रविवार, २८ डिसेंबर, २०२५

आपलं संचित जपणाऱ्यांची खिल्ली कशाला?

काही आठवड्यांपूर्वी देवव्रत रेखे या तरुणाने वेदाचे दंडक्रम पारायण पूर्ण केले. समाज माध्यमांवर त्याचे कौतुक करणाऱ्या प्रतिक्रियांबरोबरच, नेहमीप्रमाणे हे थोतांड ठरवणाऱ्या प्रतिक्रियाही उमटल्याच. वेद, वैदिक, उपनिषदे, संस्कृत, श्लोक, सुभाषितं, इतकंच काय प्रमाण मराठी बोलणंही काही मंडळींना ब्राह्मणी किंवा बामणी वाटतं. राजकीय तळी राखण्यासाठी अशी भूमिका घेणाऱ्यांचे समजू शकतो. पण कोणत्याच पक्षीय राजकारणाशी बाद्रायणी संबंध नसलेली मंडळीही जेव्हा या अपसव्य वळचणीला जातात, तेव्हा मात्र ‘अरेरे’ वाटल्याविना राहात नाही.

मूळात वैदिक वाङ्मय-परंपरा आणि प्रवाह ही ब्राह्मणांइतकीच ब्राह्मणेतरांचीही वडिलोपार्जित मिळकत आहे. तिचा मक्ता कोण्या एकाच समाजाकडे देण्याचे काही कारणच नाही. कालपर्यंत वेदाभ्यास बहुजनांना करू दिला जात नव्हता म्हणून संघर्ष करण्यात आले. आज गायत्री मंत्रापासून ते ऋग्वेदातल्या महामृत्यूंजय मंत्रापर्यंत कोणतेही मंत्र कुठेही, कधीही म्हणण्याचे, ऐकण्याचे स्वातंत्र्य अखिल मानव जातीला मिळालेले आहे. वेद-पुराणं सहज उपलब्ध आहेत. कोणीही व्यक्ती इच्छेनुसार ती वाचू-अभ्यासू शकतो. ती शिकवणारे अभ्यासक्रम विद्यापीठांत जातीनिरपेक्ष उपलब्ध आहेत. आता प्रश्न फक्त इतकाच आहे की, हे सारे अभ्यासायचे तर कष्ट उपसावे लागतात, त्याची आपली तयारी आहे का? त्यापेक्षा जे हे कष्ट घेतात, त्यांची खिल्ली उडवणं साेपं नाही का!


वेद शिकून काय उपयोग? त्याने काय पोट भरतंय? की लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळतायंत? असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण माणसाच्या असंख्य गरजांपैकी एक आध्यात्मिक-धार्मिक गरजही आहे, याचं भान आपण सुटू देता कामा नये. हडप्पा संस्कृतीमध्येही त्यांच्या अशा देवता आणि उपासना पद्धती होत्या. म्हणजेच अध्यात्म ही माणसाची आदिम गरज आहे. म्हणूनच द्रष्टे महानायक बाबासाहेब आंबेडकरांनीही बौद्ध धर्म स्वीकारला, पण हिंदू धर्म सोडून नास्तिक किंवा निधर्मी होण्याचा उपदेश केला नाही. डावे-विचारवंत वगैरे म्हणवणाऱ्यांचा कार्यालयातही लेनिन-स्टॅलिनची छायाचित्र असतात आणि दास कॅपिलट-कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हे त्यांचे धर्मग्रंथच झालेले आहेत. त्यांच्या तत्वज्ञानावर ‘विश्वास(श्रद्धा)’ ठेवावी असा त्यांचाही आग्रह असतोच.


मग आध्यात्मिक गरज अमान्य करून त्यापासून पळण्यापेक्षा ती स्वीकारून आपल्या सांस्कृतिक संचिताचा अभ्यास करण्यात किंवा निदान जो कोणी तो करत असेल, त्याचे कौतुक करण्यात काय पाप आहे! संस्कृत वाङ्मयाच्या निर्मितीत ब्राह्मणेतरांचेही योगदान असल्याचे असंख्य पुरावे उपलब्ध आहेत. स्वत: वेदव्यासांचा जन्म मत्सकन्येच्या पोटी झाला. वाल्मिकी अब्राह्मण, गायत्री मंत्राचे कर्ते विश्वामित्र क्षत्रिय, कालिदासही ब्राह्मणच असल्याचा काही पुरावा नाही. हे जर आपण स्वीकारणार असू तर सारं वैदिक वाङ्मय आपल्याला आपलं वाटू लागेल. पण ते आपलंस करण्यासाठी कष्ट मात्र घ्यावे लागतील. कारण ही वडिलोपार्जित मिळकत खरी, पण ती काही फक्त सात-बाराने आपलीशी होणारी नाही.


यात आणखी एक बागुलबुवा दाखवण्यात येतो, की या सगळ्याच्या नादी लागाल तर ब्राह्मण तुम्हाला बौद्धिक दास बनवतील किंवा तुम्हाला जाती वर्चस्व मान्यच करावे लागेल. याची तर आता सूतराम शक्यता नाही. उलट आपली शास्त्र आपणच जाणल्यामुळे प्रत्येक जातीत पुरोहित निर्माण होतील आणि आज आपण जसे जात न पाहता घराच्या फर्निचरच काम उत्तम कारागिराला देतो किंवा चांगली सेवा मिळते त्या सलोनमध्ये जातो, तोच प्रकार भिक्षुकांच्या बाबतीतही होईल. निदान व्हायला पाहिजे असा आशावाद आपण बाळगू शकतो. माझ्या पाहण्यात असे काही ब्राह्मणेतर भिक्षुक-पुजारी आहेत. तसंच ज्यांना यातलं काही न करता स्वांत सुखाय आवश्यक तेव्हढं जाणून घ्यायचं असेल, त्यांना तीही मुभा आहेच की. हिंदू धर्मात कुठे कशावर सक्ती आहे!

शनिवार, १० मे, २०२५

लढले नसते तर शिवराय आपला आदर्श असते का?

सध्या जो उठतोय तो युद्ध कसं विनाशकारी असतं आणि त्यामुळे कशी जीवित आणि वित्तहानी होते, हे सांगायला लागलाय. युद्धनंतर नेते मोठे होतील आणि सैनिक, नागरिक हकनाक मारले जातील वगैरे भावूक पोस्ट फोटो-व्हिडिओसह शेअर होऊ लागल्या आहेत. या साऱ्याचा सैनिकांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मनोबलावर किती विपरित परिणाम होत असेल याचाही विचार केला जात नाही.

मूळात भारताने कोणतीही युद्धखोरीची कृती केलेली नाही. आज वर्षानुवर्षे आतंकवादाच्या माध्यामातून भारताशी छुपे युद्ध (प्रॉक्सी वॉर) करणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात कोणतीच लष्करी कारवाई करू नये, असं या लोकांच म्हणणं आहे का? बरं, प्रत्युत्तर द्यायला केंद्राकडून विलंब होत होता, तेव्हा हीच मंडळी कारवाई होत नाही म्हणून गळा काढत होती. आता कारवाई झाल्यावर, त्यांना युद्ध नकोय. अरे, आपल्या कारवाईचा परिणाम म्हणून जर आपल्यावर युद्ध लादलं जात असेल, तर ते आपण लढायला नको का? आणि एकदा लढाईला उभे राहिल्यावर, अरेरे इतकं नको करायला, हे क्षेपणास्त्र नको डागायला, जास्त लोकांना नको त्रास व्हायला, हे म्हणण्याला काय अर्थ आहे. युद्ध म्हटलं की युद्ध, ते भीषणच असणार, त्यात दोन्ही बाजूंनी जीवितहानीही होणारच, शत्रूच्या डावपेचांना उत्तर म्हणून आपल्याही सैन्याला रुद्रावतार धारण करावाच लागणार, वेळप्रसंगी नागरिकांचीही ससेहोलपट होणार, अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार, हे सगळं अध्याहृत असतानाही प्रत्येक व्यक्तीला काय किंवा राष्ट्राला काय कधी ना कधी युद्धाला सामोरं जावंच लागतं.

केवळ आणि केवळ दुष्टांच्या सत्तेसमोर झुकायचं नाही, म्हणून आजन्म जीव धोक्यात घालणाऱ्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राने युद्धाची तमा बाळगावी, याचच आश्चर्य वाटतं. युद्ध नको, संहार नको, जीवाला धोका म्हणून आपले शिवराय जर मिर्झाराजे जयसिंगासारखे मुघलांचे मांडलिकत्व पत्करून सुरक्षित, चैनीच आयुष्य जगले असते, तर आज ते आपले आदर्श असते का? शिवरायांनी त्यांच्या उक्ती-कृतीतून आपल्याला काय शिकवलं. सृष्टांचा सांभाळ करण्यासाठी दृष्टांचा संहार, हेच त्यांच्या जीवनाचं सूत्र होतं ना? त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी किती सोसलं, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.

आज वेळ आपली आहे, शिवराय केवळ शिवजयंतीच्या कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता आपल्या जीवनात त्याचं अनुकरण करायला हवं. माणुसकीच्या शत्रूसमोर ताठ मानेनं उभं राहायला हवं. विशेष म्हणजे त्यासाठी आपल्याला काहीही विशेष करायचं नाहीये. सगळं काही आपली सेनादलं आणि शासनच करणार आहेत. आपल्याला फक्त त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनोबलावर परिणाम करेल, असं कोणतंही वर्तन करायचं नाहीये. सैन्य आणि शासनाकडून येणाऱ्या सूचनांचं काटेकोर पालन करायचं आहे. तितकंही जर आपण करू शकलो नाही, तर आपण उद्याच्या इतिहासातले अण्णोजी दत्तो असू.


ता.क.: थेट युद्धछायेत असणाऱ्या लोकांसाठी गळा काढणाऱ्यांसाठी सांगतो. मी सध्या माझ्या पत्नी आणि साडे-चार वर्षांच्या मुलासह ब्लॅकआउट सुरू असलेल्याच भागातच राहतोय.

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५

'छावा' डाव्यांचा की उजव्यांचा?

हल्ली कोणताही ऐतिहासिक चित्रपट आला की, तो उजव्यांचा की डाव्यांचा हे आधी ठरवलं जातं. एकदा तशी शिक्कामोर्तब झाली की मग लगेच त्याचे समर्थक आणि विरोधक सोशल मीडियावरून रान उठवायला सुरुवात करतात. ‘छावा’मधूनही बामणे, भटूकडे, मनुवादी, संघी, हिंदुत्ववादी, उजवे आणि ‘चळवळी’तले, डावे, समाजवादी, सेक्युलर, फेक्युलर, ब्रिगेडी, बहुजनवादी अशा बिरुदांनी ओळखल्या जाणाऱ्या दोन प्रमुख गटांना त्यांच्या संकल्पनेतले छत्रपती संभाजी महाराज मोठ्या पडद्यावर पाहायचे होते. बरं, या दोन्ही गटांच्या समर्थकांची संख्या इतकी लक्षणीय आहे की, यातल्या एकाही गटाच्या मनातील ‘शंभू-प्रतिमेला’ धक्का लावणारं काही चुकूनही दाखवणं निर्माता चमूला व्यावसायिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं. पण वरील दोनपैकी एका गटात मोडणारा असं या चित्रपटाचं वर्गीकरण चटकन प्रेक्षकांना करता न येणं, याचाही या चित्रपटाच्या यशाला हातभार आहे.

संपूर्ण चित्रपट छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई याभोवतीच फिरणारा आहे. एकट्या मुघलांशी पाण्यातून, जंगलात, किल्ल्यावर अशा तीन-चार लढाया दाखवण्याऐवजी, जंजिऱ्याचा सिद्दी, गोव्याचे पोर्तुगीज आणि म्हैसूरचा चिकदेव अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या तऱ्हेच्या लढाया दाखवायला दिग्दर्शकाला आयते अॅक्शन प्लॉट उपलब्ध होते. त्यातही जंजिऱ्याची नाविक लढाई वेगळेपणानेही दाखवता आली असती. पण हे सर्व मोह टाळून त्याने फक्त औरंगजेब खलनायक आणि संभाजीराजे नायक हेच चित्रपटाचं सरळसोट सूत्र ठेवलं. यामुळे संभाजीराजांच्या युद्धनीतीबद्दल अधिकाधिक माहिती पोहोचवता येण्याची संधी हुकली असली, तरीही ज्यांना संभाजीराजांबद्दल फारसं माहिती नाही, त्यांना नायकविरुद्ध खलनायक हे थेट समीकरण समजून घ्यायला सोपं झालं.


चित्रपटाचे कथानक सोपं करणारा हाच दिग्दर्शक उपरोक्त दोन गटांमधील वर्गिकरणाच्या तडाख्यातून सहीसलामत बचावून नेणारे काही प्रसंग चित्रपटात किती खुबीने पेरतो पहा. संभाजीराजे बुऱ्हाणपूरच्या स्वारीवरून परततात, तेव्हा त्यांच्या हस्ते भेट-वस्तू स्वीकारणारी एक मुसलमानी पगडी आवर्जून दाखवली जाते - सेक्युलर खूश. अनाजी पंताला हत्तीच्या पायांखाली देण्याचा भव्य सीन - बामण्यांचे विरोधक खूश. आता राहिले उजवे. एरव्ही संपूर्ण चित्रपटातल्या कोणत्याही लढाईत मुघल सैनिकांच्या तोंडी चुकूनही ‘दीन-दीन, अल्लाहू अकबर’ अशी कोणतीही घोषणा नाही. बुऱ्हाणपूर लुटीच्या प्रसंगात तर मराठे आल्याचं कळल्याबरोबर गढीच्या दाराजवळ धावून आलेल्या सैनिकांना आवेशाने तोंडतून बाहेर पडेल अशी युद्धघोषणाच दिलेली नसल्याने ते बावचळून नुसते ‘एSSS’ ओरडताना दिसतात. पण हा चित्रपट उजव्यांसाठीही करायचा आहेच. त्यामुळे अगदी शेवटाकडच्या प्रसंगात औरंगजेब पुटपुटतो, ‘...सिर्फ तुम्हे अपना धर्म बदलना पडेगा’.


सध्या सोशल मीडियावर उपरोक्त दोन्ही गटातील मंडळींच्या ज्या पोस्ट फिरतायंत, त्या पाहिल्या की दिग्दर्शकाने ‘छावा’ची नौका बॉक्स ऑफिसवर ‘गटां’गळ्या खाऊ नये म्हणून केलेल्या तारेवरच्या कसरती सार्थकी लागल्याचं दिसेल. कुणी म्हणतंय, ‘गद्दार बामण्यांना कसं हत्तीच्या पायी दिलयं ते पाहायचं असेल, तर छावा पहा.’ कुणी म्हणतंय, ‘हिंदू धर्माच्या अस्मितेसाठी बलिदान कसं करावं याची प्रेरणा घ्यायची असेल, तर छावा पहा.’ गंमत म्हणजे, ‘ब्रिगेडींच्या अपप्रचाराला बळी पडू नका आणि बामणी काव्याला भूलू नका,’ अशा नांदीने सुरुवात होणाऱ्या या दोन्हीकडंच्या प्रचारनाट्यांचं भरतवाक्य मात्र, ‘तर छावा पहा’, हेच आहे.


भूतकाळात होऊन गेलेल्या महनीय व्यक्ती या त्यांच्या कालखंडात आणि प्राप्त परिस्थिती त्यांना जे सर्वाेत्तम करता येणं शक्य होतं, ते केल्यामुळेच आदरणीय-वंदनीय ठरत असतात. त्यांच्या जीवन चरित्राचा उपयोग सध्याच्या राजकीय किंवा सामाजिक परिस्थितीत आपापल्या विचारधारेला टेकू म्हणून करणारे लोकं, कोणत्याही महापुरुषाचे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यात यशस्वी ठरणं कठीणच असतं. ‘आम्हीच खरा इतिहास सांगतो’, असा कंठशोष करणाऱ्या या मंडळींचं म्हणणं खरंतर, ‘आम्ही सांगतो तोच खरा इतिहास आहे,’ असंच असतं. इतिहास हा कितीही निष्पक्षपातीपणे लिहिण्याचा प्रयत्न केला तरीही तो सापेक्षच असतो. त्यामुळे त्याला खऱ्या-खोट्याच्या तगडीत तोलण्याचे प्रयत्न फोल ठरतात. दुर्दैवाने, सांप्रतचे अभिनेवेश बाजूला ठेवून इतिहासाकडे पाहू शकणारे जनमतच सध्या क्षीण होत चालले आहे. त्यामुळेच कोणत्याही ऐतिहासिक कथानकाला हात घालणाऱ्या दिग्दर्शक-निर्मात्यांना उतेकर यांच्यासारखी तारेवरची कसरत करण्याला प्रत्यवाय राहत नाही.


सुदैवाने जेव्हा, ‘श्रूती धन्य जाहल्या, श्रवून अपूलि वार्ता, रण सोडून सेना सागर अमूचे पळता’ अशा ऐतिहासिक तथ्याला अजिबात धरून नसलेल्या कवितेच्या ओळी असलेला ‘विशाखा’ प्रसिद्ध झाला, तेव्हा ‘सत्य इतिहास संशोधकां’चे गल्लोगल्ली पेव फुटायचे होते. नाहीतर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या तेजस्वी स्फूर्तीगीताची भ्रूणहत्याच झाली असती. ‘हाताशी थोडी-फार मुलं असती, तर कोणीही किल्ले घेतले असते, शिवाजीने किल्ले घेतले त्याचा आम्हाला का त्रास’, असले विनोद करणाऱ्या पुलंना अभिनिवेशी नवइतिहासकारांनी मनुवादी किंवा राष्ट्रद्रोही या गटात टाकलं असतं. एकंदरीतच, ऐतिहासिक आशय(कंटेंट) आणि ऐतिहासिक कथानकावर बेतलेला ललित आशय या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि दोन्हीच्या प्रसूतीचे हेतूही भिन्न आहेत, याची जाणीव त्या पिढीत शाबूत होती. आता अभिनिवेशाच्या वेष्टनात गुंडाळून इतर सर्वच जाणिवा गंजवून सोडण्याचा एककलमी कार्यक्रम सर्वच राज्यकर्त्या आणि समाजकर्त्या मंडळींनी हाती घेतला आहे आणि त्यासाठी त्यांच्या हाती लागलेले सर्वात घातक शस्त्र आहे, ते म्हणजे ‘सोशल मीडिया’!


- संकेत सातोपे