मा
झे एक जेष्ठ सहकारी इरसाल नागपुरीत मला नेहमी म्हणायचे, 'जा बे, तुम्ही मुंबई-कोकणातले लोकं! तुमच्यासाठी महाराष्ट्र सिंधुदुर्गात सुरू होतो आणि रत्नागिरी- रायगडमार्गे मुंबईत येऊन संपतो. त्याच्यापुढे तुम्हाला थेट यूएस-यूके किंवा सिंगापूरच लागतं.' या गमतीमागच्या वास्तवाची सर्वाधिक जाणीव मला '१० नोव्हेंबर २०१९' या दिवशी विदर्भकन्येचं पाणिग्रहण केल्यापासून व्हायला लागली. विदर्भातल्या चालीरिती, बोली, समस्या तर सोडाच; पण विदर्भात नेमके किती आणि कोणते जिल्हे आहेत, याचीसुद्धा माहिती मुंबई-पुण्यात बसून अखंड महाराष्ट्रासाठी कंठशोष करणाऱ्या किती जणांना असेल याबाबत शंकाच आहे. हिंगोली, वाशिम, गोंदिया या नावाचे जिल्हे महाराष्ट्रात आहेत, याचा पत्ताही नसलेले महानगरी-महाराष्ट्रप्रेमी- महाभाग माझ्या पाहण्यात आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाबाबतचा अभिनिवेश व्यक्त करताना आचार्य अत्रे म्हणाले होते, अन्य राज्यांना फक्त भूगोल आहे, आमच्या महाराष्ट्राला इतिहास आहे. महाराष्ट्राचे एकंदर राजकारण- समाजकारण हे अशाच अभिनिवेशावर चालतं. त्यामुळेच इतिहासकार मेहेंदळे म्हणतात त्याप्रमाणे, 'आपल्याकडे इतिहास हा अभ्यासाचा नव्हे तर भावनेचा विषय आहे.' तीच गत भूगोलाचीही आहे.पण गेल्या वर्षभरात 'करून राहिले, बोलून राहिले,'च्या पलीकडील वैदर्भीय भाषिक व्यवहारातील अनेक वैशिष्ट्यं मला हेरता आली, अनेक नवीन शब्द कळले, काही शब्दांच्या भिन्न अर्थछटांशी तोंडओळख झाली. वैदर्भीय बोलीवरील राष्ट्रभाषेचा अतिरिक्त प्रभाव तर सर्वपरिचित आहे. त्यातूनच दुहेरी क्रियापदं वापरण्याची पद्धत रूढ झालेली आहे. हिंदीतील 'क्या कर रहे हो'चेच शब्दशः मराठीकरणं म्हणजे 'काय करून राहिले आहेत'. तसंच 'आमच्याकडे हे असं असतं', 'माझ्या पिशवीत खाऊ असतो'; याऐवजी हिंदीतील 'रहता है' प्रमाणे 'आमच्याकडे हे असं राहातं', 'माझ्या पिशवीत खाऊ राहातो', असं बोललं जातं. हिंदीप्रमाणे दोन क्रियापदं वापरायची ही सवय या बोलीत इतकी भिनली आहे की, जेव्हा अशी दोन क्रियापद योजता येत नाहीत तेव्हा एकच क्रियापद दोन वेळा उच्चारला जात. उदाहरणार्थ, हे 'घेऊन घ्या' ना; ते 'देऊन द्या' ना. वस्तुतः मराठीत 'द्या, घ्या' इतकंच पुरेसं आहे. पण इतकं लहान क्रियापद वापरणं अस्सल वैदर्भी जिभेला सोसणारच नाही. हल्ली प्रमाण मराठीमध्येही 'खूप सारे' असा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. हासुद्धा अशाच प्रकारचा आहे. खरंतर मराठीत 'खूप' हा शब्द परिपूर्ण आहे. पण हिंदीत 'ढेर सारे' या दोन शब्दांचा मिळून अर्थ बनतो, त्याच्याच (चॅनलीय) प्रभावामुळे आता मराठीच्या माथीही 'खूप सारे' आला आहे. यातल्या 'सारे' चा अर्थ खूपच्या जवळपासही जाणारा नाही. असो!
विदर्भातल्या या दुहेरी क्रियापद पद्धतीचा एक लाभही आहे. तो म्हणजे प्रमाण मराठीत जी क्रियापद मुळातच दुहेरी आहेत आणि केवळ बोलीभाषेच्या सोयीसाठी ती जोडून किंवा एकत्र करून वापरली जातात, ती क्रियापदं ही मंडळी सवयीने सहजच प्रमाण मराठीत बोलतात. उदाहरणार्थ, 'काय करतोयस ऐवजी काय करत आहेस, मी येतोय ऐवजी मी येत आहे. तो जातोय ऐवजी जात आहे.' क्रियापदांच्या बाबतीतलं एक गणित मात्र मला अजून सुटलेलं नाही. ते म्हणजे, 'बोलल्या जात आहे, केल्या जात आहे, वापरल्या जात आहे.' यातले सगळे 'ले' वैदर्भीय मराठीत 'ल्या' का होतात? हा प्रभाव बंगालीचा असावा, असा माझा बाळबोध कयास आहे.
वाक्यरचनेबाबत आहे तसेच काही शब्दप्रयोगांच्या अर्थछटांबाबतही भेद (विशेषतः वऱ्हाडात) पाहायला मिळतात. म्हणजे फजिती होणे हा शब्दप्रयोग, मुंबई-पुण्यात जसा 'चारचौघात फजिती झाली, शाहिस्तेखानाची फजिती केली' अशा अर्थछटेसह वापरला जातो, तसा विदर्भात नाही. तिथे कोणत्याही प्रकारची अडचण होणे म्हणजे फजिती होणे. उदाहरणार्थ, लॉकडाऊनमध्ये बाहेरून काही मागवता येत नाही, फार फजिती झाली आहे; रेल्वेचं तिकीट मिळालं नाही, फजिती झाली. असाच काहीसा प्रकार 'तंतोतंत'च्या बाबतीत, 'तो अगदी तंतोतंत पोहोचला', म्हणजे वेळेत नव्हे तर वेळ संपता संपता. 'कीव येणे' हा शब्दप्रयोग थेट 'दया येणे' याच अर्थी वापरला जातो. आणि 'गाडी समोर घ्या, दुकान आणखी थोडं समोर आहे' याचा अर्थ 'पुढे आहे' असा असतो. असे अनेक शब्दप्रयोग आहेत, जे सध्याच्या मुंबई-पुण्यातल्या बोलीपेक्षा काहीशा वेगळ्या पद्धतीने-अर्थाने वापरले जातात.
वाक्यरचना, अर्थभिन्नतेबरोबरच काही शब्दही चटकन लक्षात न येणार असतात. कोथिंबीरला सांबार म्हणतात हे बहुतेकांना माहीत असेल, पण टोप-भांड्याला गंज म्हटलं जातं. धुण्याच्या कपड्यांना पारथे, कोळ्याला कातीण, आंधळ्याला भोकना, बेचकीला गुलेर म्हटलं जातं. भयाड म्हणजे बावळट, चटोरी म्हणजे हावरट आणि मधात भेटू म्हणजे मध्यवर्ती ठिकाणी असा अर्थ घ्यायचा असतो. लुस्त हा हिंदीतल्या चुस्तचा विरुद्धार्थी शब्द आहे. बारीक होण्याला रोड होणे आणि चुका काढण्याला कुच्या काढणे म्हटलं जातं.
कोकणी आणि नागपुरी मराठीत सगळ्यात मोठा भेद आहे तो लहजाचा. कोकणात साधा 'हो'सुद्धा 'होsssय' असा हेल काढून बोलला जातो आणि नागपुरीत कोणताही शब्द न ताणता अगदी थेट! पण हे असे कितीही भेद दाखवता आले, तरीही ही दोन्ही एकाच मायमराठीची लेकरं आहेत. त्यामुळे त्यांच्यात गोडवा मात्र तोच आहे, अमृताशी पैजा जिंकणारा!
© - संकेत सातोपे