यसमरसारख्या ऐतिहासिक ग्रंथासाठीचे संशोधन, त्यात भारत भवनाची जबाबदारी अशा अनेक आघाड्या एकाच वेळी सांभाळणाऱ्या तात्यारावांची धीरोदात्तता आणि संयमीपण निखिल राऊत या कलाकाराने रंगमंचावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो केवळ प्रयत्नच असल्याची जाणीव संपूर्ण प्रयोगभर होत राहाते. मदन आणि अन्य सवंगड्यांमधील वाद क्षमवण्यासाठी मध्येच आवाज चढवणार आणि दर 8-10 वाक्यांनी सहकाऱ्यांचे खांदे दणादणा थोपटणारा सावरकरांच्या भूमिकेतील निखिल अगदी केविलवाणा वाटतो.
सावरकरांची हिंदवी स्वातंत्र्य लढ्याकडे आणि स्वतंत्र हिंदुस्थानच्या भविष्याकडे पाहण्याची स्वतःची अशी एक सुस्पष्ट भूमिका होती. ती त्यांच्या काही वाक्यांच्या विस्कळीत मांडणीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविता येणे अशक्य आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सावरकरांनी घेतलेली भूमिका नेमकी काय होती, हेच प्रेक्षकांपर्यंत पोचत नाही. मदनला प्रेयसीसह एका खोलीत पकडल्यानंतर सावरकर त्याच्यावर रागावतात, त्याला समज देण्याचा प्रयत्न करतात. मात्र मध्येच मदन त्यांना आपले वर्तन योग्यच असल्याचे ठासून सांगतो आणि तेथून विषय भरकटू थेट सावरकरांच्या मुलावर जातो. हे असे अनेक प्रसंग नाटकात आहेत, जिथे आत्ता सावरकर काहीतरी मौलिक सांगतील आहे वाटत असेपर्यंत विषय भलतीकडेच निघून जातो.
आ सिंधु-सिंधु पर्यन्ता, यस्य भारत भूमिका।
पितृभू-पुण्यभू भुश्चेव सा वै हिंदू रीती स्मृता।।
ही सावरकरांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्या आहे, बंधुत्वाची नव्हे, पण लेखकाला ती कुठून तरी लोकांना सांगायची आहे. त्यामुळे ती एका ठिकाणी घुसडून टाकण्यात आली आहे. मूळात ही व्याख्या तात्यारावांनी लंडनमध्ये नव्हे, तर तुरुंगवासाच्या (रत्नागिरी) काळात हिंदुत्व ग्रंथ लिहिताना केली होती. त्यामुळे इथे ऐतिहासिक संदर्भही चुकला आहे.
स्टोव्हवरील कढते रसायन खाली उतरविण्यासाठी सांडशी नसणे, त्यामुळे स्फोटाच्या भीतीने अन्य सहकाऱ्यांनी पळून जाणे आणि सावरकरांच्या आधी मदनने पुढे होऊन हात पोळून घेणे, हे प्रकारही कमालीचे बालिश वाटतात. सांडशी नसताना पदर किंवा रुमालाने घरगृहिणीही चुलीवरचा तवा उचलते, हा सोपा पर्याय तात्यारावांना माहीत नसावा? असाच बालिश प्रसंग फितुराला पकडण्यासाठी खिडकीतून उडी मारण्याचाही वाटतो.
सपक लिखाण- दिग्दर्शन, सुमार पार्श्वसंगीत, निखिल राऊत यांनी ओढाताण करून वटवलेला (की वठवलेला, कोण जाणे) सावरकर, आदी गोष्टींमुळे हे नाटक प्रेक्षकांना सावरकरानुभूतीच्या उंचीवर नेण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. हुतात्मा मदनलाल धिंग्रा यांनी मृत्यूपूर्वी नियतीला केलेले 'चॅलेंज' हे रंगभूमीवर यथातथाच पेलले गेले आहे.
- संकेत सातोपे

शुक्रवार, ३० मार्च, २०१८

भाषाशुद्धीबाबत सावरकरांची भूमिका नेमकी काय?



मुंबई : क्रांतिकारक सावरकर, हिंदुहृदयसम्राट सावरकर, महाकवी सावरकर, नाटककार सावरकर, राजकारणी सावरकर ते गांधीवादाचे विरोधक सावरकर अशा स्वा. सावरकरांच्या अनेक पैलुंवर आजवर विपुल लिहिले- बोलले गेले; मात्र अस्पृश्यता-जातीभेद निवारक सावरकर आणि भाषा- लिपीशुद्धीचे पुरस्कर्ते सावरकर या त्यांच्या सोनेरी पैलूंकडे त्यांच्या समर्थक नि विरोधकांचेही काहीसे दुर्लक्ष झाले. यातील भाषाशुद्धीबाबतच्या त्यांच्या भूमिकेची आपण आजच्या संदर्भाने माहिती घेऊ या.

भाषाशुद्धी हा शब्द उच्चारणाऱ्यावर, अनेक कथित विद्वान तुटून पडतात. त्यांची काही पठडीतली वाक्य असतात; ती म्हणजे ‘भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते; ती प्रमाण किंवा बोली असते. पुणेरी म्हणजेच शुद्ध मराठी का? आनी- पानी, सकाली-संद्याकालीला अशुद्ध ठरवणारे तुम्ही कोण?’ खरंतर हा युक्तीवाद अगदीच योग्य आहे. केवळ मूठभर कथित उच्चवर्गीयांची मूळमूळीत भाषा म्हणजेच मराठी नव्हे. मात्र त्याच वेळी हेही लक्षात घेतले पाहिजे की, भाषाशुद्धी चळवळीत प्रमाण भाषाविरुद्ध, बोलीभाषा असा वाद अपेक्षितच नाही. तिथे वाद आहे तो स्वकीय भाषा की परकीय भाषा इतकाच. म्हणूनच या चळवळीतील मंडळींनी बोलीभाषेतील अनेक शब्द, वाक्प्रचार, अव्यय त्यांच्या प्रमाण भाषेतील लिखाणात वापरले. उदाहरणच द्यायचे झाले, तर स्वा. सावरकरांनी वापरलेल्या ‘नि’ या अव्ययाचे देता येईल. ‘आणि’ या अर्थाच्या ‘व’ या एकाक्षरी अव्ययाला पर्याय म्हणून सावरकरांनी हेतुपुरस्सर दीर्घ ‘नी’ त्यांच्या लिखाणात आणला. ‘तू नी मी संग्ती- संग्ती जाऊ’ अशा प्रकारे ग्राम्य बोलीत तो त्यापूर्वी वापरला जात होता. सावरकरांपाठोपाठ भाषाशुद्धीवादी ज्येष्ठ कवी माधव ज्युलियन यांनी लघु- गुरू आणि मात्रांच्या हिशेबातही ‘नी’ हा ‘व’ला चपखल पर्याय ठरावा, यासाठी एकाक्षरी शब्द दीर्घ लिहावेत, या मराठी शुद्धलेखनाच्या नियमाला फाटा देत ऱ्हस्व ‘नि’ वापरण्यास सुरुवात केली. हा प्रचार इतका धडाकेबाज होता की, मराठी शुद्धलेखनात अपवाद म्हणून ऱ्हस्व ‘नि’ आजही विराजमान आहे. अगदी भाषाशुद्धीचे विरोधकही तो तसाच लिहितात.

सारखेत मीठ मिसळले, तांदळात खडे मिसळले की, भेसळ होते आणि जे भेसळयुक्त आहे ते अशुद्ध. त्यामुळे मराठी या अस्सल देशी भाषेत अरबी- फारसी, इंग्रजी अशा परदेशी शब्दांची झालेली सरमिसळ दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे ‘भाषाशुद्धी.’ मराठीच्या अन्य बोलींचा, इतकेच काय संस्कृत, पंजाबी, कानडी अशा कुठल्याही भारतीय भाषांना किंवा त्यातील शब्दांना- रचनांना विरोध करण्याचा या चळवळीचा मूळीच हेतु नव्हता. स्वदेशी शब्दांना शुद्धीवादी मंडळींनी आक्षेपही घेतलेला दिसत नाही. सावरकरांना भारताचे अस्सल देशी राष्ट्रीयत्व अपेक्षित होते, त्याच अनुषंगाने त्यांनी देशी धर्म, देशी भाषा, देशी संस्कार आणि जीवन पद्धतीचा आजन्म पुरस्कार केला. रत्नागिरी येथील स्थानबद्धतेच्या काळात त्यांना राजकारणात भाग घेण्यास बंदी होती, या काळात त्यांनी जातपात निवारण आणि भाषाशुद्धीवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केलेले दिसते. त्यासाठी दै. केसरीतील लेख मालिकेतून त्यांनी भाषाशुद्धीबाबत त्यांची भूमिका मांडली आणि त्यावर घेण्यात आलेल्या आक्षेपांचा प्रतिवादही केला. विशेष म्हणजे स्वा. सावरकरांचे कोणतेही साहित्य शासनाने यापूर्वी प्रकाशित केलेले नव्हते; त्यांचे मराठी भाषेचे शुद्धीकरण हे एकमेव पुस्तक शासकीय मुद्रणालयाने काही दशकांपूर्वी मुद्रित- प्रकाशित केले. त्यामुळे कितीही मतभेद असले, तरी सावरकरांची भाषाशुद्धी ‘राजमान्य’ही झाली आहे, असे म्हणण्याला प्रत्यवाय (हरकत हा परका शब्द इथे जाणीवपूर्वक टाळतो) नाही.

‘जगातील कोणतीच भाषा शुद्ध नसते. जगभरातील शब्द घेत गेले, म्हणूनच इंग्रजी जागतिक भाषा झाली. अजूनही ते त्यांच्या शब्दकोशात नवनवीन शब्द खुशाल घेत असतात.’ ही आणखी एक बाब सातत्याने याबाबत मांडली जाते. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. इंग्रजांनी जगभर राज्य केले, ते जिथे जिथे गेले तिथे जेते म्हणून गेले. त्यामुळे तिथून आणलेल्या वस्तू काय किंवा शब्द काय त्यांच्यासाठी भूषणावहच ठरणार. जसे १९७१च्या युद्धात आपण पाकिस्तानात घुसून उद्ध्वस्त केलेले त्यांचे ‘पॅटर्न रणगाडे’ आपल्या पराक्रम आणि अभिमानाची चिन्ह म्हणून अनेक ठिकाणी प्रदर्शनात मांडले आहेत. पण तेच मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यानंतर ‘ताज’ला पडलेली भगदाडे तातडीने बुजवून हॉटेल लवकरात लवकर सुरू करण्यात आणि मागे काही झालेच नव्हते अशा आवेशात उभे राहण्यात आपण धन्यता मानतो, यालाच ‘मुंबई स्पीरिट’ही म्हणतो. त्याचप्रमाणे भारतीय भाषांवरील अरबी, फारशी, इंग्रजीचा प्रचंड प्रभाव, या परकीय आक्रमकांनी केलेल्या आपल्या राष्ट्रीय जखमा आहेत आणि त्यांचे व्रण स्वकीय शब्दांनी भरून काढावेत. याकामी अन्य भारतीय भाषा आणि संस्कृतसारखी प्रचंड प्रसव क्षमता असलेल्या भाषेचाही आधार घेता येईल, अशी सावरकरांची भूमिका होती. हीच भूमिका हिंदवी स्वराज्य संस्थापनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली होती. त्याचसाठी त्यांनी तत्कालीन मुघली दरबारी रितींना फाटा देत, अस्सल भारतीय शिष्टचार आणले. त्यांनी किल्ले हा फारसी शब्द वगळून गड- दुर्ग असे शब्द वापरले. (उदा. रायगड, राजगड, सिंधुदुर्ग, आदी). दरबाराला राजसभा म्हटले, वजीर, सरलष्कर आदी पदे घालवून पंतप्रधान, सुरनीस, सेनापती अशी नावे योजिली. राजमुद्रा, चलनसुद्धा संस्कृतमधूनच ठेवले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्यकारभारातून अरबी- फारशी शब्दांना पूर्णपणे सीमापार करण्यासाठी अष्टप्रधान मंडळातील रघुनाथ पंडितांकरवी संस्कृत प्रतिशब्द सुचविणाऱ्या ‘राज्यव्यवहार कोश’ या ग्रंथाची निर्मिती करविली.

भाषाशुद्धी चळवळीमुळे मराठी कमकुवत होईल आणि त्यात नव्या संकल्पना नि संज्ञांसाठीच्या शब्दांची वानवा होईल, असेही आक्षेप आहेत. प्रत्यक्षात या चळवळीने मराठीला शेकडो नवे शब्द दिले. हे नवे शब्द शासकीय प्रतिशब्दांप्रमाणे केवळ पुस्तकबंद राहिले नाहीत, तर ते सर्वसामान्यांच्या ओठी स्थिरावलेही. वानगीदाखल, महापौर, दिनांक, विधिमंडळ, विधानसभा, हुतात्मा, चित्रपट, दिग्दर्शक, बोलपट, न्यायालय, कार्यालय, नभोवाणी, दूरध्वनी, भूदल, नौदल, वायूदल असे अनेक शब्द सांगता येतील. केवळ शब्द देऊन सावरकर थांबले नाहीत. त्यांनी भाषाशुद्धीचा विचार मांडला. त्याची काही तत्त्वे निश्चित करून दिली. त्यामुळेच त्यांच्यानंतरच्या काळातही संगणक, भ्रमणध्वनीसारखे नवे शब्द पाडले आणि प्रचारले जात असताना आपल्याला दिसते. तंत्रज्ञानाच्या रेट्यासोबत येणारे परकीय शब्द, प्रतिशब्द सापडताच टाकून देऊन, प्रतिशब्दच प्रचारात आणल्यास ही चळवळ आजही पुढे रेटली जाऊ शकते. प्रतिशब्द पाडण्याच्या या हिरीरीमुळेच कोणत्याही भाषेची नवशब्द प्रसवक्षमता टिकून राहात असते, हे लक्षात ठेवायला हवे.

सावरकरांनी मांडलेला लिपीशुद्धीचा विचार हा प्रामुख्याने तत्कालीन मुद्रण व्यवस्थेच्या सोयीसाठी होता, असे दिसते. ‘सर्व, कृष्ण, क्रूर’ अशा अर्ध्या ‘र’च्या उच्चारासाठी एकच पद्धत योजावी. वेळेला संदर्भाने उच्चार ओळखावा लागला, तरी चालेल. तसेच अ, आ यांच्या पुढील स्वर अि अी अु अू अे अै असे लिहावेत, जेणेकरून जुळणीसाठी कमी खिळे लागतील आणि कामाचा वेग वाढू शकेल, असे सावरकरांचे म्हणणे होते. यात आणखीही काही मूळाक्षरांत बदल त्यांनी सूचविले होते. मात्र पुढे छपाई आणि टंकलेखनाच्या नवनव्या पद्धती विकसित झाल्याने या लिपीतील बदलांचा फारसा प्रसार होऊ शकला नाही.

आज सावरकरांनी सूचविलेले लिपीतील बदल किती आवश्यक, किती कालबाह्य यावर विद्वानांत चर्चा होऊ शकेल, मात्र मराठी भाषेतील काही उच्चारभिन्नता दाखविण्यासाठी देवनागरी-बाळबोध लिपीत काही सुधारणांची आवश्यकता आहे, हे बहुतांश लोक मान्य करतील. यात प्रामुख्याने ‘ज’ आणि ‘च’ यांच्या उच्चारणभिन्नता दाखविण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे दिसते. ‘जगतात’ हा शब्द ‘ज’चे मराठीतील दोन स्वतंत्र उच्चार दाखविण्याची सोय नसल्याने ‘जगात’ याअर्थाने आणि ‘जीवन जगतात’ या अर्थानेही वाचला जाऊ शकतो. म्हणूनच कुसुमाग्रज जेव्हा कोलंबसाचे गर्वगीत या कवितेत “कोट्यवधी जगतात जीवाणू जगती अन् मरती”, असे म्हणतात; तेव्हा ‘ज’चा नेमका कोणता उच्चार आणि अर्थ अपेक्षित आहे, हे आपल्याला सांगता येत नाही. बरं, हा शब्दांशी खेळण्यासाठी वापरलेला श्लेष नव्हे, तर लिपीचे न्यूनत्वच आहे. म्हणूनच ते दूर व्हायला हवे. आणखी एक उदाहरण ‘जप’चे पाहता येईल. 'माळ जप' आणि 'स्वत:ला जप', या दोन्ही वाक्यांत तो वेगळ्या उच्चारांचा आणि म्हणूनच अर्थांचा दिसतो. 'च'च्या बाबतीतही तेच सांगता येईल, चलन आणि चमचा, चक्र आणि चकाकी, चकीत आणि चकवा या शब्दजोड्यांमध्ये पहिल्या शब्दांतील ‘च’ अकार आणि दुसऱ्या शब्दांतील ‘च’चा अकार यात भिन्नता आहे. हे भेद दाखविण्याची सोय व्हावी, यासाठी आचार्य विनोबा भावे यांनी हिंदीतील नुक्ता वापरण्याची पद्धत मराठीत रुढ करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र ही पद्धत फारसी रुळली नाही.
स्वा. सावरकर आत्मार्पण दिन आणि त्याला जोडून येणाऱ्या मराठी भाषा दिनानिमित्त मातृभाषा जतनाचा वसा, आपण हाती घ्यायला हवा! तरच स्वा. सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन करीत मराठी भाषा दिन खऱ्या अर्थाने साजरा झाला, असे म्हणता येईल.

- संकेत सातोपे

  • ------------------

http://m.lokmat.com/blog/editorial/what-savarkars-role-language-purification/

गुरुवार, १५ मार्च, २०१८

केरळमध्ये 'केशरी' नारळाच्या लागवडीवर बंदी!

केरळमध्ये 'केशरी' नारळाच्या लागवडीवर बंदी!


केशरी रंगाच्या नारळ लागवडीवर केरळ शासनाने कायमची बंदी घातल्याचे कळते. इतकेच नव्हे, तर जिथे जिथे हे केशरी नारळ दिसतील तिथून ते मुळासकट उपटून 'लाल' मातीत पुरून टाकण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

गेल्या काही वर्षांत देशभरात या केशरी नारळांचे बेसुमार पीक आल्यामुळे अन्य प्रजातींचे उत्पादक कमालीचे चिंतेत आहेत. त्यातच केशरी नारळ लागवडीसाठी अत्यंत अयोग्य असलेल्या ईशान्य भारतातील मातीतही अलीकडे हे केशरी माड रुजू लागल्याने त्यांच्या चिंतते भर पडली आहे. तुलनेने कमी पाण्यात अधिक आणि झटपट उत्पन्न देणारे हे केशरी पीक देशात सर्वांकडूनच स्वीकारले गेल्यास अन्य वाण नामशेष होण्याची भीती आहे. जीर्ण वडाच्या पारंब्या पाराचे भक्कम बांधकामही फोडत जातात, त्याच थाटात ईशान्येत काल उगवलेल्या या केशरी माडांच्या कोवळ्या मुळांनी चक्क भले मोठे पुतळे कलथून टाकण्यास प्रारंभ केला.

त्यामुळे वरपांगी आकर्षक दिसणारे, हे घातकी माड निदान केरळच्या लाल भडक मातीत तरी फोफावू नयेत, यासाठी आतापासूनच विशेष दक्षता घेण्यात येत आहे. या केशरी प्रजातीला पोषक ठरणाऱ्या आणि कोणत्याही खतपाण्याविना केवळ श्रमदानातून कुठेही उगवणाऱ्या खाकी वनस्पतीही मुळासकट नष्ट करून टाकण्याच्या गुप्त सूचना श्रेष्ठींकडून देण्यात आल्याचे कळते. तसेच गेली अनेक वर्षे सातत्याने या वनस्पतींची तोड करूनही, कातळावरील निवडुंगासारख्या त्या पुन्हा-पुन्हा उगविण्याची कारणे शोधण्यासाठी विशेष समितीही नेमण्यात आली आहे.

(सूचना - हे निव्वळ कृषीवृत्त असून याचा राजकीय सद्यस्थितीशी कोणताही संबंध नाही)

- संकेत सातोपे